पाकिस्तानातील लाहोरला जगातील सर्वात प्रदूषित शहर घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मंगळवारी (२२ ऑक्टोबर) लाहोरमधील धुक्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा केली आहे. हवेच्या गुणवत्तेची पातळी मोजण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) वापरला जातो. त्यानुसार लाहोरमधील हवेच्या गुणवत्तेची पातळी ३९४ वर पोहोचली आहे आणि आयक्यू एअरनुसार धोकादायक मानल्या गेलेल्या शहरामध्ये लाहोरचा समावेश झाला आहे. ‘आयक्यू एअर’ हवेतील पीएम २.५ कणांच्या एकाग्रतेवर आधारित हवेच्या गुणवत्तेची पातळी मोजते. लाहोरमधील एक्यूआय पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) हवेच्या गुणवत्ता मार्गदर्शक मूल्याच्या ५५.६ पट जास्त आहे.

पाकिस्तानच्या हवामान खात्याने (पीएमडी) मंगळवारी धुक्याच्या वाढत्या पातळीबाबत एक अहवाल जारी केला. औद्योगिक प्रदूषण आणि वाहनांच्या उत्सर्जनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. पीएमडीने इशारा दिली की, धुक्याच्या संकटामुळे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात आणि रस्त्यांची दृश्यमानता कमी होऊ शकते; ज्यामुळे अपघात होऊ शकतात. वर्षानुवर्षे, या शहराचे नाव नियमितपणे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत येत आले आहे. लाहोरमधील नेमकी परिस्थिती काय? भारतात खुंट जाळल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे का? त्याविषयी जाणून घेऊ या.

लाहोरमधील हवेच्या गुणवत्तेची पातळी ३९४ वर पोहोचली आहे आणि आयक्यू एअरनूसार धोकादायक मानल्या गेलेल्या शहरामध्ये लाहोरचा समावेश झाला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘या’ देशाने सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेगाडीत बसवल्या चाकू प्रतिरोधक छत्र्या; कारण काय?

लाहोरमधील प्रदूषणास भारत कारणीभूत?

जसजसा हिवाळा सुरू होतो, तसतशी लाहोर आणि इतर पाकिस्तानी शहरांमध्ये धुक्यांची चादर दिसून येते; ज्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याचे पाहायला मिळते. वातावरणाच्या कमी तापमानामुळे व हवेच्या कमी गतीमुळे ही प्रदूषित हवा जमिनीलगत स्थिरावते. त्याचा दुष्परिणाम माणसांच्या, प्राण्यांच्या शरीरावर तसेच वनस्पतींवर होतो. लाहोर विशेषतः डोंगरांनी वेढलेल्या सखल प्रदेशात वसले आहे, ज्यामुळे धुके पसरू शकत नाही आणि प्रदूषणात वाढ होते. दरवर्षी हिवाळ्यात धुक्यात वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे शेतांमध्ये पिकांची कापणी झाल्यानंतर उरलेले खुंट जाळणे.

हिवाळ्याच्या महिन्यांत सीमेच्या दोन्ही बाजूंनी म्हणजेच भारत आणि पाकिस्तानातील पंजाबमध्ये कापणी झाल्यानंतर उरलेले खुंट जाळले जातात. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही सरकारांनी यावर रोख आणण्यासाठी दंडात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. भारतीय शेतकऱ्यांनी खुंट जाळल्यामुळे पाकिस्तानात प्रदूषण होत असल्याचा आरोप पाकिस्तानी नेत्यांनी केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानमधील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी धुक्याच्या समस्येचा सामना करण्यासाठी भारताबरोबर हवामान मुत्सद्देगिरी करण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानी संशोधक सायमा मोहिउद्दीन, खान आलम आणि इतरांनी ऑगस्टमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात वाहनांचे उत्सर्जन आणि वीटभट्ट्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले आहे. एकेकाळी ‘सिटी ऑफ गार्डन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाहोरमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, ज्यामध्ये घरांचे प्रकल्प आणि रस्ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे कापण्यात आली आहेत. शहरातील हिरवळ कमी झाली आहे, ज्यामुळे प्रदूषण वाढत आहे. कमी गुणवत्तेच्या उच्च-सल्फर इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण आणखी वाढत असल्याचे काही पर्यावरणवादी सांगतात. उदाहरणार्थ, पंजाबमधील १३२० मेगावॅट क्षमतेचा साहिवाल पॉवर प्लांट, जो चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहे. या प्लांटमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याची माहिती आहे.

हिवाळ्याच्या महिन्यांत सीमेच्या दोन्ही बाजूंनी म्हणजेच भारत आणि पाकिस्तानातील पंजाबमध्ये कापणी झाल्यानंतर उरलेले खुंट जाळले जातात. (छायाचित्र-रॉयटर्स)

पाकिस्तान या संकटाचा सामना कसा करणार?

गेल्यावर्षी क्लाऊड सीडिंगमुळे प्रदूषण कमी करण्यात काही प्रमाणात यश मिळाले होते. पाकिस्तानच्या पंजाब येथील सरकारने १० ठिकाणी पाऊस पाडण्यासाठी लहान सेसना विमानाचा वापर करत क्लाऊड सीडिंगची प्रक्रिया केली होती. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार यामुळे एक्यूआय ३०० वरून १८९ पर्यंत कमी करण्यात यश आले होते. मात्र, याचा परिणाम फार काळ राहिला नाही. दोन ते तीन दिवसांत परिस्थिती जैसे थे झाली. याव्यतिरिक्त, हवामान तज्ज्ञांनीदेखील त्याच्या अनिश्चित परिणामांमुळे क्लाऊड सीडिंग प्रक्रियेवर अवलंबून राहण्यापासून सावध केले आहे, कारण एकदा पाऊस आला की तो थांबवणे कठीण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द नेशन’ने नोंदवले आहे की, आतापर्यंत ३२८ पेक्षा जास्त वीटभट्ट्या पाडण्यात आल्या आणि इंधन अनुपालन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ६०० हून अधिक वाहने जप्त करण्यात आली. २०२१ मध्ये पंजाब सरकारने वाहनांच्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी लाहोरमध्ये युरो २ इंधनाच्या विक्रीवर बंदी घातली. पंजाबच्या पर्यावरण मंत्री मरियम औरंगजेब यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ‘द डॉन’ला सांगितले की, सरकार धुके कमी करण्याच्या योजनेवर काम करत आहे. यामध्ये स्मॉग मॉनिटरिंग युनिटचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. त्यात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी आणि रस्ते व बांधकाम साइट्समधून उडणारी धूळ व्यवस्थापित करण्यासाठी पाणी शिंपडणे आदी उपायांचा समावेश आहे.

हेही वाचा : पेरूचं अस्वल झालं ब्रिटिश नागरिक; अनोख्या पाहुण्याला का दिला पासपोर्ट?

“या योजनेत पंजाबमधील वायू प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन अशा दोन्ही धोरणांचा समावेश आहे. इंधनाच्या गुणवत्तेची तपासणी, औद्योगिक निरीक्षण, वृक्षारोपण कार्यक्रम, शहरी जंगले, देखरेखीसाठी ड्रोन आणि थर्मल तंत्रज्ञान, स्मॉग हेल्पलाईन, ग्रीन पंजाब आणि इको वॉच ॲप्स आणि यांसारख्या अनेक क्रियांद्वारे प्रदूषणाचा मुळाशी सामना करणे, हा या प्रमुख कार्यक्रमाचा उद्देश आहे,” असे त्या म्हणाल्या.