– इंद्रायणी नार्वेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत सध्या १५ टक्के पाणी कपात लागू असल्यामुळे बहुतांश ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पुरेसा जलसाठा असतानाही पाणी कपात करण्याची वेळ यंदा आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ठाण्यात फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी ही पाणी कपात करण्यात आली. यानिमित्ताने मुंबईची पाणी पुरवठा यंत्रणा, पाणी गळतीची समस्या आणि वाढत्या लोकसंख्येला भेडसावणारी पाणीटंचाई असे सगळे मुद्दे चर्चेत आले आहेत.

मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे किती आणि कुठे आहेत?

मुंबई शहराला सध्या तानसा, मोडक सागर (वैतरणा), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून पाणी पुरवठा होतो. मात्र ही बहुतेक धरणे मुंबई शहरापासून सुमारे १०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहेत. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ विहार आणि तुळशी हे दोन तलाव आहेत. मुंबई शहराला या सर्व जलस्रोतातून ३८५० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

मुंबईला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कशी आहे?

शहराच्या बाहेर कित्येक किमी अंतरावर असलेल्या धरणांतील पाणी मुंबईकरांच्या घराघरात पोहोचण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची अशी त्रिस्तरीय यंत्रणा आहे. धरणातील पाणी २४०० मि.मी. ते ३००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे व ५५०० मि.मी. व्यासाच्या कॉंक्रिटच्या भूमीगत जलबोगद्याच्या सहाय्याने गुरुत्वाकर्षणाद्वारे पांजरापुर व भांडुप संकुल येथे आणले जाते. या जलबोगद्यातूनच सध्या ठाणे येथे गळती होत आहे. धरणातील अशुद्ध पाणी वाहून आणणाच्या जलवाहिन्यांना प्राथमिक स्तर व्यवस्था म्हणतात. जलवाहिन्या सुमारे ४०० कि.मी. एवढ्या लांबीच्या आहेत. प्राथमिक स्तर व्यवस्थेमध्ये सुमारे ४३ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. जलशुद्धीकरण केंद्रात निर्जंतुकीकरण केलेले पाणी एका महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी मुंबई शहरात ठिक-ठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयापर्यंत पोहोचवले जाते. त्यासाठी १२०० मि.मी. ते २४०० मि.मी.च्या पोलादी जलवाहिन्या व २२०० मि.मी. ते ३५०० मि.मी. व्यासाच्या भूमिगत जलबोगद्यांचा वापर केला जातो. त्यात सुमारे २७ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. या जलवितरण जाळ्यास द्वितीय स्तर वहन व्यवस्था म्हणतात. सेवा जलाशयातून जल वाहिन्यांद्वारे पाणी विविध परिसरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते. या प्रणालीला तृतीय स्तर प्रणाली म्हणतात.

मुंबईत एकूण किती जलजोडण्या आहेत?

मुंबईत सध्या ४ लाख ६० हजार अधिकृत नळजोडण्या आहेत. या सगळ्या ग्राहकांना तृतीय स्तर प्रणालीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. तृतीय प्रणालीच्या जाळ्यांची अंदाजे लांबी सुमारे ५००० कि.मी. आहे. मुंबईतील दररोजचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सुमारे १००० झडपांची उघडझाप केली जाते. या यंत्रणेद्वारे महानगराला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

धरणांची साठवण क्षमता किती?

मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा ही पाच धरणे आहेत. तर भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा ही दोन धरणे राज्य सरकारच्या मालकीची आहेत. ही दोन धरणे बांधताना केलेल्या भांडवली खर्चाच्या सहभागामुळे पालिकेला या धरणातून पाणी मिळते. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता साडेचौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे.

पाणीकपातीची वेळ का येते?

दुरुस्तीच्या कामासाठी कधीतरी तात्पुरती पाणीकपात केली जाते. मात्र पाणीसाठा अपुरा असल्यावर काही महिने किंवा पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाणी कपात करावी लागते. पावसाळ्याचे चार महिने संपले की ऑक्टोबर महिन्यात पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर पाणी कपातीची आवश्यकता नसते. एखाद्या वर्षी पाऊस खूपच लांबला तर धरणाच्या विशिष्ट पातळीखालील राखीव साठा वापरण्याचा विचार केला जातो. राखीव साठा वापरण्याची वेळ आली तर त्याकरिता राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. पाणीकपात केल्यानंतरही पाऊस खूपच उशिरा आला तर मुंबईतील बांधकाम, कारखान्यांचा, तरणतलावाचा पाणीपुरवठा थांबवण्याची वेळ येते.

पाणी गळती का होते?

पाण्याच्या शुद्धीकरणावर व पाणीवितरणावर पालिका मोठ्या प्रमाणावर खर्च करते. मात्र पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी यंत्रणा ब्रिटिशकालीन असल्यामुळे जीर्ण झाली आहे. त्यामुळे अनेकदा जलवाहिन्यांना तडे जातात, जलवाहिन्या फुटतात व पाणी गळती होते. तर काही ठिकाणी जलवाहिन्यांमधून पाणीचोरीचे प्रकारही घडतात. यामुळे शुद्धीकरण केलेले पाणीही दूषित होते. पाण्याचा अपव्यय होतो. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढते. अन्य प्राधिकरणाची विकासकामे सुरू असताना किंवा बांधकाम व्यावसायिकांच्या चुकीमुळे जलवाहिनी फुटल्यास पालिका त्यांच्याकडून दंड वसूल करते. जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी येणारा खर्च आणि जलवाहिनी फुटल्यामुळे वाया गेलेले पाणी यांचे मूल्यमापन करून दंड आकारला जातो. जलवाहिनीचा आकार, पाण्याचा दाब आणि किती वेळ पाणी वाहून गेले, यानुसार वाया गेलेल्या पाण्याचे पैसेही वसूल केले जातात.

हेही वाचा : विश्लेषण : जलस्रोतांच्या प्रदूषणाची जागतिक दखल का? न्यूयॉर्कमधील जागतिक पाणी परिषदेत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

भविष्यात पाण्याची वाढती गरज कशी भागवणार?

मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी अजूनही पावसावरच अवलंबून राहावे लागते. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत असून वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची गरजही वाढत आहे. २०४१पर्यंत मुंबईकरांच्या पाण्याची गरज ५९४० दशलक्ष लीटर इतकी होणार आहे. मात्र सध्या तरी सात धरणांव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेने मनोरी येथे निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा हा महागडा प्रकल्प असून अद्याप त्याला सुरुवात झालेली नाही. वाडा तालुक्यात गारगाई धरण बांधण्याचा प्रकल्प आखण्यात आला होता, तोही रद्द करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know why mumbai facing water shortage amid availability of sufficient quantity print exp pbs
Show comments