हरियाणात गेली दहा वर्षे भाजप सत्तेत आहे. आता सलग तिसऱ्यांदा सरकार आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्यात किसान, जवान आणि पहिलवान नाराज असल्याचा दावा करत काँग्रेसने भाजपला हटविण्याचा पण केला आहे. राज्यातील ९० जागांसाठी येत्या पाच ऑक्टोबरला मतदान होत असून भाजप विरुद्ध काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांच्या लढतीत छोटे पक्ष काय कामगिरी करतात, ते किती मते घेतात त्यावर निकाल ठरेल.

जाट मतांसाठी रस्सीखेच

राज्यातील ९० पैकी विधानसभेच्या २९ जागा येथे येतात. सत्तेच्या दृष्टीने येथे यश मिळवणे महत्त्वाचे ठरते. गेल्या विधानसभेला काँग्रेसला १५ तर भाजपला १४ जागा जिंकता आल्या. मात्र लोकसभेला भाजपला १५ तर काँग्रेसला १४ मतदारसंघांत आघाडी मिळाली. जाट समुदाय भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसला येथून मोठ्या अपेक्षा आहेत. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री भूपेंदरसिंह हुड्डा यांचे नाव काँग्रेस सत्तेत आल्यास मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याने भाजपला येथे मेहनत घ्यावी लागत आहे. उमेदवारी देतानाही काँग्रेसने ९० पैकी २८ जाट उमेदवार दिले आहेत. त्या तुलनेत भाजपने १६ जाट उमेदवार दिले आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?

जाट-शीख पट्ट्यात शेतकऱ्यांची नाराजी?

या विभागात २० जागा असून गेल्या वेळी येथून भाजपला ६ तर काँग्रेसला ४ जागा जिंकता आल्या. तर इतर पक्षांना दहा जागा जिंकता आल्या. पंजाब सीमेलगतचा हा भाग आहे. केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचे हे केंद्र होते. कुस्तीगीर विनेश फोगट काँग्रेसकडून जौलाना मतदारसंघातून लढत असून, हा मतदारसंघ याच पट्ट्यात येतो. याखेरीज दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाची याच भागात ताकद आहे. त्यांच्या दृष्टीने या वीस जागा महत्त्वाच्या आहेत. लोकसभेला येथून विधानसभेच्या १५ मतदारसंघांत काँग्रेसला तर भाजपला केवळ पाचच ठिकाणी आघाडी मिळवता आली.

दक्षिण हरियाणात भाजप प्रभावी

भाजपचे प्रभुत्व असलेला हा भाग. गेल्या विधानसभेला येथील दहापैकी भाजपला सहा तर काँग्रेस व इतरांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. गुरगावचे भाजप खासदार राव इंद्रजित सिंह हे या पट्ट्यातील प्रमुख नेते. त्यांच्या कन्या आरती या अटेली मतदारसंघातून रिंगणात आहेत. या कुटुंबाचा नारनौल, नानगल चौधरी आणि महेंद्रगढ या भागात प्रभाव आहे. त्यामुळे भाजपची भिस्त या दहा जागांवर आहे.

अंबाला विभागातही भाजप आशावादी

मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांचा लाडवा मतदारसंघ याच विभागात येतो. याखेरीज भाजपचे सर्वात ज्येष्ठ आमदार अनिल विज हे अंबाला छावणी मतदारसंघातून रिंगणात आहेत. ते ७ वेळा विधानसभेवर विजयी झाले असून, मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा आहे. येथील १८ जागांपैकी निम्म्या म्हणजे ९ जागा भाजपला मिळाल्या. तर काँग्रेसला ६ व इतरांना ३ ठिकाणी यश मिळाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून ९ ठिकाणी भाजप, तर काँग्रेसला ४ तर आम आदमी पक्षाला ४ मतदारसंघातून आघाडी मिळाली. यामुळे आपला विधानसभेत खाते उघडण्याची आशा आहे. लोकसभेला ‘इंडिया’ आघाडीतून निवडणूक लढवलेला आप हरियाणात स्वतंत्रपणे रिंगणात आहे.

हेही वाचा >>> युद्ध इराण-इस्रायलचं, पण भुर्दंड जगाला! कच्च्या तेलाचे भाव वाढले, भारतावर नेमका काय परिणाम होणार?

‘एनसीआर’ विभागात चुरस

दिल्लीलगतचा हा भाग आहे. सोहना, फरिदाबाद या जागा काही निवडणुकींत भाजपकडेच राहिल्या आहेत. गेल्या निवडणुकीत येथील १३ जागांपैकी भाजपला ७ तर काँग्रेसला ४ तर अपक्षांना २ जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत राज्यातील १० जागांपैकी काँग्रेस व भाजपला राज्यात प्रत्येकी ५ जागा मिळाल्या. राज्यात भाजपशी पीछेहाट होत असताना, येथील लोकसभांतर्गत विधानसभानिहाय विचार करता भाजपला ९ तर काँग्रेसला ४ ठिकाणी आघाडी मिळाली. येथील मेवात या मुस्लिमबहुल नूह, पुन्हाना तसेच फिरोजपूर-झिरका या जागा कायम काँग्रेसकडे राहिल्या आहेत.

प्रमुख पक्षांची रणनीती

भाजपच्या सरकारवरील नाराजीचा फायदा उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी शेतीच्या समस्या, अग्निवीर योजनेवरून तरुणांमध्ये असलेला असंतोष तसेच कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यात कुस्तीगीर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्या आंदोलनातील विनेश फोगट मैदानात उतरली होती. आता विनेश काँग्रेसकडून रिंगणात आहे. यातून भाजपविरोधात अंसतोष कसा निर्माण होईल, याचा प्रयत्न काँग्रेसने प्रचारात केला. तर भाजपने यंदाही बिगरजाट मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः इतर मागासवर्गीय मतांवर लक्ष केंद्रित केले. काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचा आरोप करत, त्याचा लाभ उठवता येईल काय, याचीही चाचपणी प्रचारात करण्यात आली. काँग्रेस खासदार कुमारी शैलजा नाराज असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रचारात सांगत आहेत. याखेरीज  ग्रामीण भागावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभेला येथे काँग्रेसला आघाडी मिळाली होती. दिल्लीलगतच्या हिंदी भाषक पट्ट्यातील या छोट्या राज्यातील दुरंगी सामन्यात छोटे पक्ष किती मते फोडतात यावर निकालाचे भवितव्य ठरेल. या निकालाचा महाराष्ट्र तसेच झारखंड विधानसभा निवडणुकांवरही परिणाम होईल.

hrishikesh.deshpande@expressindia.com