मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. हे होत असताना रस्त्यांचे काँक्रीटीकरण, रुंदीकरण आणि नव्या रस्त्यांची उभारणीची कामेही वेगाने सुरू आहेत. जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधून अनेक राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जातात. या रस्त्यांची एकमेकांमध्ये संलग्नता नसल्याने एका महामार्गावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता शहरांच्या मधून अंतर्गत प्रवासाचा मोठा फेरा मारावा लागतो. हा फेरा कमी व्हावा आणि अंतर्गत प्रवास वेगाने करता यावा यासाठी महामार्गामध्ये संलग्नता तसेच अंतर्गत रस्त्यांचे वर्तुळाकार जाळे तयार करण्याचा विचार मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या स्तरावर सुरू झाला आहे. कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मध्यंतरी आयोजित केलेल्या एका बैठकीदरम्यान प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत या आखणीवर काम करण्याचे नक्की करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महामार्गांमध्ये संलग्नता गरजेची का आहे?

ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला अनेक प्रकल्पांची, त्यातही रस्ते रुंदीकरण, काँक्रीटीकरण, नवे उड्डाणपूल, वर्तुळाकार रस्त्यांची उभारणी केली जात आहे. ठाणे शहराच्या पलीकडे मुंब्रा, कळवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, भिवंडी ही शहरे आहेत. या सर्व शहरांच्या शेजारून विविध महामार्ग जातात. काटई-कर्जत राज्यमार्ग, कल्याण-बदलापूर राज्यमार्ग, कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, खोणी-तळोजा मार्ग, शिळफाटा मार्ग, ऐरोली-काटई उन्नत मार्ग, कल्याण वर्तुळाकार रस्ता असे महत्त्वाचे मार्ग गेल्या काही वर्षात विकसित झाले आहेत. अजूनही काही विकसित होत आहेत. हे मार्ग एकमेकांना जलद गतीने वाहतूक करण्यासाठी जोडले गेलेले नाहीत. सध्याच्या घडीला कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई-आग्रा महामार्गावर जाण्यासाठी कल्याण, कोनगाव येथील कोंडी, दुसरीकडून खडक पाडा ते सावदमार्गे पडघा आणि पुढे गोवेली येथून टिटवाळा मंदिराच्या शेजारून अरुंद रस्त्यातून प्रवास करावा लागतो. कल्याण-अहमदनगर महामार्ग, कल्याण-बदलापूर राज्यमार्ग आणि कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरून जुना पुणे लिंक रस्ता किंवा काटई मार्गावर जाण्यासाठीही कोंडीचा शहरांतर्गत प्रवास करावा लागतो. या सर्व महामार्गांमध्ये संलग्नता नसल्याने एका महामार्गावरून दुसऱ्या महामार्गावर जाण्यासाठी तसेच शहरातून कोणत्याही महामार्गांवर पोहोचण्यासाठी दहा मिनिटे ते ३० मिनिटे वेळ खर्च करावा लागतो.

हेही वाचा : विश्लेषण : आक्रमक भाषेतून ओबीसींच्या राजकारणाला बळ; छगन भुजबळ यांची हुकमी रणनीती?

महामार्गांमध्ये संलग्नता आल्याने काय होणार?

शहरांपासून महामार्गांपर्यंत पोहोचण्यासाठी वर्तुळाकार रस्ते उभारण्याची संकल्पना नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली. या संकल्पनेनुसार शहर आणि महामार्ग तसेच दोन महामार्ग यांच्यामध्ये वर्तुळाकार रस्त्यांची निर्मिती करायची, जेणेकरून शहरांमधून प्रवास टाळता येईल आणि महामार्गांवर अवघ्या पाच ते सात मिनिटात पोहोचता येईल. सोबतच दोन महामार्ग एकमेकांना जोडल्याने शहरांतर्गत प्रवास टाळता येईल. महामार्गाने जोडणारे हे वर्तुळाकार रस्ते नियंत्रित असतील. त्यामुळे इतर अनावश्यक वाहतूक टाळून प्रवास करता येणार आहे. तसेच महामार्ग गाठण्यासाठी शहरातून प्रवास करावा लागणार नाही.

महामार्ग संलग्नता कशी शक्य आहे?

बदलापूरसारख्या शहरातून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पोहोचण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ खर्च घालावा लागतो. तसेच कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर पोहोचण्यासाठीही बदलापूरवरून साधारणतः अर्धा ते पाऊण तासाचा वेळ जातो. बदलापूर ते कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग आणि येथील गोवेली येथून उभारण्यात येत असलेला कल्याण वर्तुळाकार रिंग रोड रस्त्यावरून मुंबई-आग्रा महामार्गाला संलग्न रस्ता उभारल्यास पाच ते सात मिनिटांचा प्रवास करून महामार्ग गाठता येणार आहे. यासाठी दोन महामार्गांमध्ये रस्त्याची उभारणी करावी लागणार आहे. या मार्गावर वाहतूक नियंत्रित केल्यास इतर वाहतूक टाळून वाहंनाना थेट महामार्गावर पोहोचता येणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण: गारपीट का झाली? तिने  किती नुकसान केले?

उड्डाणपूल, उन्नत मार्ग आणि जोडरस्ते किती महत्त्वाचे?

महामार्ग संलग्नतेसोबतच शहरांतर्गत वाहतूक टाळण्यासाठी पुन्हा तुम्हाला रुंदीकरण आणि जोड रस्त्यांची उभारणी करण्यावर एमएमआरडीएच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. शहाड येथील उड्डाणपुलाचे रुंदीकरण कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कल्याण-बदलापूर राज्य मार्गावर शांतीनगर ते अंबरनाथ उन्नत मार्ग उभारल्यास उल्हासनगरच्या आतील वाहतूक टाळून प्रवास सहजपणे करणे शक्य होणार आहे. विठ्ठलवाडी ते कल्याण उन्नत मार्ग उभारल्यानंतर चाळीस मिनिटांचा वेळ पाच मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे महामार्ग संलग्नता वाहतुकीचा वेळ कमी करण्यासह जलद प्रवासाची संधी उपलब्ध करून देता येणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district mmrda new projects to connect highways to solve the traffic problems print exp css
Show comments