मुंबईकरांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तब्बल ७४४२७.४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. मुंबईसह राज्यात बदललेली राजकीय स्थिती, मुंबई महानगरपालिकेची नजिकच्या काळात होणारी निवडणूक, दैनंदिन नागरी सुविधांबरोबरच हाती घेतलेल्या प्रकल्पांसाठी लागणारा निधी आदी बाबी विचारात घेऊन सादर करण्यात आलेल्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत घेतलेला हा आढावा…
आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान किती?
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे मंगळवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ७४४२७.४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सुपूर्द केला. चालू आर्थिक वर्षाच्या (२०२४-२५) तुलनेत आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात तब्बल १४.१९ टक्के म्हणजे ९२४६.६२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान ६५१८०.७९ कोटी रुपये इतके आहे. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रथमच मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे केवळ राजकारणीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अर्थसंकल्पाचे आकारमान का वाढले?
महापालिकेने रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आदी विविध खात्यांचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. दैनंदिन सुविधा आणि हाती घेतलेले प्रकल्प यासाठी भविष्यात मोठा खर्च अपेक्षित आहे. भांडवली कामांसाठी येणाऱ्या खर्चात सात हजार कोटी रुपये, तर महसुली खर्चासाठी तीन हजार कोटी रुपये वाढ अपेक्षित आहे. या सर्व खर्चाचा ताळमेळ लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान ९२४६.६२ कोटी रुपयांनी वाढविण्यात आले आहे.
अर्थसंकल्पात सुधारणा का करावी लागली?
मुंबई महापालिकेचा चालू आर्थिक वर्षासाठी (२०२४-२५) ५९,९५४ कोटी रुपयांचा अर्थ संकल्प सादर करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात हाती घेण्यात आलेली विविध कामांमुळे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सुधारित करावा लागला. त्यामुळे या अर्थसंकल्पाचे आकारमान ६५,१८० कोटी रुपयांच्या घरात गेले. चालू आर्थिक वर्षातील भांडवली खर्च ३६,३५८ कोटी रुपयांवरून ३७,३३२ कोटी रुपये असा सुधारित करण्यात आला. त्यामुळे अर्थसंकल्पाचे एकूणच आकारमान वाढले.
उत्पन्नात कशी वाढ झाली?
चालू आर्थिक वर्षाच्या उत्पन्नातही वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. मुंबई महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३५,७४९ कोटींचे महसुली उत्पन्न गृहित धरले होते. मालमत्ता कर, विकास नियोजन, जकातीची नुकसान भरपाई, गुंतवणूकीवरील व्याज हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. मात्र यंदा उत्पन्न वाढले असून चालू वर्षातील उत्पन्नाचे सुधारित अंदाज ४०,६९३ कोटी असे करण्यात आले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत २८ हजार ३०८ कोटींचे प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. मालमत्ता कर, विकास नियोजन, जकात, नुकसान भरपाई यांतून मिळणारे उत्पन्न यंदा उद्दिष्टापेक्षा जास्त मिळाले आहे.
आगामी अर्थसंकल्पात काय?
महानगरपालिकेकडून मुंबईकरांना पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतात. मुंबईकरांना शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी आगामी वर्षात निरनिराळी कामे हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुख्य म्हणजे जीर्ण झालेल्या जुन्या जलवाहिन्या बदलून गळती आणि दूषित पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर जलवहन बोगदे, पिंजाळ प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, नि:क्षारीकरण प्रल्प, उदंचन केंद्रांचे बांधकाम अशी निरनिराळी कामे हाती घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असून त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तब्बल ४३७२.१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळावे यासाठी काँक्रीटीकरणाची, तसेच धोकादायक पुलांची कामेही हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी अनुक्रमे ६५१९.११ कोटी आणि ८३६९.७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर सागरी किनारी मार्गा (उत्तर), गोरेगाव-मुलुंड जोड मार्गासह अन्य रस्त्यांच्या कामांना अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले असून प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या निवाऱ्यासाठी ३२ हजारांहून अधिक सदनिका बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
आरोग्य सेवेसाठी नेमके काय?
आगामी अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्यासाठी ७३८०.४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल १३.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. आगामी वर्षात पाच रुग्णालयांचा पुनर्विकास, सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणांतर्गत रुग्णालये, दवाखान्यांचा विकास, झोपडपट्टीतील किशोरवयीन मुलामुलींच्या मानसिक व आरोग्यविषयक समस्यांसाठी किशोर केंद्रे, कुपोषित बालकांसाठी उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘पोषण पुनर्वसन केंद्रे’ आणि ईएनटी रुग्णालयात कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेची सुविधा आदी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढील वर्षात २५ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ व फिजिओथेरपी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. एकूणच भविष्यात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ३,५१५ रुग्णशय्यांची भर पडणार आहे. कर्कग्रस्त रुग्णांची तपासणी आणि उपचाराची व्याप्तीही वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील अन्य शहर, गावांतील अथवा परराज्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळू शकेल.