मोहन अटाळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार महिन्यांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण झाले. आतापर्यंत या महामार्गावर नऊशेहून अधिक अपघात झाले आहेत आणि ३५च्या वर प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत असल्याचे प्रमुख कारण समोर आले आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पण, ज्या उद्देशाने या महामार्गाची उभारणी करण्यात आली, तो पूर्ण होतोय का, हा कळीचा प्रश्न आता चर्चेत आला आहे.
समृद्धी महामार्गाचा उद्देश काय?
मुंबई आणि नागपूर या दोन महानगरांना जोडणारा महाराष्ट्रातील पहिला सर्वाधिक लांबीचा द्रुतगती महामार्ग पूर्णपणे तयार झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी १६ तासांऐवजी आठ तास लागणार आहेत. समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांना जोडतो. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जात आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होईल. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाड्यातून भाजीपाला, फळे, इतर काही वस्तू जलद वाहतुकीच्या मदतीने मुंबईत पोहोचवणे सोपे होईल, असे सांगण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गाची सद्यःस्थिती काय आहे?
सुमारे ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी या ५२० किमी अंतराचे काम पूर्ण झाल्यानंतर ११ डिसेंबर २०२२पासून हा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. उर्वरित काम सुरू आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर ८ ओव्हरपास आणि ७६ विविध संरचना बांधण्यात आल्या आहेत. त्यात २२ अंडरपास, २ पूल, ४४ बॉक्स कल्वर्टस आणि ८ लहान पुलांचा समावेश आहे. पण, तरीही अनेक भागांत वन्यप्राणी रस्त्यावर आल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत.
समृद्धी महामार्गावर अपघात कशामुळे होताहेत?
समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर शंभर दिवसांतच तब्बल ९०० अपघात आणि ३१ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभ्यासातून समोर आले. अपघातांचे सत्र अजूनही थांबलेले नाही. वाहनांच्या अतिवेगाने यांत्रिक बिघाड होऊन ४६ टक्के अपघात झाले आहेत. १५ टक्के अपघात टायर पंक्चर झाल्यामुळे तर १२ टक्के अपघात टायर फुटल्यामुळे झाले आहेत. चालक झोपी जाणे, यांत्रिकरित्या अयोग्य वाहने आणि प्राणी प्रवेश करणे ही अपघाताची प्रमुख कारणे असल्याचेही समोर आले आहे. समृद्धी महामार्गावर वळणे कमी असली, तरी अतिवेगाची धुंदी अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले. शिवाय लेनची शिस्त न पाळल्यामुळे देखील अनेक अपघात घडले आहेत. काही ठिकाणी माकडांचा वावर, वन्यप्राणी रस्त्यावर अचानकपणे आडवे आल्यानेही दुर्घटना घडून आल्या आहेत.
अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आणि या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश नुकतेच दिले. समृद्धी महामार्गाच्या आठही प्रवेश ठिकाणांवर समुपदेशन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सोबतच महामार्गावर विविध ठिकाणी जनजागृती करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. आता त्यात समृद्धी महामार्गावर टायरची तपासणी केली जात आहे. ‘ट्रेड डेप्थ इंडिकेटर’ने टायरच्या रबरची घनता तपासण्यात येत आहे. टायर झिजलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावरून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वाहनतज्ज्ञांचा सल्ला काय आहे?
समृद्धी महामार्गाची डावीकडची पहिली लेन जड वाहनांसाठी असून कमाल वेग ८० किमीचा आहे. त्याच्या बाजूला कार व इतर वाहनांची लेन असून वेग १२० चा आहे. उजवीकडे सर्वात शेवटची ओव्हरटेक लेन आहे. लेन बदलताना सावधगिरी न बाळगल्यास अपघातांचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाहनाचे टायर हे सुरक्षित प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात, ते योग्य स्थितीत नसल्यास दुर्घटना घडू शकते. टायरमधील हवेची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात रस्त्याचे तापमान प्रचंड वाढते. त्यातच वाहनांचा वेग आणि सातत्याने वाहन चालवल्यास टायरचे तापमान वाढून टायर निकामी होण्याची शक्यता असते. टायरमध्ये नायट्रोजनयुक्त हवा भरावी, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
mohan.atalkar@expressindia.com