जागतिक बाजारात तांदळाच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. भारताने बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर आणि पाकिस्तानने सर्व प्रकारच्या तांदळावरील किमान निर्यात किंमत काढून टाकल्यानंतर जागतिक बाजारातील तांदळाच्या दरांवर परिणाम झाला आहे. परंतु, भारत आणि पाकिस्तानच्या तांदूळ निर्यातीमुळे जागतिक स्तरावर किमती कशा घसरल्या? त्याविषयी जाणून घेऊ.

भारताच्या तांदूळ निर्यातीचा जागतिक बाजारावर होणारा परिणाम

भारताने शनिवारी बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. भारताने पारबॉइल्ड (पाच टक्के तुटलेला पांढरा तांदूळ) तांदळावरील पूर्वीच्या निर्यात शुल्कातही २० टक्क्यांवरून १० टक्के इतकी घट केली आहे. २०२३ मध्ये तांदळाचा देशातील पुरवठा आणि त्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदी करण्यात आली होती. मात्र, आता ही बंदी उठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे व्यापार्‍यांना बिगर-बासमती पांढरा तांदूळ जागतिक बाजारपेठेत विकण्याची परवानगी मिळाली आहे. नवीन पीक आणि राज्य गोदामांमध्ये वाढीव मालमत्ता आहे. या परिस्थितीत हा निर्णय घेतला गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. २०२३ मध्ये निर्यातीवर बंदी घातल्यापासून स्थानिक पुरवठा वाढला आहे. सरकारी गोदामांमधील साठाही वाढला आहे. १ सप्टेंबर रोजी सरकारी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तांदळाचा साठा ३२.३ दशलक्ष मेट्रिक टन होता, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८.६ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे सरकारला तांदूळ निर्यात प्रतिबंध कमी करण्यासाठी जागा मिळाली आहे.

हेही वाचा : भारतात वॉन्टेड झाकीर नाईक पाकिस्तानात; मुस्लीम धर्मोपदेशकाचा पाकिस्तानला जाण्यामागे हेतू काय?

मोसमी पावसाने आनंदित असलेल्या शेतकऱ्यांनी ४१.३५ दशलक्ष हेक्टर (१०२.१८ दशलक्ष एकर) वर भाताची लागवड केली आहे. गेल्या वर्षी ४०.४५ दशलक्ष हेक्टर (९९.९५ दशलक्ष एकर) वर भाताची लागवड झाली होती. ‘अल जझिरा’नुसार, भारत आणि पाकिस्तान ही बासमती तांदळाचे उत्पादन करणारी दोनच राष्ट्रे आहेत. भारताने बासमती तांदळासाठी ९५० डॉलर्स प्रति मेट्रिक टन किमान निर्यात किंमत (एमईपी)देखील निश्चित केली आहे. निर्यातदारांनी सांगितले की, निर्यात पुन्हा सुरू करण्याच्या भारताच्या भूमिकेमुळे जागतिक पुरवठा वाढला आहे आणि गरीब आशियाई व आफ्रिकन खरेदीदारांना अधिक स्वस्त दरांत पुरवठा करणे शक्य झाले आहे.

व्यापार्‍यांना बिगर-बासमती पांढरा तांदूळ जागतिक बाजारपेठेत विकण्याची परवानगी मिळाली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

“भारताच्या या निर्णयामुळे थायलंड, व्हिएतनाम व पाकिस्तानमधील पुरवठादारही त्यांच्या निर्यातीच्या किमती कमी करीत आहेत,” असे ‘सत्यम बालाजी’चे कार्यकारी संचालक हिमांशु अग्रवाल यांनी सांगितले. “बाजारात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण स्पर्धेत टिकून राहण्याच्या प्रयत्नात आहे,” असेही ते म्हणाले. सोमवारी भारतातील पाच टक्के पारबॉइल्ड तांदळाची किंमत ५०० ते ५१० डॉलर्स प्रति मेट्रिक टन होती, जी गेल्या आठवड्यातील ५३०-५३६ डॉलर्स किमतीपेक्षा कमी आहे. भारतीय पाच टक्के तुटलेला पांढरा तांदूळ सुमारे ४९० डॉलर्स प्रतिटनानुसार देऊ करण्यात आला होता. व्हिएतनाम, पाकिस्तान, थायलंड व म्यानमारमधील निर्यातदारांनीही सोमवारी कमीत कमी १० डॉलर्स प्रतिटन इतक्या किमती कमी केल्या आहेत.

बिगर-बासमती तांदूळ निर्यातीला परवानगी देण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतीचे उत्पन्न वाढेल आणि भारताला जागतिक बाजारपेठेत त्याचे स्थान पुन्हा मिळविण्यास मदत होईल, असे नवी दिल्लीतील व्यापारी राजेश पहारिया जैन यांनी सांगितले. पारबॉइल्ड तांदळावर १० टक्के निर्यात कर आणि ४९० डॉलर्स प्रति मेट्रिक टन किंमत असूनही, भारतीय पांढरा तांदूळ आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धेत असेल, असे तांदूळ निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष बी. व्ही. कृष्णा राव यांनी सांगितले.

तांदूळ निर्यातीबाबत पाकिस्तानचा निर्णय आणि परिणाम

पाकिस्तानचे वाणिज्यमंत्री जाम कमाल खान यांनी ‘अल जझिरा’ला सांगितले की, राइस एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पाकिस्तान (आरईएपी)ने एमईपी काढून टाकण्याचे आवाहन केल्यानंतर सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत. फिलिपिन्स, नायजेरिया, इराक, सेनेगल, इंडोनेशिया व मलेशिया हे आशियाई तांदळाचे प्रमुख आयातदार आहेत. खरेदीदार आणि विक्रेते भारतीय तांदूळ पुरवठ्याच्या वाढलेल्या संभाव्य परिणामांचे मूल्यांकन करीत आहेत आणि त्यानुसार या आठवड्यात किमती स्थिर होतील, असे ओलम ॲग्री इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले. थाई तांदळाच्या किमती सोमवारी ५४०-५५० डॉलर्स होत्या, ज्या गेल्या आठवड्यात ५५० ते ५६० डॉलर्स प्रतिटन होत्या. थायलंडमथील तांदूळ निर्यातीच्या किमती बाजारपेठेत वाढलेल्या पुरवठ्यामुळे कमी होऊ शकतात, असे थाई राइस एक्स्पोर्टर्स असोसिएशनचे मानद अध्यक्ष चुकियात ओपासवाँग यांनी सांगितले. व्हिएतनाममध्येही तांदळाच्या किमती सुधारण्यास सुरुवात झाली आहे.

कमाल खान म्हणाले की, जागतिक तांदळाच्या किमती वाढल्यानंतर एमईपी लागू करण्यात आला. परंतु, आंतरराष्ट्रीय तांदळाच्या किमतीत नुकत्याच झालेल्या घसरणीमुळे आणि भारताने निर्यातबंदी उठवल्यामुळे एमईपी हा पाकिस्तानी तांदूळ निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धेत राहण्यासाठी अडथळा ठरत आहे. भारताने बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने पाकिस्तानला मोठा फायदा झाला होता. जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत पाकिस्तानच्या तांदूळ निर्यातीत ६० टक्के वाढ आणि मूल्यात ७८ टक्के वाढ झाली होती. पाकिस्तानने सुमारे सहा दशलक्ष मेट्रिक टन तांदूळ निर्यात केला; ज्यात ७,५०,००० टन बासमती तांदळाचा समावेश होता आणि त्यातून ३.९ अब्ज डॉलर्सचा त्यांना फायदा झाला. पण, भारत पुन्हा बाजारात आल्याने पाकिस्तानसाठी आता गोष्टी अवघड होतील. “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा हे तांदळाच्या किमतीचे नियमन करतात. आता भारत व्यवसायात परत आला आहे,” असे ‘REAP’चे माजी अध्यक्ष चेला राम केवलानी यांनी ‘अल जझिरा’ला सांगितले.

भारताचे जागतिक बाजारपेठेतील महत्त्व

भारताने २०२३ मध्ये पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लादले होते. पारबॉइल्ड तांदूळ निर्यातीवर भारताने २० टक्के शुल्कही आकारले होते. एल निनो हवामानामुळे मान्सूनमधील खराब पावसाची भीती वाढल्याने भारताने हे निर्बंध लादले होते. एप्रिल-जूनच्या निवडणुकीपूर्वी स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा भारताचा उद्देश होता. जगभरातील धान्याचा अव्वल निर्यातदार असलेल्या भारताच्या या निर्णयामुळे जागतिक तांदळाच्या किमती १५ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या. २०२२ मध्ये भारताचा जागतिक बाजारपेठेत एकूण ५५.४ दशलक्षांपैकी २२.२ दशलक्ष मेट्रिक टन इतका विक्रमी वाटा होता. थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान व अमेरिका या जगातील इतर चार मोठ्या निर्यातदारांपेक्षा भारताची निर्यात मोठी होती. भारत १४० हून अधिक देशांमध्ये तांदूळ निर्यात करतो. भारतीय बिगर-बासमती तांदूळ खरेदी करणाऱ्यांमध्ये बेनिन, बांगलादेश, अंगोला, कॅमेरून, जिबूती, गिनी, आयव्हरी कोस्ट, केनिया व नेपाळ या देशांचा समावेश आहे.

हेही वाचा : इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतातील विमान वाहतुकीवर, तिकिटं महागली अन् प्रवासाचं अंतरही वाढलं; कारण काय?

इराण, इराक व सौदी अरेबिया प्रामुख्याने भारताकडून प्रीमियम बासमती तांदूळ खरेदी करतात. २०२३ मधील निर्बंधांमुळे भारताची तांदूळ निर्यात २० टक्क्यांनी कमी होऊन १७.८दशलक्ष टन झाली आणि २०२४ च्या पहिल्या सात महिन्यांतील निर्यात एक वर्षापूर्वीच्या तुलनेत एक-चतुर्थांश कमी झाली. भारताच्या कमी झालेल्या निर्यातीमुळे आशियाई आणि आफ्रिकन खरेदीदारांना थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान व म्यानमारकडून तांदळाची आयात करणे भाग पडले. मागणीत अचानक वाढ झाल्याने या देशांतील निर्यातीच्या किमती १५ वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या. गेल्या वर्षी भारताने लादलेल्या निर्यातीवरील निर्बंधांमुळे व्हिएतनाम, थायलंड, पाकिस्तान व म्यानमार यांसारख्या प्रतिस्पर्धी पुरवठादारांनी त्यांचा बाजारातील वाटा वाढवला होता.