Bharat and Pakistan Basmati Rice Conflict बासमती तांदूळ निर्यातीत पाकिस्तान भारताच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ‘रॉयटर्स’मधील वृत्तानुसार, पाकिस्तानच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यांच्याकडून कमी किमतीत तांदूळ देण्यात येणार असल्याने, २०२४ मध्ये तांदळाच्या विशिष्ट ‘लाँग-ग्रेन’ जातीची भारतातील निर्यात कमी होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे भारतातील तांदळाचे उत्पादनही गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच घसरू शकते, असे सरकारने गुरुवारी (२९ फेब्रुवारी) एका निवेदनात म्हटले आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सांगण्यानुसार, तांदूळ उत्पादन १२३.८ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, अशी बातमी एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या बासमती तांदळाची निर्यात कमी होण्याची शक्यता

खरेदीदारांना पाकिस्तान स्वस्त किमतीत तांदूळ देणार असल्याने भारताच्या बासमती तांदळाची निर्यात कमी होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी देश तांदळाच्या या प्रीमियम जातीचे एकमेव जागतिक निर्यातदार आहेत. २०२३ मध्ये भारताच्या बासमती तांदळाची निर्यात ४.९ दशलक्ष मेट्रिक टन होती; जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ११.५ टक्क्यांनी वाढली असल्याचे उद्योग अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले. केंद्राने गेल्या ऑगस्टमध्ये सुगंधी तांदळाच्या निर्यातीवर १२०० डॉलर्स प्रतिटन दराने किमान निर्यात किंमत (एमईपी) लावली होती; जी नंतर ऑक्टोबरमध्ये ९५० डॉलर्स प्रतिटन करण्यात आली होती. असे असले तरीही बासमती तांदूळ निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे.

किमान निर्यात किंमत लागू झाल्यानंतर भारतीय बासमती तांदळाच्या निर्यातीला गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये फटका बसला होता. पण, यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले, असे नवी दिल्लीस्थित निर्यातदाराने ‘रॉयटर्स’ला सांगितले. पंजाब मिलर्सनी त्यावेळी इशारा दिला होता की, यामुळे राज्यांतील तांदूळ उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान होईल आणि पाकिस्तानच्या निर्यात उद्योगाला याचा फायदा होईल, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.

बासमती तांदूळ निर्यात हा भारताच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत

बासमती तांदूळ निर्यात हा भारताच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सुगंधित तांदळाच्या निर्यातीमुळे गेल्या वर्षी भारताला ५.४ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळविण्यास मदत झाली; ज्यात २०२२ च्या तुलनेत जवळपास २१ टक्क्यांनी वाढ झाली. बासमती तांदळाची देशांतर्गत मागणी एकूण उत्पादनाच्या केवळ दोन ते तीन टक्के आहे. बासमती पिके भारत सरकार घेत नसून, खासगी व्यापारी आणि निर्यातदार घेतात, असे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने आपल्या वृत्तात सांगितले आहे.

दक्षिण आशियातील बासमती तांदळाचा सर्वांत मोठा खरेदीदार असलेल्या इराणच्या निर्यातीत २०२३ मध्ये ३६ टक्क्यांनी घट झाली होती. परंतु, या काळात इराक, ओमान, कतार व सौदी अरेबियाकडून तांदळाची जास्त मागणी असल्याने ही दरी भरून काढण्यास मदत झाली, असे ‘रॉयटर्स’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या जानेवारीत भारतीय बासमती तांदळाची निर्यात कमी झाली आहे आणि पुढील काळात आणखी घसरण होऊ शकते, असे वृत्तसंस्थेने सांगितले आहे. राईस एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पाकिस्तान (आरईएपी)चे अध्यक्ष चेला राम केवलानी यांच्या मते, इस्लामाबादची एकूण तांदूळ निर्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात पाच दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ही निर्यात ३.७ दशलक्ष टन होती.

भारत आणि पाकिस्तानचे बासमती तांदूळ

भारत आणि पाकिस्तान हे दोघेच बासमती तांदळाचे जागतिक पुरवठादार असल्याने, या दोन्ही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेहमीच स्पर्धा पाहायला मिळाली आहे. भारतात बासमतीच्या ३४ जातींची लागवड केली जाते; तर पाकिस्तानात २४ जातींची लागवड होते. अमेरिकेच्या एका ब्रॅण्डने टेक्सासमध्ये उगवलेल्या बासमती तांदळाच्या प्रकारांवर पेटंट दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोघांनी यावर आक्षेप घेतला आणि खटला जिंकला. बासमतीच्या संरक्षणासाठी भारताला सुगंधित तांदळासाठी त्यांचे भौगोलिक उत्पादन क्षेत्र निश्चित करणे आवश्यक आहे. त्यामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर व दिल्लीचा समावेश आहे.

हेही वाचा : Reliance and Disney Hotstar: रिलायन्स आणि डिस्ने यांच्यात सर्वात मोठा करार; देशातील माध्यम-मनोरंजन उद्योगांना कसा होणार फायदा?

भारताच्या बासमती तांदळाला पीजीआय टॅग

काही वर्षांपूर्वी भारताने युरोपियन यूनियनमध्ये बासमती तांदळाचे प्रोटेक्टेड जिऑग्राफिकल इंडिफिकेशन (पीजीआय) भारताला द्यावे यासाठी अर्ज केला. याला पाकिस्तानने तीव्र विरोध केला. युरोपियन युनियनमध्ये भारताच्या बासमती तांदळाला पीजीआय टॅग देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशिष्ट गुणवत्तेसाठी पीजीआय टॅग दिला जातो. भारतीय तांदूळ निर्यातदार संघटनेचे माजी अध्यक्ष सेतिया यांनी २०२१ मध्ये ‘एएफपी वृत्तसंस्थे’ला सांगितले होते, “भारत आणि पाकिस्तान गेल्या ४० वर्षांपासून वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये तांदळाची निर्यात करीत आहे. तेव्हापासून दोघांमध्येही स्पर्धा राहिली आहे. पीजीआय टॅगमुळे यात काहीही बदल होणार नाही,” असे ते म्हणाले. गेल्या डिसेंबरमधील ‘बिझनेसलाइन’च्या अहवालानुसार, युरोपियन युनियन भारतीय बासमती तांदळाला पीजीआय टॅग प्रदान करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे पाकिस्तान नक्कीच नाराज होईल. आतापर्यंत फक्त भारतीय दार्जिलिंग चहालाच पीजीआय दर्जा मिळाला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India basmati rice shipment is likely to plunge what is the reason rac
Show comments