सध्या ओपेनहाइमर हा चित्रपट अनेक अर्थाने गाजत आहे. या चित्रपटातील कथानकाच्या भारतीय संबंधांमुळे भारतात या चित्रपटाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अणुबॉम्बचे जनक हा भौतिकशास्त्रज्ञ ओपेनहाइमर यांचा महत्त्वाचा परिचय. त्यांच्या नेतृत्त्वाखाली तयार झालेल्या अणुबॉम्बचा वापर जपानवरील हल्ल्यात झाला. हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे बेचिराख झाली आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे अनेकदा ओपेनहाइमर यांना या अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी दोषी मानले जाते. चित्रपटाचे कथानक त्यांच्या याच प्रवासाभोवती फिरते. ‘अमेरिकन प्रमिथियस: द ट्रायम्फ अॅण्ड ट्रॅजेडी ऑफ जे रॉबर्ट ओपेनहाइमर’ या चरित्राला प्रधान मानून या चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे. हे चरित्र मार्टिन जे शेर्विन आणि काई बर्ड यांनी लिहिले आहे. या पुस्तकात ओपेनहाइमर यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघड केल्या आहेत त्यातील एक गोष्ट थेट भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्याशी निगडित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय नागरिकत्वाची गोष्ट?

‘अमेरिकन प्रमिथियस: द ट्रायम्फ अॅण्ड ट्रॅजेडी ऑफ जे रॉबर्ट ओपेनहाइमर’ या चरित्रात ओपेनहायमर यांना भारतात स्थायिक होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, असा दावा करण्यात आला आहे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अणुबॉम्बचे जनक ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर यांना १९५४ मध्ये अण्वस्त्रांविरोधातील विधानांवरून अमेरिकेत झालेल्या अपमानानंतर भारतीय नागरिकत्त्व देऊ केले, असे यात नमूद करण्यात आले आहे. लेखकाने म्हटल्याप्रमाणे ओपेनहाइमर यांनी या प्रस्तावाकडे फारसे लक्ष दिले नाही. या मागे त्यांची अमेरिकेसाठी असणारी देशभक्ती कारणीभूत होती.

आणखी वाचा : Oppenheimer movie: अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाचे विराट रूप का आठवले होते? 

ओपेनहायमर यांनी अणुबॉम्ब का तयार केला?

ओपेनहायमरला यांना फॅसिझमच्या उदयाची भीती वाटत होती. “ते मूलतः ज्यू वंशाचे होते, जर्मनीतून ज्यू निर्वासितांची सुटका करण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली होती. त्यांना भीती होती की, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिटलरला अणुबॉम्ब तयार करून देणार आहेत, त्यामुळे हिटलर युद्ध जिंकू शकेल आणि त्याचा भयानक परिणाम जगाला भोगावा लागेल, हा जगभरातील फॅसिझमचा विजय असेल. त्यामुळे हिटलरच्या विध्वंसक कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांना अणुबॉम्बची निर्मिती आवश्यक वाटली होती. परंतु ऑगस्ट १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यांनंतर मात्र त्यांच्या भावना बदलल्या.

ओपेनहायमर यांचा अमेरिकन सरकारकडून अपमान का करण्यात आला?

अणुबॉम्ब निर्मितीच्या मॅनहॅटन प्रकल्पावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनाही मूलतः आपण अणुबॉम्ब का तयार करत आहोत, हा प्रश्न पडला होता. याच अणुबॉम्बचा वापर हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावरील हल्ल्यात झाला. या हल्ल्यात झालेली प्रचंड जीवितहानी पाहून ओपेनहायमर हे निराशेच्या खोल गर्तेत ढकलले गेले आणि त्यांनी अणुबॉम्ब हल्ल्याविरोधी विधान केले, त्यामुळे तत्कालीन अमेरिकन सरकारकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात आला, त्यांचा संबंध कम्युनिझमशी असल्याचा आरोप करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांना देण्यात आलेले संरक्षणही काढून घेण्यात आले होते.

आणखी वाचा : विश्लेषण: लुटारू ब्रिटिश(?): राजघराण्यानेच घातला होता दरोडा !

ओपेनहाइमर आणि डॉ. भाभा

ओपेनहाइमर यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरच पंडित नेहरू यांच्याकडून त्यांना भारतीय नागरिकत्त्वासाठी आमंत्रण देण्यात आले. काई बर्ड यांनी याविषयी नमूद करताना सांगितले की ‘ओपेनहायमार हे देशभक्त होते, त्यामुळे त्यांनी या आमंत्रणाकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु याच प्रसंगाचे वर्णन बख्तियार के दादाभॉय यांनी देखील केले आहे, दादाभॉय यांनी होमी जहांगीर भाभा यांचे ‘होमी जे भाभा: अ लाइफ’ हे ७२३ पानांचे चरित्र लिहिले आहे, यंदा म्हणजेच २०२३ सालच्या एप्रिलमध्ये ते प्रकाशित झाले. या पुस्तकात ओपेनहाइमर आणि डॉ. होमी भाभा यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे १९५४ साली ओपेनहाइमर यांनी त्यांची सुरक्षा गमावल्यानंतर होमी भाभा यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना जवाहरलाल नेहरूंनी अनेकदा भारताला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते, आणि त्यांची इच्छा असल्यास स्थलांतरित होण्याचेही निमंत्रणही दिले. हे आमंत्रण म्हणजे एका संशोधक मित्राची (डॉ. भाभा) दुसऱ्या संशोधक मित्राला (ओपेनहाइमर) त्याच्या कठीण काळात आपण त्याच्या पाठीशी उभे असल्याची शाश्वतीच होती. परंतु आपण सर्व आरोपांमधून मुक्त होत नाही तोपर्यंत अमेरिका सोडणे योग्य नसल्यामुळे तसेच तसे केल्यास आपल्याबद्दल संशयास जागा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगून ओपेनहायमार यांनी हे आमंत्रण नाकारले.

ओपेनहायमर आणि भगवद् गीता

ओपेनहायमर यांना गूढवाद आणि तत्त्वज्ञान यात असलेल्या आकर्षणामुळे गीतेमध्ये रस निर्माण झाला होता, अणुबॉम्बच्या चाचणीच्या वेळी भव्य स्फोटात श्री कृष्णाच्या विराट रूपाचे दर्शन झाले, असे त्यांनीच नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर जपानवरील स्फोटानंतर नैराश्यातून बाहेर पाडण्यासाठीही गीतेचेच तत्त्वज्ञान उपयोगी पडले, याचाही उल्लेख ओपेनहाइमर यांनी केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How was the relationship between two nuclear scientists father of atomic bomb j robert oppenheimer and dr homi j bhabha oppenheimer movie svs
Show comments