नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी (२४ जुलै) सकाळी टेकऑफदरम्यान बॉम्बार्डियर CRJ200 विमान कोसळल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘सौर्य एअरलाइन्स’चे हे विमान सकाळी काठमांडूवरून पोखरा येथे जात असताना हा अपघात घडला. या विमानात दोन क्रू मेंबर्स आणि १७ तंत्रज्ञ होते. या अपघातातून केवळ वैमानिक मनीष शांक्य हेच बचावले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेपाळचा विमान वाहतूक सुरक्षिततेसंबंधीचा आजवरचा इतिहास फारच वाईट आहे. या देशात आव्हानात्मक डोंगराळ प्रदेश आहे. त्यामुळे येथील हवामान अंदाज न लावता येण्यासारखे आहे. त्यातही नेपाळमधील अनेक विमाने जुनी आहेत. तिथल्या अनेक पायाभूत सुविधा दुरवस्थेत आहेत. अशा प्रतिकूल बाबींमुळे येथे वारंवार अपघाताच्या दुर्घटना घडतात.

हेही वाचा : पंचमसाळी लिंगायत आणि कर्नाटकमधील राजकारण; ओबीसींमधून आरक्षणाची मागणी का केली जात आहे?

अपघातामध्ये नेमके काय घडले?

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAN) या अपघाताबाबत एक प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. या पत्रकामध्ये म्हटले आहे की, अपघातग्रस्त विमानाने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी सकाळी ११:११ वाजता (नेपाळ प्रमाणवेळेनुसार) उड्डाण केले होते. “रनवे ०२ वरून टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमान उजवीकडे वळले आणि धावपट्टीच्या पूर्वेला ते कोसळले.” काठमांडू पोस्टला माहिती देताना प्रत्यक्षदर्शींनी म्हटले की, टेकऑफच्या वेळी विमानाचे पंख जमिनीवर आदळल्यानंतर ते कोसळले. त्यामुळे विमानाने लगेच पेट घेतला. त्यानंतर ते धावपट्टीच्या पूर्वेला एका दरीत कोसळले. सोशल मीडियावरील व्हिडीओंमध्ये विमान धावपट्टीच्या अगदी वर उडताना दिसत आहे. त्यानंतर विमान एका बाजूला जोरात कलताना दिसते आणि ते काही वेळातच कोसळते.

अपघाताचे कारण काय?

हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही तज्ज्ञांनी उपलब्ध व्हिडीओ फुटेजचा अभ्यास करून तर्क मांडले आहेत. ते म्हणाले की, हा अपघात ‘क्लाइंब फेल्युअर’मुळे झाला असावा. कारण- उड्डाणानंतर विमानाला उंची गाठता आली नाही. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे इंजिनामध्ये झालेला बिघाड होय. कारण- इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे किंवा इंजिनाने काम करण्याचे थांबविल्यामुळेच असा अपघात होऊ शकतो. दुसरे म्हणजे सदोष प्री-फ्लाइट प्लॅनिंगमुळेही असे होऊ शकते. त्याबरोबरच इतरही काही तांत्रिक समस्या असू शकतात. अथवा ही वैमानिकाची चूकदेखील असू शकते. योग्य तपास केल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल. मात्र, विमानतळावरील परिस्थिती फारशी वाईट नव्हती. सध्या काठमांडूमध्ये पावसाळा असला तरी अपघाताच्या वेळी पाऊस नव्हता; मात्र संपूर्ण राजधानीत दृश्यमानता कमी होती.

नेपाळचा एव्हिएशन सेफ्टी रेकॉर्ड इतका खराब का?

जrनिव्हामधील ‘ब्यूरो ऑफ एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट अर्काइव्हज (B3A)’नुसार नेपाळमध्ये १९४६ पासून आतापर्यंत ६८ विमान अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये एकूण ९०० जणांचा बळी गेला आहे. ‘एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क’नुसार प्राणघातक अपघातांची संख्या (१९१९ पासून) ४१ वर जाते. या अपघातांमुळे एकूण ८७८ मृत्यू झाले आहेत. नेपाळमध्ये इतरांच्या तुलनेने कमी फ्लाइट्सची उड्डाणे होतात. त्या तुलनेत अपघातांचे हे आकडे खूप जास्त आहेत. नेपाळमध्ये खडबडीत डोंगराळ प्रदेश असणे हा एक प्रमुख घटक त्यामागे कारणीभूत आहे. नवीन विमानांमध्ये गुंतवणुकीचा अभाव आणि कमकुवत पायाभूत सुविधादेखील कारणीभूत आहेत. तसेच विमानांच्या उ्डडाणांचे अयोग्य नियमन वा नियमनातील ढिसाळपणा हेदेखील विमान कोसळण्याचे आणखी एक कारण आहे.

हेही वाचा : शासकीय सेवकांना आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामकाजात सहभागी का होता येत नव्हते?

नेपाळमध्ये हवाई धावपट्ट्या बहुतेक वेळा पठार किंवा पर्वतांवरच तयार केलेल्या आहेत. त्यामुळे या धावपट्ट्यांवर उतरण्यासाठी चांगले कौशल्य गरजेचे असते. त्यामध्ये वैमानिकांच्या चुकांमुळे त्यांना अपघात होण्याचीही शक्यता असते. या छोट्या धावपट्ट्यांवर खराब हवामानाचा जास्त परिणाम होतो. नेपाळमधील हवामान सातत्याने प्रतिकूल असते. त्यामुळे काठमांडू विमानतळ हे वैमानिकांसाठी आव्हानात्मक आहे. या विमानतळावर ३,३५० मीटरची धावपट्टी आहे. ही नेपाळमधील इतर विमानतळांवरील धावपट्ट्यांच्या तुलनेने अधिक लांबीची आहे. या धावपट्टीवर मोठ्या विमानांचे उड्डाण करता येते. मात्र, तरीही हा विमानतळ अजूनही इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांपेक्षा लहानच आहे. हा विमानतळ १३३८ मीटर उंचीवर आहे. त्याच्या जास्त उंचीमुळे विमानांना उड्डाण करणे कठीण होते.

काठमांडू विमानतळ अरुंद, अंडाकृती आकाराच्या दरीत वसलेला आहे. तो चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेला आहे. त्यामुळे वैमानिकांना विमानाचे उड्डाणासाठी कमी जागा उपलब्ध होते. आजूबाजूचे हे पर्वत सभोवतालच्या हवामानात होणाऱ्या प्रतिकूल बदलांना कारणीभूत ठरू शकतात. त्यातच नेपाळमधील अनेक विमाने जुनी असून, त्यांची देखभालही पुरेशा प्रमाणात केली जात नाही. अनेक विमानांमध्ये इतर देशांच्या विमानांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी उपकरणेही नाहीत. थोडक्यात, त्यांच्याकडे आधुनिक सुविधांचा अभाव आहे. २०१३ मध्ये युरोपियन युनियनने नेपाळमधील सर्व विमानांना आपल्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली आणि ही बंदी आजही कायम आहे. विमान वाहतूक सुरक्षा नियमन आणि अंमलबजावणी सुधारण्यात नेपाळला अपयश आल्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचे ‘काठमांडू पोस्ट’ने २०२२ मध्ये सांगितले होते.