आपलं राहणीमान, संस्कृती जपताना ‘पर्यावरणपूरकतेचं’ बऱ्यापैकी भान भारतीयांना आलं आहे. किमान लोकसंख्येच्या काही टक्का नागरिक तरी पर्यावरण जपण्याच्या बाबतीत सजग आहेत. आपण ज्या वस्तू वापरतो त्या तयार करण्यासाठी पर्यावरणाची कमीत कमी हानी झालीय ना याकडे जसं ग्राहकांचं लक्ष वळू लागलं, तसं ‘इको फ्रेंडली’ टॅगचं पेव फुटू लागलं आहे. याच इको फ्रेंडलीच्या नादात अनेक जण पारंपरिक कॉटन किंवा पॉलिस्टर कपड्यांऐवजी ‘विस्कोस’ या प्रकारच्या कपड्यांची निवड करू लागले आहेत. पण या विस्कोसबाबतीत पर्यावरणवाद्यांनी केलेलं ‘फॅक्ट चेक’ डोळ्यात अंजन घालणारं आहे.

विस्कोस म्हणजे काय?

समजा, एका मॉलमध्ये आपण शॉपिंग करायला गेलो. शेकडो कपड्यांचे प्रकार आपलं लक्ष वेधून घेत असतात. एखादा सुंदर टी-शर्ट आपण पाहतो, पण त्यावर लिहिलेलं असतं १०० टक्के पॉलिस्टर. पॉलिस्टर म्हणजे प्लास्टिक. मग दुसरीकडे असतो एखादा कॉटनचा कुर्ता. पण आपण जर खरेच निसर्गप्रेमी असू तर आपल्या मनात विचार डोकावतो की हा कुर्ता तयार करण्यासाठी हजारो लिटर पाणी लागलं आहे. आपण तो घेण्याचा विचार बाजूला सारत पुढे वळतो आणि आपलं लक्ष जातं ते एका नव्या, तुकतुकीत, सॉफ्ट सिल्क प्रकारच्या मटेरिअलकडे. त्यावर लिहिलेलं असतं ‘विस्कोस’. आणि पुढे ठळकपणे लिहिलेलं असतं ‘इको फ्रेंडली’. मग आपण खूप आनंदाने तो विस्कोसपासून तयार झालेला ड्रेस घेतो. पण इथेच खरी मेख आहे.

हेही वाचा : देवळाली फायरिंग रेंजवरील अग्निवीरांचा मृत्यू जुनाट तोफेमुळे? फायरिंग रेंजवर कोणते धोके संभवतात?

विस्कोस इको फ्रेंडली आहे का?

विस्कोस हे झाडाच्या खोडातल्या चिकापासून तयार करतात. त्यासाठी वर्षाकाठी जगातल्या ३० कोटी झाडांवर कुऱ्हाड पडते, असे संशोधन निकोल रायक्रॉफ्ट या पर्यावरणवादी आणि व्हँक्युअरमधल्या कॅनोपी या एका स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक आणि कार्यकारी संचालकांनी केलं आहे. निकोल यांची ही संस्था अनेक जागतिक ब्रँड्ससोबत काम करते. पुरवठा साखळी तयार होताना (कच्च्या मालाचे तयार उत्पादनांमध्ये रुपांतर) निसर्गाची हानी न करता उलट नैसर्गिक पण टाकाऊ वस्तूंचा प्रभावी वापर कसा करता येईल त्यावर निकोल यांच्या संस्थेचा भर आहे. पॅकेजिंग उद्योगांच्या जनजागृतीसाठीही त्यांची संस्था काम करते. भारताच्या ‘नेक्स्ट जेन’ अर्थव्यवस्थेसाठी टेक्स्टाइल, पल्प आणि पेपर उद्योगातील संभाव्य नैसर्गिक पर्यायांविषयी त्यांनी अलिकडेच दिल्ली येथे एक संशोधन पेपर वाचला. त्यात विस्कोसच्या वापराविषयी त्यांनी त्यांचे संशोधन मांडले. पर्यावरणपूरक म्हटले जाणारे विस्कोस हे कापड प्रत्यक्षात जंगलांची हानी करणारे आहे. पर्यावरण साखळीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या आणि जागतिक तापमानवाढीला आळा घालू शकणाऱ्या वनसंपदेचा ऱ्हास करून तयार होणारे विस्कोस ‘इको फ्रेंडली’ नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.

कॉटन, पॉलिस्टर, विस्कोसशिवाय पर्याय काय?

कापड कोणतं वापरावं ही पर्यावरणीय समस्याच नाही, ती मानवी स्वभावाची समस्या आहे, असं निकोल म्हणतात. कपाटात खूप कपडे असले तरी आपल्याला काय घालावं हा प्रश्न पडतो आणि अरेच्चा माझ्याकडे घालण्याजोगं काही चांगलं नाहीच या निष्कर्षापर्यंत आपण येतो. अर्थात हा आपला नसून व्यवस्थेचा दोष आहे कारण आपण भांडवली बाजारासाठी ग्राहक आहोत. कंपन्यांच्या पुरवठा साखळीचं सूत्र ‘निसर्गातून घ्या, त्याचं उत्पादन बाजारात आणा आणि वापरून फेकून द्या’ या तत्त्वावर चालतं. कारण यामुळेच कंपन्या सातत्याने ही साखळी सुरू ठेवू शकतात. पण गेली १५० वर्षे सुरू असलेली ही साखळी भविष्यासाठी आपल्याला परवडणारी नाही. म्हणून ती तोडून त्यातलं दुसरं टोक – जे वापरून फेकून देणं आहे – ते न करता ती साखळी गोलाकार करण्याची जबाबदारी ग्राहक आणि पुरवठादार दोघांची आहे. म्हणजेच निसर्गात कचरा न करता कपड्यांचा पुनर्वापर कसा येईल, त्यावर काम करायला हवे, असे निकोल म्हणतात.

हेही वाचा : मुस्लिम मते राज्यात किती निर्णायक? महाविकास आघाडी, महायुतीसमोर छोट्या पक्षांचे आव्हान?

भारताकडे अमाप क्षमता

कमी-कार्बन सामग्रीच्या निर्मितीसाठी भारताकडे अमाप क्षमता आहे. कृषीप्रधान भारतात गहू, तांदळाच्या पिकाचा भुसा, उसाच्या पेंढ्यापासून ‘नेक्स्ट जनरेशन’ लो कार्बन पेपर, पॅकेजिंग आणि व्हिस्कोससारखे कापड तयार करण्याचे पर्याय निर्माण होऊ शकतात. वापरानंतर टाकून दिलेले कापड ‘रिसायकल’ करून वापरले जाऊ शकते. असे कापड तयार करण्यासाठी कॅनोपी भारतातील अनेक कंपन्यांसोबत काम करत आहे. शेतीतल्या टाकाऊ गोष्टींवर आणि पुनर्वापरायोग्य वस्तूंवर प्रक्रिया करून निसर्गाची आणि पर्यायाने आपल्या भविष्याची राखण करण्यावाचून भारताला पर्याय नाही. सुदैवाने कापडाचं त्याच्या आण्विक पातळीपर्यंत (मॉलिक्यूलर लेव्हल) रूपांतर करून त्यातून पुन्हा वेगळ्या प्रकारचं कापड तयार करण्याच तंत्रज्ञान विकसित आहे. मात्र यासाठी भांडवली गुंतवणुकीची आणि अर्थात सरकारी आस्थेची गरज आहे.