वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट-यूजी परीक्षा ५ मे रोजी पार पडली. या परीक्षेमध्ये ६३ गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली. पेपर फुटीच्या घटनेने संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळाला. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रथम नोंदवल्याप्रमाणे, यामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका साठवल्या जातात, तिथे आवश्यक उपाययोजना नसल्याचे आढळून आले. परीक्षा खोल्यांमध्ये अनिवार्य असलेले दोन कार्यरत सीसीटीव्ही नसल्याचे आढळून आले. त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे केल्या जाणार्‍या परीक्षा केंद्रांच्या निवडीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. एनटीए कोणत्या निकषांच्या आधारावर नीटच्या परीक्षा केंद्रांची निवड करते? परीक्षा सुरळीत व्हावी यासाठी काय उपाययोजना केल्या जातात? याविषयी जाणून घेऊ या.

परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ

यंदाच्या नीट-यूजी परीक्षेत परीक्षा केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परदेशातील १४ शहरांसह देशभरातील ५७१ शहरांमधील ४७५० परीक्षा केंद्रांवर पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. २०२३ मध्ये एनटीएद्वारे ४९९ शहरांमधील ४०९७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. २०२२ मध्ये ४९७ शहरांमध्ये एकूण ३५७४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून परीक्षा केंद्रांच्या एकूण संख्येत वाढ करण्यात आली, अशी माहिती एनटीए आणि शिक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवसापूर्वी लांबचा प्रवास करावा लागू नये, हा परीक्षा केंद्रात वाढ करण्याचा उद्देश आहे.

हेही वाचा : नेट परीक्षा नेमकी असते कशासाठी? काय विचारलं जातं आणि या परीक्षेला एवढी मागणी का? जाणून घ्या…

परीक्षा केंद्रांची मूळ यादी

एनटीएकडे आधीपासूनच केंद्रांची एक आधारभूत सूची असते. त्यातूनच पेन आणि पेपर परीक्षेसाठी चाचणी केंद्रे निवडली जातात. या यादीमध्ये सरकारी शाळांचा समावेश आहे. या शाळा सीबीएसई आणि एनटीएसारख्या संस्थांच्या वतीने फार पूर्वीपासून कोणत्याही समस्या किंवा गैरप्रकारांची तक्रार न करता परीक्षा घेत आल्या आहेत. मूळ यादीमध्ये पुरेशा शाळा नसल्यास, एनटीए एआयसीटीई -मान्यताप्राप्त संस्था आणि महाविद्यालयांची नोंद करू शकते. जरी शाळा किंवा उच्च शिक्षण संस्थांनी भूतकाळात कोणत्याही अडथळ्याशिवाय परीक्षा घेतल्या असतील, तरीही एजन्सीने दरवर्षी त्यांची संमती घेणे आवश्यक असते. ही प्रक्रिया एनटीएच्या डॅशबोर्डवर होते, जिथे सर्व चाचणी केंद्रांची मूळ यादी अपलोड केली जाते आणि एनटीएच्या वतीने परीक्षा आयोजित करण्यासाठी त्यांची संमती घेतली जाते.

केंद्रांच्या निवडीचे निकष काय?

प्रत्येक वेळी या यादीत नवीन केंद्रे जोडली जातात. ही केंद्रे परीक्षेसाठी योग्य आहेत की नाही हे सुनिश्चित करणे आवश्यक असते. खरेतर, हा नियम सध्याच्या केंद्रांनाही लागू आहे. एनटीए परीक्षेच्या काही दिवसांच्या अगोदर सर्व परीक्षा केंद्रांची तपासणी करते. परीक्षा केंद्रांच्या ऑडिटसाठी तृतीय-पक्ष एजन्सीची नियुक्ती केली जाते.

पायाभूत सुविधा: केंद्रांमध्ये योग्य पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे, जसे की वर्गखोल्या, परीक्षा हॉल, आसन क्षमता, प्रकाश, हवा येण्यास जागा आणि सुरक्षितता. एनटीएच्या मूल्यमापनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे गर्दी टाळण्यासाठी केंद्राच्या प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या आसन क्षमतेची तुलना मंजूर क्षमतेशी करणे.

गैरप्रकार घडू नये: एनटीएच्या निकषातील आणखी एक महत्त्वाचा निकष म्हणजे परीक्षा केंद्रे ही कोचिंग संस्था किंवा या संस्थांच्या साखळीद्वारे चालवली जाणारी नसावीत. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी योग्य वातावरण मिळावे, हा या तपासणीचा उद्देश आहे.

प्रवेशयोग्यता: परीक्षा केंद्र अपंगांसह सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रवेशयोग्य असायला हवे. स्वच्छ सुविधा, जीवन सुरक्षेची अत्यावश्यक उपकरणे आणि इतर आवश्यक सुविधा जसे की प्रत्येक खोलीत घड्याळे आणि प्रौढही बसू शकतील अश्या मोठ्या बाकांची उपलब्धता, इत्यादी

हेही वाचा : मक्कामध्ये एक हजार हज यात्रेकरूंचा मृत्यू, मृतांमध्ये ६८ हून अधिक भारतीय; यात्रेकरूंच्या मृत्यूला जबाबदार कोण?

या निकषांव्यतिरिक्त, एनटीए प्रस्तावित परीक्षा केंद्रांच्या संदर्भात मागील अनुभवांचादेखील विचार करते. एनटीएच्या अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, सामान्यत: केंद्रांकडे भूतकाळातील चांगला रेकॉर्ड नसल्यास त्यांना काळ्या यादीत टाकले जाते. परीक्षा खोल्या तपासण्याव्यतिरिक्त, यात परीक्षा केंद्रामध्ये पुरुष/महिला विद्यार्थ्यांसाठी असणारे शौचालये अस्वच्छ आहेत की नाही, गेटवर सुरक्षा कर्मचाऱ्यांची उपस्थिती, अपंग विद्यार्थ्यांसाठी एक रॅम्पची सोयदेखील तपासली जाते. परीक्षा केंद्राने वरील सर्व बाबींमध्ये गुणवत्ता तपासणी उत्तीर्ण केली तरच परीक्षा आयोजित करण्यास केंद्राला मान्यता दिली जाते. या वर्षी, एनटीएद्वारे पूर्वपरीक्षेसाठी, परीक्षेदरम्यान आणि परीक्षाोत्तर ऑडिटसाठी तृतीय-पक्ष एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती.