केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात चार अवकाश प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात शुक्र ग्रहावरील भारताच्या पहिल्या वहिल्या मोहिमेलाही मान्यता देण्यात आली आहे. इस्रोचे ‘मिशन व्हीनस’ मार्च २०२८ मध्ये प्रक्षेपित करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे. २०१३ मध्ये लाँच केलेल्या मार्स ऑर्बिटर मिशननंतर ही देशाची दुसरी आंतरग्रह मोहीम असणार आहे. शुक्र ग्रहाभोवतीच्या कक्षेतील अभ्यास करणे, शुक्राचा पृष्ठभाग आणि उप-पृष्ठभागाचे परीक्षण करून तेथील वातावरण समजून घेणे, सूर्याचा ग्रहावर होणारा परिणाम तपासणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी विशेष उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. काय आहे इस्रोचे ‘मिशन व्हीनस?’ भारताला शुक्र ग्रहाचा अभ्यास का करायचा आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

भारतासाठी शुक्राचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?

शुक्र ग्रह पृथ्वीच्या जवळ आहे. हा ग्रह पृथ्वीसारखाच असल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे. कारण शुक्र ग्रहाचे वस्तुमान, घनता आणि आकार पृथ्वीसमान आहे, त्यामुळे शुक्राचा अभ्यास केल्याने शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या उत्क्रांतीविषयीचे संकेत मिळू शकतात. विशेष म्हणजे शुक्र ग्रहावर पूर्वी पाणी होते असे मानले जाते, परंतु आता हा ग्रह कोरडा आणि धुळीचा ग्रह झाला आहे. परंतु, हा ग्रह पृथ्वीपेक्षा महत्त्वपूर्ण मार्गांनी खूप वेगळा आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान ४६२ अंश सेल्सिअस इतके आहे. हा ग्रह बुधापेक्षाही जास्त गरम आहे, बुध हा सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह आहे. शास्त्रज्ञांना वाटते की, हे हरितगृह परिणामामुळे झाले आहे. असे मानले जाते की, हा ग्रह सूर्याच्या जवळ असल्यामुळे शुक्राच्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होते. पाण्याच्या वाफेचे रूपांतर हरितगृह वायूमध्ये होत असल्याने, हा ग्रह अधिक उष्ण होतो आणि पृष्ठभागावरील पाण्याचे बाष्पीभवन सुरूच राहते.

हेही वाचा : श्रीलंकेच्या नव्या अध्यक्षांचे भारतविरोधी विचार? भारत-श्रीलंकेच्या संबंधांवर परिणाम होणार?

या उष्ण तापमानामुळे शुक्र ग्रहाकडे जाणारे कोणतेही लँडर दोन तासांपेक्षा जास्त काळ टिकले नाही. दुसरे म्हणजे, शुक्रावरील वातावरणाचा दाब पृथ्वीपेक्षा खूप जास्त आहे. हा दाब पृथ्वीवरील महासागरांच्या खाली जाणवणाऱ्या दाबासारखा आहे. तिसरे, शुक्राचे वातावरण ९६.५ टक्के कार्बन डाय ऑक्साइडने तयार झाले आहे आणि ग्रहावर सल्फ्युरिक ॲसिडचे ढग आहेत. चौथे, पृथ्वीच्या तुलनेत शुक्र आपल्या अक्षावर खूप हळूवार फिरतो. शुक्राला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी सुमारे २४३ दिवस लागतात.

इस्रोचे ‘मिशन व्हीनस’ मार्च २०२८ मध्ये प्रक्षेपित करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे. (छायाचित्र-पीटीआय)

इस्रोची शुक्रयान मोहीम काय आहे?

पृथ्वी आणि शुक्र एकमेकांच्या जवळ आल्याने अंतराळयानासाठी हा सर्वात लहान मार्ग असणार आहे. दर १९ महिन्यांनी दोन्ही ग्रहांमधील अंतर काही प्रमाणात कमी होते. ही वेळ संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाची असते. २०२३ मध्ये या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते, मात्र आता नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळानुसार मार्च २०२८ मध्ये या मोहिमेला मंजुरी मिळाली आहे. या मोहिमेमध्ये सुमारे १०० किलोग्राम वजनाचे वैज्ञानिक पेलोड असतील. भारताच्या इतर अंतराळ संशोधन मोहिमांप्रमाणेच याचीही योजना आखण्यात येईल. जसे की, उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत वेग वाढवेल, शुक्राच्या भोवताल फिरेल आणि त्यानंतर त्याच्या कक्षेत प्रवेश करेल. एकदा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर, त्याला शुक्रावर पोहोचण्यासाठी सुमारे १४० दिवस लागतील. या मोहिमेमध्ये भारत प्रथमच एरो-ब्रेकिंगचा वापर करणार आहे.

एरो-ब्रेकिंग म्हणजे काय?

इंधनाच्या बाबी लक्षात घेऊन, उपग्रह शुक्राभोवती ५०० किलोमीटर x ६० हजार किलोमीटरच्या उच्च लंबवर्तुळाकार कक्षेत असेल. परंतु, प्रयोग करण्यासाठी पेलोडचे वजन खूप जास्त आहे. एरो-ब्रेकिंगच्या मदतीने उपग्रह ३०० x ३०० किलोमीटर किंवा २०० x ६०० किलोमीटर कक्षापर्यंत खाली आणला जाईल. जेव्हा उपग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत शुक्राच्या सर्वात जवळ जाईल तेव्हा उपग्रहाला सुमारे १४० किलोमीटर खाली ढकलले जाईल. या उंचीवर उपग्रह शुक्राच्या बाहेरील कक्षेतून बाहेर पडेल आणि त्यामुळे उपग्रहाची गती कमी होईल.

उपग्रह ज्या उंचीवर वातावरणातून बाहेर पडेल, त्या उंचीची श्रेणी अत्यंत काळजीपूर्वक निवडली जाणे आवश्यक आहे. जर उपग्रह खूप खोलवर गेला तर त्याला तीव्र घर्षणाचा सामना करावा लागू शकतो आणि तो जळूदेखील शकतो. २०२२ मध्ये व्हिनस सायन्स संमेलनात झालेल्या शास्त्रज्ञांच्या चर्चेनुसार उपग्रहाला अपेक्षित कक्षेत पोहोचण्यासाठी सुमारे सहा महिने लागतील. एकदा ठरलेली कक्षा गाठल्यानंतर, उपग्रह ग्रहाच्या वातावरणातून पूर्णपणे बाहेर पडेल.

मोहिमेत वापरण्यात येणारे पेलोड्स काय असतील?

२०१९ पर्यंत किमान १७ भारतीय प्रयोग आणि सात आंतरराष्ट्रीय प्रयोगांचे प्रस्ताव मोहिमेसाठी निवडले गेले, असे संसदेत सांगण्यात आले आहे. भारतीय पेलोडमध्ये ‘एल आणि एस बँड सिंथेटिक अपर्चर रडार’चा समावेश आहे, जो ग्रहाच्या पृष्ठभागाची प्रतिमा काढण्यात मदत करू शकतो. थर्मल कॅमेरा, आंतरग्रहीय धूलिकणांच्या प्रवाहाचा अभ्यास आणि शुक्राच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या उच्च-ऊर्जेच्या कणांचा अभ्यास करण्यासाठीदेखील पेलोड्स महत्त्वाचे आहे. दुसरा पेलोड शुक्राच्या वातावरणाची रचना, परिवर्तनशीलता आणि थर्मल स्थितीचा अभ्यास करेल.

हेही वाचा : One Nation, One Election: भारतात याआधी एकत्रित निवडणुका कधी झाल्या? एक देश एक निवडणुकीचे चक्र कोणी मोडले?

इतर देशदेखील शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत का?

अमेरिका, पूर्वेकडील यूएसएसआर, जपान, तसेच युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) च्या सहयोगी मोहिमेद्वारे यापूर्वी शुक्रावर अनेक मोहिमा केल्या गेल्या आहेत. अमेरिकेने भविष्यात शुक्रावर आणखी दोन मोहिमा करण्याची योजना आखली आहे. अमेरिका २०२९ मध्ये ‘DaVinci’ आणि २०३१ मध्ये ‘Veritas’ मोहीम, तर ईएसएने २०३० साठी ‘EnVision’ मोहिमेची योजना आखली आहे.