सध्या ‘कांतारा’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अनपेक्षित असं घवघवीत यश या चित्रपटाला मिळालं आहे. बॉलिवूडसाठी मात्र हे वर्षं तितकं लाभदायक नव्हतं हे कुणीही सांगेल. मोजून ३ ते ४ बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘द काश्मीर फाइल्स’, ‘भूलभुलैया २’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ हे ४ चित्रपट सोडले तर बाकी सगळ्या हिंदी चित्रपटांची अवस्था फार बिकट होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉयकॉट ट्रेंडचा चित्रपटांना फटका बसलाच पण ओटीटीवरील वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्याने प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे येणंच बंद केलं. ‘ब्रह्मास्त्र’ हीट का फ्लॉप यावरुन बरेच वाद झाले, पण आकडे बघता ब्रह्मास्त्रने चांगली कमाई केली हे सत्य आहे. हिंदीऐवजी दाक्षिणात्य चित्रपटांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोविड काळात आलेल्या ‘पुष्पा’पासून दाक्षिणात्य चित्रपटांनी आपल्या प्रेक्षकांवर पकड घ्यायला सुरुवात केली ती अजूनही कायम आहे. अगदी ‘कांतारा’सारखा चित्रपटही केवळ माऊथ पब्लिसिटीवर एवढा मोठा झाला. याचं कारण हिंदी चित्रपटनिर्मात्यांनी शोधायला हवं.

आणखी वाचा : ओटीटीच्या नव्या नियमांचा नवाजुद्दीन सिद्दिकीला फटका; तब्बल ७ चित्रपटांच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह

गेल्या काही महिन्यातल्या चित्रपटांचा अंदाज घेतला आणि आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्याला असं दिसतं की बजेटपेक्षा जास्त कमाई ही दाक्षिणात्य चित्रपटांनी केली आहे, तर हिंदी चित्रपटांना आपल्या चित्रपटाचं बजेट भरून निघेल एवढीदेखील कमाई करता आलेली नाही. नुकताच आलेला ‘कांतारा’ हा केवळ १६ ते २५ कोटीमध्ये बनलेला चित्रपट आहे, पण या चित्रपटाने आत्तापर्यंत १७० कोटीची कमाई केली आहे. याच चित्रपटाबरोबर प्रदर्शित झालेला आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाचं बजेट ३५ कोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे, पण या चित्रपटाने जेमतेम १५ कोटीची कमाई केल्याचं आढळून आलं आहे. मणीरत्नम यांच्या ‘पीएस १’ या चित्रपटाचं बजेट ५०० कोटी होतं, पण तरी या चित्रपटानेही २५० कोटी कमाई केली. ५५० कोटी बजेटमध्ये बनलेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने ९०० कोटीहून अधिक कमाई केली, आता तो चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सनी देओल, दुलकर सलमानचा ‘चूप’ आणि अमिताभ बच्चन रश्मिका मंदानाच्या ‘गुडबाय’ या दोन्ही चित्रपटांना १० कोटीचा आकडाही पार करता आलेला नाही. १७५ कोटी बजेट असलेल्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाची मजल ७५ कोटीपर्यंतच गेली तर ‘सीता रामम’ आणि ‘विक्रम’सारख्या दाक्षिणात्य चित्रपटांनी बजेटपेक्षा दुप्पट कमाई करून एक वेगळाच इतिहास रचला.

दोन महिन्यातून एखाद दूसरा फ्लॉप चित्रपट देणारं बॉलिवूड सध्या महिन्याला ५ ते ६ फ्लॉप चित्रपट देत आहेत. हा सिनेअभ्यासकांचा अंदाज आहे. ‘ब्रह्मास्त्र’सारखा चित्रपट सुपरहीट ठरल्यावरही बॉलिवूडने पुढील काळात सलग ७ फ्लॉप चित्रपट दिल्याचं म्हंटलं जात आहे. चित्रपटसृष्टीतील पटकथालेखक संजय चौहान म्हणतात, “चित्रपट हा ब्लॉकबस्टर मासेसमुळे ठरतो. जोवर सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडणाऱ्या कथा आपण देत नाही तोवर हिंदी चित्रपट सुपरहीट ठरणार नाही.”

बॉलिवूड एका ठराविक साच्यात अडकलं आहे. पंजाबी संस्कृती आणि उत्तर भारताकडचं चित्रीकरण यापलीकडे बॉलिवूड विचारच करू शकत नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे. बॉलिवूड हे केवळ कलाकृती आणि कलाकारांची आयात करत आहे असं निरीक्षण काही सिनेअभ्यासकांनी मांडलं आहे. बॉलिवूड चित्रपटांचे रिमेक तर करतंच आहे, पण आता दाक्षिणात्य कलाकारांनासुद्धा हिंदीत संधी देत आहे, पण इथल्या लोकांना त्या कलाकारांना हिंदी चित्रपटात बघण पसंत पडत नाही. विजय देवरकोंडासारखा साऊथचा स्टार ‘लाइगर’सारखा फ्लॉप चित्रपट देतो, आणि दुलकर सलमान ‘सीता रामम’ नंतर हिंदीमध्ये ‘चूप’ चित्रपटात झालकतो. या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांनी नाकारल्या आहेत. हे जोवर बॉलिवूडला ध्यानात येत नाही तोवर परिस्थिती सुधारणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट करायचे असतील तर फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या लोकांनाच काहीतरी बदल करावे लागतील हे अगदी स्पष्ट आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it possible for bollywood to break monopoly of south indian films at the box office avn
Show comments