संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (युनेस्को) पथकाकडून नुकतीच रायगड किल्ल्याची पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत रायगड किल्ल्याचा समावेश होईल का, तसे झाल्यास काय होईल, ही निवड नेमकी कशी होते याचा थोडक्यात आढावा…

युनेस्कोने रायगड किल्ल्याची पाहणी का केली?

मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रस्ताव दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि कामगिरी जगभरात पोहोचावी, गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन व्हावे आणि जागतिक पातळीवर हे किल्ले पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जावेत हा या प्रस्तावामागचा मूळ उद्देश होता. या प्रस्तावात मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचा समावेश होता. या प्रस्तावाअंतर्गत नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा भाग म्हणून ही पाहणी करण्यात आली. या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ हेवान्ग ली, जागतिक वारसा सहसंचालक (एएसआय) मदन सिंग चौहान, महाराष्ट्र शासन पुरातत्त्व विभाग संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, डॉ. शुभा मजुमदार यांचा समावेश होता.

हेही वाचा >>> बेकरीतील केकमुळे होऊ शकतो कॅन्सर? कोणत्या राज्याने दिला इशारा? कारण काय?

पथकाने रायगडावर काय पाहिले?

पथकाने गडावरील कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज समाधी स्थळ, हत्तीखाना, टकमक टोक, भवानी मंदिर, राजसदर या महत्त्वपूर्ण ठिकाणांची पाहणी केली. किल्ल्याचा इतिहास आणि सद्यःस्थिती जाणून घेतली. येथील पर्यावरणीय घटकांची माहिती घेतली. किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामाचाही आढावा घेतला. प्रशासन आणि स्थानिकांशी संवाद साधला. येत्या काही दिवसांत इतर ११ किल्ल्यांचीहा युनेस्कोचे पथक पाहणी करणार आहे. 

प्रस्तावात समाविष्ट असलेले इतर किल्ले कोणते?

राज्यात ३९० हून अधिक किल्ले आहेत. यातील मराठा साम्राज्याशी निगडित बारा किल्ल्यांची या प्रस्तावासाठी निवड करण्यात आली आहे. पैकी आठ किल्ले हे केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या तर चार किल्ले राज्याच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील आहेत. यात किल्ले रायगड व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी, खांदेरी, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जिंजी, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग आणि राजगड या किल्ल्यांचा समावेश आहे. या प्रस्तावानुसार युनेस्कोचे पथक आता सर्व किल्ल्यांची पाहणी केली जाणार आहे.  

युनेस्को संस्था का महत्त्वाची?

युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची एक नावाजलेली संस्था आहे. तिची स्थापना १९४५ मध्ये झाली. या संस्थेचे मुख्यालय फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे असून,  जागतिक वारसा स्थळांचे जतन आणि संर्वधन करण्यासाठी ही संस्था काम करते. वारसा स्थळांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध करून देते. जगभरातील देशांत या संस्थेचे काम सुरू असते.

हेही वाचा >>> ‘ISIS’ने अपहरण केलेल्या याझिदी महिलेची ‘गाझा’मधून तीन देशांनी कशी केली १० वर्षांनंतर सुटका?

निवडीचे निकष कोणते?

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळविण्यासाठी दहा निकष ठरवून देण्यात आले आहेत. ज्यातील किमान एका निकषात प्रस्तावित स्थळ बसणे आवश्यक असते. यात सहा सांस्कृतिक आणि चार नैसर्गिक निकषांचा समावेश असतो. मानवी प्रतिभेचा उत्तम नमुना, मानवी मूल्यांमध्ये झालेले बदल दाखवणारी वास्तू, जिवंत अथवा मृत संस्कृतीचा दाखला देणारी वास्तू, मानवी इतिहासाची टप्पे दाखवणारी वास्तू, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली पारंपरिक वसाहत, असाधारण जागतिक महत्त्वाची घटना, परंपरा यांच्याशी संबंधित वास्तू, विशेष कला आणि साहित्य असलेले ठिकाण, जल आणि जलजीवनाशी निगडित असलेल्या वनस्पती आणि प्राणीमात्रांचे स्थान, जैवविवधता असलेले नैसर्गिक अधिवास या निकषात बसणाऱ्या स्थळांची जागतिक वारसा स्थळाच्या यादीत निवड केली जाते.

वारसा स्थळ म्हणून निवड झाल्यास काय?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बारा किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड झाल्यास, संपूर्ण जगाला शिवाजी महाराजांच्या कामगिरीचे महत्त्व कळेल. या बारा किल्ल्यांच्या शास्त्रशुद्ध जतन व संवर्धनासाठी युनेस्कोचे सहकार्य आणि निधी मिळू शकेल. ज्या पद्धतीने युरोपातील किल्ल्यांचे सवंर्धनाचे काम सुरू आहे, त्याच पद्धतीने या किल्ल्यांचे संवर्धन होऊ शकेल. त्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांची मदत होऊ शकेल. जागतिक पातळीवर या किल्ल्यांच्या संशोधनाला सुरुवात होऊ शकेल. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून हे किल्ले नावारूपास येतील.  

भारतातील जागतिक वारसा स्थळे कोणती?

देशातील ४२ स्थळांचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात समावेश केला आहे. यात ३४ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्र स्थळाचा समावेश आहे. सांस्कृतिक विभागातून बिहार- बोध गया येथील महाबोधी कॉम्प्लेक्स, नालंदा विद्यापीठ; दिल्लीतील कुतुब मिनार, लाल किल्ला, हुमायु मकबरा; गुजरातमधील चंपानेर पावागड उद्यान, राणीची वाव, अहमदाबाद शहर, धोलविरा; गोव्यातील चर्च; कर्नाटकमधील हम्पी, पट्ट्याडकल, होयसाळ; मध्य प्रदेशमधील खजुराहो मंदिर, साची स्तूप आणि भिमबेटका; ओडिशातील कोर्णाक येथील सूर्य मंदिर; महाराष्ट्रातील अजंठा, वेरूळ आणि एलिफंटा लेणी; मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि व्हिक्टोरीयन, गॉथिक आणि आर्ट डेको; राजस्थानमधील जयपूर शहर, जंतर मंतर, सहा किल्ले; उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील ताजमहाल, फत्तेपूर सिक्री आणि किल्ला; तेलंगणा येथील रामप्पा मंदिर; पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन या सांस्कृतिक स्थळांचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे. नैसर्गिक वारसा स्थळात आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीव अभयारण्य; राजस्थानमधील घाना अभयारण्य; उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर; पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य; महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ मधील पश्चिम घाट परिसर; हिमाचल प्रदेश मधील द ग्रेट हिमालयन उद्यान यांचा समावेश आहे. तर मिश्र वारसा स्थळांमध्ये सिक्कीममधील खांगचेंडजोंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. 

harshad.kashalkar@exprssindia.com