Glacial Lakes In Himalaya पर्वतीय भागात विशेषतः उत्तराखंडमध्ये अनेकदा तलावफुटीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने भारतीय हिमालयीन नदीखोऱ्यांतील हिमनदी तलावांवर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. उपग्रहावरून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात हिमनदी तलावफुटीचे (ग्लोफ)चे धोके आणि अशा तलावांचा पर्वतीय भागातील पायाभूत सुविधा व वसाहतींवर होणारा परिणाम, याबद्दल सविस्तर सांगण्यात आले आहे. नेमकं या अहवालात काय? हिमनदी तलाव नक्की कसे तयार होतात? हिमनदी तलावांमुळे निर्माण होणारे धोके कसे कमी करता येईल? हिमनदी तलावांचे निरीक्षण करण्यासाठी इस्रोचे रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान कसे कार्य करते? याबद्दल जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रोच्या अहवालात काय?

वातावरण बदलामुळे हिमनदीवर होणार्‍या परिणामाचे निरीक्षण करण्यासाठी गेल्या चार दशकांतील उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. भारत, नेपाळ, तिबेट व भूतानमध्ये पसरलेल्या भारतीय हिमालयीन नदीखोऱ्यांचे उपग्रहाद्वारे दीर्घकाळापासून निरीक्षण केले जात आहे. याच निरीक्षणांतर्गत काढण्यात आलेल्या उपग्रह छायाचित्रांवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. १९८४ पासून ते २०२३ पर्यंतच्या उपग्रह छायाचित्रांचे परीक्षण करण्यात आलेआहे. या परीक्षणात असे आढळून आले आहे की, हिमनदी तलावांचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे.

हिमनदी तलावांचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

दहा हेक्टरपेक्षा मोठ्या २,४३१ तलावांपैकी ६७६ हिमनदी तलावांचा आकार १९८४ पासून वाढत गेला आहे. या ६७६ तलावांपैकी ६०१ तलावांचा आकार दुप्पट झाला आहे. १० तलावांचा आकार दीड ते दोन पट आणि ६५ तलावांचा आकार दीड पट वाढला आहे. इस्रोने म्हटले आहे की, ६७६ पैकी १३० तलाव भारतात आहेत. त्यातील ६५ तलाव सिंधू नदीखोऱ्यात, सात गंगा नदीखोऱ्यात आणि ५८ ब्रह्मपुत्रा नदीखोऱ्यात आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वेगाने वितळत असल्याने या तलावांचा विस्तार झाला आहे.

हिमनदी तलाव कसे तयार होतात?

ग्लेशियर वितळल्यामुळे पर्वतीय भागांमध्ये छोटे-मोठे तलाव तयार होतात. इस्रोने हिमनद्यांचे तलाव कसे तयार होतात, याचे चार विस्तृत श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यात सैल खडक किंवा हिमनदीबरोबर वाहून आलेली माती, हिमनदीतून वाहून आलेला बर्फ, जमिनीची धूप आणि इतर गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. हिमनद्यांचे तलाव नद्यांसाठी गोड्या पाण्याचे निर्णायक स्रोत असले तरी विशेषतः या तलावांमुळे ‘ग्लोफ’चा धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्वतीय भागात राहणार्‍या गावांमध्ये पूर परिस्थितीचे संकट उदभवते. “हिमनदी तलावांच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यास ‘ग्लोफ’ची परिस्थिती उदभवते म्हणजेच अचानक पूर येतो. हिमस्खलनामुळे बर्फ किंवा खडक हिमनदीद्वारे वाहून तलावात आल्यास पाण्याची पातळी वाढते,” असे इस्रोने म्हटले आहे.

हिमनदी तलावांच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यास ‘ग्लोफ’ची परिस्थिती उदभवते म्हणजेच अचानक पूर येतो. (छायाचित्र-रॉयटर्स)

हिमनदी तलावांचे निरीक्षण करण्यासाठी ‘रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान’ कसे वापरले जाते?

खडबडीत भूप्रदेशांमुळे हिमालयातील तलावांचे निरीक्षण करणे आव्हानात्मक आहे. इस्रोच्या मते, उपग्रह रिमोट-सेन्सिंग तंत्रज्ञानामुळे तलावांचे निरीक्षण करणे सोपे झाले आहे. रिमोट-सेन्सिंग तंत्रज्ञानामुळे तलावाच्या आजूबाजूच्या विस्तृत परिसराचेदेखील निरीक्षण करणे शक्य असल्याचे इस्रोने सांगितले आहे. उपग्रहांवरून पृथ्वी, समुद्र किंवा नद्या, जंगले, पृष्ठभाग, वितळत चाललेला बर्फ यांविषयीची माहिती मिळवण्यासाठी रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान वापरले जाते.

भुवनेश्वर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील सहायक प्राध्यापक ग्लेशियोलॉजिस्ट अशिम सत्तार म्हणाले, “बहुतांश हिमनदी सरोवराच्या ठिकाणी मोटारीने जाऊ शकत नाही. या परिस्थितीत अत्यंत प्रगत असे रिमोट सेन्सिंग टूल्स वापरले जाते. या तंत्रज्ञानामुळे आम्हाला हिमनदी तलावांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यास आणि त्यांची गतिशीलता समजून घेण्यास मदत होते.”

ते असेही म्हणाले की, तलावाच्या ठिकाणी जाणे शक्य आहे; परंतु त्यात संभाव्य धोका असू शकतो. “धोक्यासंदर्भात सावध करणारी पूर्वसूचना मिळावी यासाठी संबंधित उपकरणे लावण्यासाठी तलावाच्या ठिकाणी जाणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये मोशन डिटेक्शन कॅमेरे, वॉटर लेव्हल सेन्सर्स, डिस्चार्ज मीटर यांसारखी उपकरणे लावली जातात; जी हिमनदी तलावांमध्ये होणार्‍या आणि आसपासच्या परिसरात होणार्‍या हालचालींची माहिती देऊ शकतात,” असे सत्तार म्हणाले.

हिमनदी तलावांमुळे निर्माण होणारे धोके कसे कमी करता येतील?

२०२३ मध्ये जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हिमाचल प्रदेशमधील ४,०६८ मीटर उंचीवर असलेल्या लाहौल खोऱ्यातील घेपान घाट तलावाचे परीक्षण करण्यात आले. या तलावामुळे हिमाचल प्रदेशमधील सिस्सू शहराला धोका निर्माण झाला होता. या परीक्षणानंतर तलावातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी एक उपाय शोधण्यात आला. त्यात असे आढळून आले की, हे संकट पूर्णपणे टाळता येणार नाही; पण तलावाची पाण्याची पातळी १० ते ३० मीटरनी कमी केल्यास सिस्सू शहरावरील धोका काही प्रमाणात कमी होईल.

हेही वाचा : हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?

तलावातील पाणी काढून टाकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लांब ‘हाय डेन्सिटी पॉलीथिलीन पाइप्स (HDPE) वापरणे. २०१६ मध्ये सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सिक्कीमच्या विज्ञान, तंत्रज्ञान व हवामान बदल विभागाच्या सदस्यांनी सिक्कीमच्या दक्षिण लोनाक तलावातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro satellite remote sensing glacial lakes in himalaya rac
Show comments