फिलिपिन्सजवळ खोल समुद्रात मोठी दुर्घटना घडली. १.४ दशलक्ष तेल वाहून नेणारे जहाज समुद्रात बुडाल्याने तैवान, फिलिपिन्स आणि आग्नेय चीनच्या काही भागांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे १.४ दशलक्ष लिटर तेलाने भरलेले एमटी टेरा नोव्हा हे तेलवाहू जहाज गुरुवारी (२५ जुलै) मनिला खाडीत बुडाले. या दुर्घटनेत एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला; परंतु १६ जणांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर पर्यावरणाबाबतही गंभीर चिंता निर्माण झाली आहे. यामागचे नेमके कारण काय? जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एमटी टेरा नोव्हा’ची दुर्घटना नक्की कशी घडली?

एमटी टेरा नोव्हा हे जहाज फिलिपिन्समधील इलोइलो शहराकडे जात असताना अचानक बदललेले हवामान आणि जोरदार वाऱ्यांसह अतिवृष्टी यांमुळे उलटले. शुक्रवारी बीबीसीने दिलेल्या एका वृत्तात असे नमूद करण्यात आले होते की, ही गळती खूप दूरवर अनेक किलोमीटरपर्यंत पसरली आहे. मनिला उपसागरात तेलगळती झाली असल्यास, ती फिलिपिन्सच्या इतिहासातील सर्वांत मोठी दुर्घटना असेल; ज्यामुळे सागरी जीवन आणि किनारी परिसंस्था यांच्यावर त्याचा गंभीर परिणाम होईल, असे वृत्तात सांगण्यात आले होते.

एमटी टेरा नोव्हा हे जहाज फिलिपिन्समधील इलोइलो शहराकडे जात असताना अचानक बदललेले हवामान आणि जोरदार वाऱ्यांसह अतिवृष्टी यांमुळे उलटले. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा; ‘या’ ३ औषधांच्या किमतीत घट, रुग्णांना कसा होणार फायदा?

नुकसान कमी करण्यासाठी फिलिपिन्सचे कोस्ट गार्ड, बूम व स्किमर्स तैनात करण्यात आले आहेत. यूएस नॅशनल ओशनिक अॅण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) नुसार, बूम पाण्यावर तरंगत आहेत. बूम हे प्लास्टिक, धातू आणि इतर सामग्रीपासून तयार झालेले आहेत; जे तेलाचा प्रसार कमी करण्यास मदत करतात. पाण्यावरील तेल काढून टाकण्यासाठी आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागांत पोहोचण्यासाठी स्कीमर्स म्हणजेच बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.

समुद्रातील तेलाची साफसफाई कठीण का?

तेलाचे टँकर, ड्रिलिंग रिग, पाइपलाइन किंवा रिफायनरी यांचा समावेश असलेले अपघात नैसर्गिक आपत्ती, मानवी चुका किंवा उपकरणांमध्ये बिघाड झाल्यामुळे होऊ शकतात. तेलाचा प्रकार, गळतीचे प्रमाण, हवामानाची परिस्थिती आणि संवेदनशील परिसंस्थेची निकटता यांसारखे घटक पर्यावरणीय परिणामांसाठी महत्त्वाचे ठरतात. जेहा तेल पाण्यात पसरते, तेव्हा त्याचा प्रसार वेगात होतो. पाण्यापेक्षा तेलाची घनता कमी असल्यामुळे पाण्यावर एक थर तयार होतो; ज्यामुळे सूर्यप्रकाशात अडथळा निर्माण होतो. सूर्यप्रकाश ऑक्सिजन तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे; पण या अडथळ्यामुळे सूर्यप्रकाश पाण्याच्या आत पोहोचू शकत नसल्याने सागरी वनस्पती आणि फायटोप्लँक्टनमधील प्रकाशसंश्लेषणामध्ये व्यत्यय निर्माण होतो. या वनस्पती छोटे मासे आणि इतर सागरी प्राण्यांचे खाद्यान्न असते. त्यामुळे स्वाभाविकत: या वनस्पती अन्नसाखळीचा आधार आहेत. वनस्पती नसतील, तर अन्नसाखळीत व्यत्यय निर्माण होऊ शकतो.

सागरी प्राण्यांना, विशेषत: पृष्ठभागाजवळ असलेल्या प्राण्यांना विषारी संसर्गामुळे धोक्यांचा सामना करावा लागतो. पक्ष्यांच्या पिसांना तेल लागल्यामुळे ते उडण्याची क्षमता गमावू शकतात; ज्यामुळे त्यांना ‘हायपोथर्मिया’ होऊ शकतो किंवा ते बुडू शकतात. यूएस एन्व्हायर्न्मेंटल प्रोटेक्शन एजन्सी (ईपीए)देखील याच्या धोक्यांबद्दल सांगते. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही तेलगळतीमुळे पसरलेले तेल नष्ट करणे वा ते बाहेर काढणे आव्हानात्मक आहे. कारण- तेल वेगाने पसरते आणि समुद्राच्या लाटा व तीव्र जलप्रवाह यांमुळे साफसफाईमध्ये व्यत्यय येतो. तेलाचे विविध प्रकार असतात. तेलाच्या प्रकारांनुसार त्यांच्या गुणधर्मांमध्येही भिन्नता असते. काही प्रकारचे तेल पाण्यात बुडते किंवा ‘इमल्सीफाय’ होते; ज्यामुळे पाण्यापासून तेलाला वेगळे करणे अशक्य होते. रासायनिक विघटन करणाऱ्या पद्धतींमुळे सागरी जीवसृष्टीला हानी पोहोचू शकते.

सागरी प्राण्यांना, विशेषत: पृष्ठभागाजवळ असलेल्या प्राण्यांना विषारी संसर्गामुळे धोक्यांचा सामना करावा लागतो. (छायाचित्र-रॉयटर्स)

तेलगळतीचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो?

तेलगळतीचा परिणाम हा दीर्घकालीन आणि व्यापक स्वरूपाचा असतो. त्यामुळे सागरी परिसंस्था, अधिवास आणि स्थानिक अर्थव्यवस्था प्रभावित होते. तेलगळतीमुळे प्राण्यांची संख्या कमी होते, अन्नसाखळीत (उदा. सागरी वनस्पती, मासे) विषारी पदार्थ प्रवेश करतात आणि मानवासह उच्चस्तरीय भक्षकांनाही धोका निर्माण करतात. या जैवसंचयनामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या उदभवू शकतात आणि जैवविविधतेत घट होऊन संपूर्ण परिसंस्था विस्कळित होऊ शकते.

खारफुटी, प्रवाळ खडक प्रदेशांसारख्या किनारपट्टीच्या परिसंस्थांना विशेषत: धोका आहे. कारण- तेलामुळे हे अधिवास गुदमरू शकतात आणि त्यामुळे महत्त्वाच्या वनस्पती आणि प्राण्यांचे जीवन नष्ट होऊ शकते. अधिवासाची परिस्थिती पूर्वीसारखी होण्यास दशके लागू शकतात. काही प्रजाती नामशेष होऊ शकतात. त्याशिवाय मासेमारी आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या समुदायांना आर्थिक सामना करावा लागू शकतो. समुद्रातून तेलाची साफसफाई करणे ही प्रक्रिया बहुधा खर्चीक असते आणि त्याला जास्त कालावधी लागू शकतो.

भूतकालीन तेलगळतीच्या घटनांचे सागरी परिसंस्थेवर दुष्परिणाम

भूतकाळातील तेलगळतीच्या काही घटनांमुळे मोठमोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. १९८९ मधील एक्सॉन व्हॅल्डेझ हे तेलवाहू जहाज धडकल्याने कच्च्या तेलाची गळती झाली होती. ही गळती सर्वांत वाईट प्रकरणांपैकी एक होती. या गळतीमुळे अलास्काच्या समुद्रात ११ दशलक्ष गॅलन कच्चे तेल वाहून गेले. या तेलगळतीमुळे अंदाजे २,५०,००० समुद्री पक्षी, २,८०० समुद्री ओटर्स, ३०० हार्बर सील, २५० बाल्ड ईगल, तब्बल २२ शिकारी व्हेल आणि कोट्यवधी सॅल्मन व हेरिंगची अंडी नष्ट झाली.

साफसफाईच्या व्यापक प्रयत्नांनंतरही या प्रदेशाचे पर्यावरणीय नुकसान होतच आहे आणि या परिसरातील समुद्री प्राणी अद्याप तेलगळतीमुळे बसलेल्या आकस्मिक धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस)च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, विशिष्ट माशांच्या लोकसंख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. तसेच, केल्प जंगले आणि इतर आवश्यक अधिवास पुनर्संचयित करण्यात आव्हाने दिसून येत आहेत.

हेही वाचा : आसामचे पिरॅमिड म्हटलं जाणाऱ्या चराईदेव मोईदामला हेरिटेज दर्जा; काय आहे या ठिकाणाचं महत्त्व?

त्याचप्रमाणे २०१० मधील डीप वॉटर होरायझनच्या दुर्घटनेमुळे ८७ दिवसांत मेक्सिकोच्या समुद्रामध्ये अंदाजे २१० दशलक्ष गॅलन तेलगळती झाली. यूएसजीएसच्या अभ्यासात या गळतीमुळे प्राण्यांच्या लोकसंख्येतील घट आणि खोल समुद्रातील परिसंस्थेचे गंभीर नुकसान नोंदवण्यात आले. सागरी परिसंस्थेला पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How oil spills impact the environment rac
Show comments