मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मराठवाड्यातील राजकारणावर मोठा परिणाम दिसून आला. एकवटलेल्या मराठा समाजामुळे भाजप शून्यावर आला. ओबीसींच्या तुष्टीकरणातून हे घडले असावे काय, या व अशा मुद्द्यांचा परामर्श.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाड्यात भाजपची दैना का?

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी भाजपला यश मिळाले नाही. भाजप शून्यावर येण्यामागे एकवटलेला मराठा समाज हे प्रमुख कारण आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देताना सत्ताधारी भाजपविषयी रोष निर्माण होत होता. रोख विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात होता. हे आंदोलन दडपण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत आहेत, असा संदेश मराठा समाजातील लहान मुलांपर्यंतही पोहोचलेला होता. परिणामी मराठवाड्यातील जातीय सलोखा पूर्णत: विस्कटला. मात्र, मराठा मतांची मतपेढी निर्माण झाली होती. त्यात ‘ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा’ असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. तो अर्थ मराठा मतदारांपर्यंत व्यवस्थित पोहोचविण्यात आला होता. त्यातच भाजप संविधान बदल करत असल्याचा काँग्रेसकडून सुरू असलेल्या प्रचारामुळे दलित समाजात चलबिचल होती. वंचित आाघाडी हा भाजपचा ‘ब’ चमू असल्याचा संदेश होता. त्यामुळे भाजपविरोधी जिंकणाऱ्या मतदाराच्या बाजूने दलित मतदार सरकला होता. त्यामुळे मराठा, दलित आणि मुस्लिम अशी मतपेढी तयार झाली आणि भाजपचे मराठवाड्यातील नेते पराभूत झाले.

हेही वाचा : Lok Sabha election results 2024: इंडिया आघाडीला सत्तेवर दावा करणे शक्य आहे का?

कोणत्या मतदारसंघात मराठा ध्रुवीकरण?

मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच काही प्रमाणात लातूर व काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या मतदारसंघांतील मराठा मते सत्ताविरोधी मानसिकतेची बनली होती. सत्ताविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकांवरही लोक बोट ठेवू लागले होते. कधी सोयाबीनचे भाव, कधी कांद्याचा दर हे मुद्देही चर्चेत येत. ऐन दुष्काळात न मिळालेला पीक विमा अशा कृषी समस्यांवर प्रश्न विचारले जातत होते. भाजपच्या नेत्यांकडे अशा प्रश्नांचे एकमेव उत्तर होते – ‘नरेंद्र मोदी यांची प्रतिमा’. परिणामी मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना हे दोन लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊनही त्याचा प्रभाव जाणवला नाही.

मराठा मतांच्या प्रभावाचे दृश्यरूप कुठे?

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावी, भाजपमध्ये प्रवेश घेणारे अशोक चव्हाण यांची गाडी रोखून त्यांच्यासमोर घोषणाबाजी झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंबी भागातही ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी झाली. अशोक चव्हाण यांच्या कुटुंबीयांसमोरही माळकवठा या गावी आरक्षण मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. पंकजा मुंडे यांना तर उमेदवारी मिळाल्यापासून या प्रश्नावर अनेक ठिकाणी अडविण्यात आले. हिंगाेलीमध्ये आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांमध्ये सत्ताविरोधी सूर ठासून भरल्याचे दिसून येत होते. परभणी भाजपने निवडणूक रणनीतीच मराठा विरुद्ध ओबीसी व्हावी अशी ठरवली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना अचानक उमेदवारी देण्यात आली. खरे तर जानकर यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असती तरी त्यांना लाभ झाला असता पण त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत ‘शिट्टी’ हे चिन्ह घेतले. त्या उमेदवाराचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला. पण भाजपने आपली मतपेढी ‘ओबीसी’च आहे, हा संदेश आवर्जून दिला. त्यामुळेही मराठा मत एकवटले. परिणामी परभणी, हिंगोली येथे ठाकरे गटाचे खासदार निवडून आले. बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत जातीयवाद नेहमीच असे. या जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्व मराठा नेतृत्वाकडे कानाडोळा करते, अशी मानसिकता वर्षानुवर्षे रुजलेली. त्यामुळे गावागावांत वंजारी – मराठा वाद पाहावयास मिळाले. मुंडेवाडी येथून तर एक समाज दुसऱ्या समाजावर ‘बहिष्कार’ टाकू, येथपर्यंत पुढे गेला. प्रचार काहीही होवो, जात महत्त्वाची असे वातावरण मराठवाड्यात सर्वत्र होते.

हेही वाचा : अयोध्येत राममंदिर उभारूनही भाजपाचा पराभव; उत्तर प्रदेशवासीयांनी का सोडली भाजपाची साथ?

विधानसभेसाठी काय स्थिती?

एकवटलेल्या मराठा मतपेढीमध्ये भाजपविषयीचा राग अधिक असल्याचे प्रचारात दिसून आले होते. तो रोष टिकवून धरण्यासाठी जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पुढचे काही दिवस जरांगे पुन्हा चर्चेत असतील. त्यामुळे एकवटलेली मराठा मतपेढी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहावी असे प्रयत्न केले जातील. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही त्यास साथ असेल. ‘मराठा आंदोलनाचा फायदा झाला’ असे विधान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विजयानंतर केले आहेच. मराठा मतांना मुस्लिम मतांची साथ मिळाली आणि भाजप पराभूत झाला. या प्रारूपास मराठवाड्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ अपवाद आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतांनी ‘एमआयएम’ च्या इम्तियाज जलील यांना साथ दिली. मात्र, एकवटलेला मराठा रोष शिवसेनेच्या ठाकरे गटाला आपल्या बाजूने ओढता आला नाही. चंद्रकांत खैरे हे ओबीसी असल्याने या मतदारसंघातील मराठा मतदान महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून आले. उमेदवार मराठा असेल तर रोष कमी करता येतो, असा त्याचा अर्थ काढला जात आहे. त्यामुळे मराठा मतांचा प्रभाव विधानसभेतही दिसेल.

हेही वाचा : World Environment Day 2024: भविष्यात पाण्यामुळे युद्ध पेटणार?

मराठवाड्यात किती मराठा नेते निवडून आले?

मराठवाड्यातील आठ मतदारसंघांपैकी लातूर या आरक्षित मतदारसंघातून माला जंगम समाजाचे डॉ. शिवाजी काळगे वगळता सात खासदार मराठा समाजाचे आहेत. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय जाधव (परभणी), ओम राजेनिंबाळकर (धाराशिव), वसंत चव्हाण (नांदेड), संदीपान भुमरे (छत्रपती संभाजीनगर), कल्याण काळे (जालना ) आणि ‘होय, मी जरांगे पाटील’ यांच्या आरक्षण आंदोलनाच्या लाभातून निवडून आलो आहे, असे सांगणारे बीडचे बजरंग सोनवणे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha result 2024 maratha consolidation hit bjp badly in marathwada print exp css
First published on: 05-06-2024 at 13:33 IST