गेल्या काही वर्षांत पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती बिघडत असल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी अन्नधान्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी लावलेल्या रांगांचे, दरवाढीचे पाकिस्तानातील अनेक व्हिडीओ समोर आले; ज्यामुळे पाकिस्तानातील परिस्थितीचे चित्र संपूर्ण जगाने पाहिले. त्याचमुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेला पाकिस्तान गेल्या कित्येक महिन्यांपासून आखाती देशांमध्ये आपल्या देशातील भिकार्‍यांची निर्यात करत असल्याची माहिती आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये अटक करण्यात येणारे बहुतांश भिकारी पाकिस्तानातील आहेत. आता सौदी अरेबियाने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. हा इशारा शस्त्रे किंवा भू-राजकीय कारणामुळे नसून भिकार्‍यांमुळे देण्यात आला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली देशात प्रवेश करणाऱ्या भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येबाबत सौदी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी सौदी अरेबियाने पाकिस्तानला सांगितले की, जर परिस्थिती नियंत्रित केली गेली नाही तर त्याचा देशातील उमराह आणि हज यात्रेकरूंवर नकारात्मक परिणाम होईल. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानचे धार्मिक व्यवहार मंत्रालय ‘उमराह कायदा’ आणत आहे. या कायद्यांतर्गत धार्मिक सहलींची सुविधा देणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सींचे नियमन करण्यात येईल आणि त्यांना कायदेशीर कक्षेत आणता येईल. विशेष म्हणजे सौदीने या प्रकरणावर चिंता व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही पाकिस्तानला सौदी अरेबियाने हज यात्रेदरम्यान राज्यात घुसलेल्या भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येबद्दल इशारा दिला होता.

हेही वाचा : पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘ISI’चे नवीन प्रमुख मुहम्मद असीम मलिक कोण आहेत? हे पद महत्त्वाचे का आहे?

नेमकं प्रकरण काय?

‘डॉन’च्या एका वृत्तानुसार, परदेशात अटक करण्यात आलेल्या भिकाऱ्यांपैकी ९० टक्के भिकारी पाकिस्तानचे आहेत. सिनेटच्या परदेशी पाकिस्तानींच्या स्थायी समितीने सांगितले आहे की, देश सोडून जाणाऱ्या सर्व लोकांपैकी भिकारी सर्वात जास्त जात आहेत. विदेश मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी देश सोडत असलेल्या कुशल आणि अकुशल कामगारांच्या प्रश्नावर सिनेट पॅनेलमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान हा खुलासा केला. हैदर म्हणाले की, सुमारे तीस लाख पाकिस्तानी सौदी अरेबियामध्ये आहेत, १.५ दशलक्ष पाकिस्तानी यूएईमध्ये आहेत, तर ०.२ दशलक्ष कतारमध्ये आहेत. हैदरने समितीला सांगितले की, अनेक भिकारी सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये जाण्यासाठी यात्रेकरू व्हिसाचा गैरफायदा घेतात. तिथे पोहोचल्यावर ते भीक मागायला लागतात.

परदेशात अटक करण्यात आलेल्या भिकाऱ्यांपैकी ९० टक्के भिकारी पाकिस्तानचे आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने हैदर यांच्या खुलाशावर म्हटले आहे की, “भिकारी मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान सोडत आहेत. ते उमराहसाठी म्हणून यात्रेकरू व्हिसाचा गैरफायदा घेऊन परदेशात जातात आणि भीक मागतात.” मक्का येथील ग्रँड मशिदीसह पवित्र स्थळांवर भीक मागणारे लोक पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती आहे. पाकिस्तानचे सौदी अरेबियातील सचिव झीशान खानजादा यांनी सांगितले की, सौदी अरेबियातील १० दशलक्ष पाकिस्तानी नागरिकांपैकी मोठ्या संख्येने नागरिक भीक मागत आहेत, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

सौदी अरेबियाने पाकिस्तानला फटकारले

याआधीही सौदी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला हज कोट्यासाठी उमेदवार निवडताना काळजी घेण्यास सांगितले होते. सौदी अरेबियाने म्हटले आहे की, अटक करण्यात आलेले ९० टक्के भिकारी पाकिस्तानचे आहेत. या व्यक्ती उमराह व्हिसावर देशात आल्या आहेत. त्याविषयी सौदी अरेबियातील पाकिस्तानचे विदेश सचिव झीशान खानजादा यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानला सांगितले की, “आमचे तुरुंग तुमच्या कैद्यांनी भरलेले आहेत.” पाकिस्तानी भिकार्‍यांमुळे सौदी अरेबियातील तुरुंग भरल्यामुळे अधिकारी तक्रार करत आहेत.

मक्का येथील मशीद अल-हरमजवळील सर्व पाकीटमारही पाकिस्तानचे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सूत्रांनी ‘न्यूज १८’ ला सांगितले की, अशा लोकांना उमराह व्हिसा दिला जात असल्याने सौदी अरेबिया चिंतेत आहे. ते म्हणतात की, अशा व्यक्तींना रोजगार पत्र दिले जात नाहीत, कारण ते कुशल कामगार नसतात. सौदी नियोक्ते सहसा भारत आणि बांगलादेशातील कामगारांवर अवलंबून असतात. संयुक्त अरब अमिरातीने डिसेंबरमध्ये पाकिस्तानातून येणाऱ्या पर्यटकांवर व्हिसा बंदी वाढवली होती. मागील २२ वरून ही बंदी २४ शहरांमध्ये वाढवण्यात आली होती.

“भारत चंद्रावर पोहोचला आणि आपण अजून इथेच”

विदेश मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर म्हणाले की, मोठ्या संख्येने भिकाऱ्यांच्या स्थलांतरामुळे मानवी तस्करी वाढली आहे. आता या लोकांसाठी जपान एक नवीन गंतव्यस्थान म्हणून उदयास आले आहे. हैदर यांनी कुशल कामगारांच्या निर्यातीत पाकिस्तानच्या ऐतिहासिक भूमिकेवर भर दिला. जेव्हा व्यावसायिक परदेशात जातात तेव्हा देशाच्या परदेशी रेमिटन्समध्ये वाढ होते. सौदी अरेबियाने अप्रशिक्षित व्यक्तींपेक्षा कुशल कामगारांना प्राधान्य दिले आहे, असे ‘डॉन’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. पाकिस्तानातील तब्बल ५० हजार अभियंते बेरोजगार असल्याचेही हसन यांनी नमूद केले.

“भारत चंद्रावर पोहोचला आहे, आपण इथेच अडखळलो आहोत,” असेही ते म्हणाले. गेल्या ऑगस्टमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले होते की, त्यांचा देश जगाकडून पैशांची भीक मागत आहे आणि भारत चंद्रावर पोहोचला आहे व जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. शरीफ यांनी पाकिस्तानच्या आर्थिक संकटासाठी माजी जनरल आणि न्यायाधीशांना दोष दिला. पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून ढासळत चालली आहे; ज्यामुळे मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. त्याचा परिणाम देशातील गरीब जनतेवर होत आहे. “आज पाकिस्तानचे पंतप्रधान देशोदेशी जाऊन निधीची भीक मागतात, तर भारत चंद्रावर पोहोचला आहे. भारताने केलेले पराक्रम पाकिस्तान का करू शकला नाही, याला जबाबदार कोण?” असे शरीफ म्हणाले.

हेही वाचा : चार दिवसांत १४ लाख लाडवांची विक्री; जनावरांच्या चरबीचा वाद तरीही भाविकांकडून लाडूखरेदी; कारण काय?

पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे नेते नवाझ शरीफ पुढे म्हणाले की, १९९० मध्ये त्यांच्या सरकारने सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांचे भारताने पालन केले होते. जेव्हा अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा भारताचा परकीय चलनाचा साठा एक अब्ज डॉलर्स होता, जो आज ६०० अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे,” असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How pakistan export beggars to saudi arabia rac
Show comments