INS Jatayu Lakshadweep गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि मालदीवमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळत आहे. चीनच्या दबावाखाली मालदीवचे राष्ट्रपती यांनी भारतीय सैन्य, विमाने माघारी नेण्यास सांगितले. परंतु मालदीवच्या निर्णयाचा परिणाम त्यांनाच अडचणीत टाकणार आहे. भारताने कुटनीती वापरत लक्षद्वीपमधील मिनिकॉयमध्ये नवीन लष्करी तळ सुरू केला आहे; ज्याचा थेट परिणाम मालदीववर होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेव्हल डिटेचमेंट मिनीकॉयमध्ये असणारा आयएनएस जटायू हा लष्करी तळ लक्षद्वीप बेटांवर सुरक्षा आणि पायाभूत सुविधा वाढवण्याच्या भारतीय नौदलाच्या संकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाईल. आयएनएस जटायू कार्यान्वित झाल्यामुळे भारतीय नौदल लक्षद्वीप बेटांवर आपले पाऊल बळकट करेल. नेव्हल डिटेचमेंट मिनीकॉयची स्थापना १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला लक्षद्वीपचे नौदल अधिकारी-इन-चार्ज यांच्या ऑपरेशनल कमांड अंतर्गत करण्यात आली होती. आयएनएस जटायू लक्षद्वीपमधील देशाचा दूसरा लष्करी तळ आहे. नौदलाचा पहिला लष्करी तळ कावरत्ती येथील आयएनएस द्वीरक्षक आहे; जो २०१२ साली सुरू करण्यात आला होता.

आयएनएस जटायू कार्यान्वित झाल्यामुळे भारतीय नौदल लक्षद्वीप बेटांवर आपले पाऊल बळकट करेल. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे अध्यक्ष प्रविंद जुगनाथ यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम हिंदी महासागरातील मॉरिशसच्या अगालेगा बेटावर भारताने बांधलेल्या हवाई पट्टी आणि जेटीचे उद्घाटन केले होते. ज्याच्या काही दिवसांनंतर आयएनएस जटायू लष्करी तळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय नौदलाची जहाजे, लष्करी तळ आणि तुकड्यांच्या नावापुढे आयएनएस लावण्यात येते.

लक्षद्वीप बेटे

लक्षद्वीप या नावाचा अर्थ संस्कृत आणि मल्याळम भाषेत ‘एक लाख बेटे’ असा होतो. लक्षद्वीप ३६ बेटांचा एक द्वीपसमूह आहे. या बेटांपैकी केवळ ११ बेटांवर लोकवस्ती आहे; ज्याचे एकूण क्षेत्रफळ केवळ ३२ चौरस किमी आहे. लक्षद्वीप हा हिंद महासागरातील प्रवाळ बेटांच्या साखळीचाच एक भाग आहे; ज्यामध्ये दक्षिणेला मालदीव आणि त्याहून पुढे चागोस या द्वीपसमूहचा समावेश आहे. हिंदी महासागरातील या बेटाचे स्थान लक्षात घेता, लक्षद्वीप भारतासाठी खूप महत्वाचे आहे.

आयएनएस जटायू लष्करी तळ

नौदल अधिकारी-इन-चार्ज (लक्षद्वीप) च्या ऑपरेशनल कमांड अंतर्गत असलेल्या सध्याच्या नौदल तुकडीला स्वतंत्र नौदल युनिटमध्ये रूपांतरित केले जाणार असल्याचे, नौदलाच्या निवेदनात सांगण्यात आले आहे. नौदलाच्या तुकडीत प्रशासकीय, रसद आणि वैद्यकीय सुविधा असतील. पर्यावरणीय आणि इतर मंजुऱ्या मिळाल्यानंतर आयएनएस जटायूला अतिरिक्त पायाभूत सुविधांसह अपग्रेड केले जाईल. सूत्रांनी सांगितले की, बेटाच्या नाजूक पर्यावरणीय स्थितीमुळे जेटीच्या बांधकामासाठी आव्हाने निर्माण होऊ शकतात. परंतु या ठिकाणी लष्करी आणि नागरी दोन्ही विमाने चालवण्यास सक्षम असणारे नवीन एअरफील्ड बांधण्यात येणार आहे.

आयएनएस जटायूमुळे भारतीय नौदलाच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावरील ताकद वाढणार. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भारतासाठी ठरणार गेमचेंजर

नौदलाच्या म्हणण्यानुसार, आवश्यक पायाभूत सुविधा आणि संसाधनांसह स्वतंत्र नौदल युनिटच्या स्थापनेने हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात भारताची ताकद वाढेल. बेटांच्या सर्वसमावेशक विकासावर सरकार भर देत असून लष्करी तळाला कार्यान्वित करणे, त्याचाच एक भाग आहे. नौदलाने असेही म्हटले आहे की, या तळामुळे नौदलाच्या मोहिमांची पोहोच वाढेल. पश्चिम अरबी समुद्रात अंमली पदार्थाची तस्करी पकडण्यासारख्या मोहिमादेखील यामुळे सोप्या होतील.

हेही वाचा : दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास सरकारी नोकरी नाही- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण? कोणकोणत्या राज्यात अशी धोरणे आहेत?

आयएनएस जटायूमुळे भारतीय नौदलाच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावरील ताकदीत भर पडणार असून एअरफील्डवर लढाऊ विमानेही तैनात करण्यात येतील. मालदीव आणि चीन यांच्यातील हितगुज पाहाता हा लष्करी तळ भारतासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू सत्तेत आल्यापासून मालदीवशी भारताचे संबंध ताणले गेले आहेत. अशा वेळी या लष्करी तळाने मालदीवच्या अडचणीत वाढ होणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India new naval base ins jatayu in lakshadweep importance for country rac