मागील काही वर्षांपासून ढगफुटी, ढगफुटी सदृश पाऊस किंवा कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. कधी दिल्ली, कधी पुणे,  कधी बंगळूरु, कधी मुंबई अशा अनेक शहरांना ढगफुटीचा फटका बसत आहे. हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम अशा राज्यांमध्ये जलद पूर येण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या मागील कारणे काय, ढगफुटी का आणि कशी होते, याचा आढावा.

ढगफुटी कधी होते?

राज्यात आणि देशात यापूर्वी पूर्वमोसमी पाऊस पडण्याच्या काळात, मोसमी पाऊस उत्तरेकडे वाटचाल करीत असतानाच्या काळात आणि मोसमी पाऊस देशातून माघारी जात असतानाच्या काळात ढगफुटीसदृश पाऊस पडत असे. हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावर पडत नाही, अत्यंत स्थानिक पातळीवर चार- पाच किलोमीटरच्या परिघातच हा पाऊस पडतो. सध्या देशभरात कमी काळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या, उंचच उंच इमारती असलेल्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. नुकताच चिंचवड परिसरात झालेला पाऊस हा ढगफुटीचाच प्रकार होता.

कमजोर मोसमी पावसामुळे ढगफुटी?

मोसमी पाऊस कमजोर असतानाच्या काळात सलग दोन-तीन दिवस संततधार पाऊस पडत नाही. पण, हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते. स्थानिक पातळीवर तापमानवाढीमुळे बाष्पाचे ढगांत रूपांतर होते. हे ढग काही भागापुरतेच मर्यादित असतात. हे ढग उंचावरून जाऊन अचानक जोरदार पाऊस सुरू होतो. नुकताच चिंचवडमध्ये याच प्रक्रियेतून पाऊस पडला. मोसमी पावसाची सक्रियता वाढल्यानंतर अशा प्रकारचा पाऊस पडण्याच्या घटना कमी होतात. जागतिक हवामान बदल, वृक्षतोड, वाढते शहरीकरण, घनदाट लोकवस्ती, वाढते प्रदूषण आदी घटनांमुळे ढगफुटीसदृश पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. सध्या मोसमी पावसाला जोर नसल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. ढगफुटीसदृश पाऊस फार तर चार ते पाच किलोमीटर परिघातच पडतो, खूप मोठ्या परिसरात पडत नाही.

हेही वाचा >>> भारत वि. दक्षिण आफ्रिका…दोन्ही संघ ठरवले गेले ‘चोकर्स’…अंतिम फेरीत बाजी कोणाची?

तापमान वाढ नि ढगफुटीचा संबंध?

ढगफुटी, ढगफुटीसदृश पाऊस किंवा कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याच्या घटना घडण्यात त्या-त्या स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे घडतात. एखादे गाव किंवा शहराच्या विशिष्ट भागात पडणारा पाऊस, हा तेथील स्थानिक वातावरणातील संवहनी क्रियेमुळे पडतो. स्थानिक पातळीवरील भौगोलिक रचना महत्त्वाची असते. सूर्याची उष्णता हाच अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. सूर्याच्या उष्णतेमुळे, ऊर्जेमुळे विशिष्ट भागातील जमिनीचा पृष्ठभाग तापून जमिनीने शोषलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन या उबदार, दमट पाण्याच्या वाफेचे अवकाशात ऊर्ध्वगमन होते. उंचावरील थंडाव्यातून, पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होऊन फक्त त्या मर्यादित क्षेत्रातच पाऊस पडतो. हाच वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय. यालाच ढगफुटी किंवा ढगफुटीसदृश पाऊसही म्हणता येईल. अनेकदा समुद्रावरून अति उंचावरून आलेले बाष्प त्यात मिसळले जाऊन त्याचाही स्थानिक बाष्पाशी संयोग होतो. म्हणून स्थानिक पातळीवर होणाऱ्या जोरदार पावसाला स्थानिक वातावरणीय ऊर्जेबरोबर समुद्रीय ऊर्जेचा अप्रत्यक्ष संबंध असतो.

ढगफुटी सदृश पावसाचा मुख्य काळ कोणता?

दर वर्षी साधारण पूर्वमोसमी पाऊस पडण्याच्या काळात म्हणजे मार्च ते मे या महिन्यांत. मोसमी पावसाचा परतीच्या प्रवास सुरू झाल्यानंतर म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर (उत्तरा, हस्त, चित्रा नक्षत्र) या महिन्यांत आणि मोसमी पावसाच्या आगमनापूर्वी, मोसमी पावसातील खंडानंतरच्या काही दिवसांतील पाऊस, हा अशा पद्धतीचा पाऊस असतो. एक ते अडीच किमी निम्न पातळीतील अनेक ढगांपैकी क्युमुलोनिंबस प्रकारच्या ढगातून जर एका तासात १०० मिमी इतका पाऊस झाल्यास ती ढगफुटी मानली जाते.

हेही वाचा >>> कॉलेजमधील हिजाबबंदीचं मुंबई उच्च न्यायालयाने का केलं समर्थन?

पाऊस पडण्याच्या पद्धतीत बदल झाला का?

गेल्या काही वर्षांपासून मोसमी पाऊस पडण्याच्या पद्धतीत बदल झाल्याचे दिसून येत आहे. संततधार पाऊस दुर्मीळ होत चालला आहे. सरासरीइतका पाऊस पडत असला, तरीही तो कमी काळात, कमी दिवसांत पडतो आहे. ढगफुटी किंवा ढगफुटीसदृश पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. पण, मोसमी पावसाच्या पर्जन्यवृष्टीच्या पद्धतीत बदल होत असल्याचा निष्कर्ष आताच काढता येणार नाही. कारण, पर्जन्यवृष्टीच्या पद्धतीत सतत होणारा बदल हे भारतीय उपखंडातील मोसमी पावसाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ३० ते ४० वर्षांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणानंतरच मोसमी पावसाच्या पर्जन्यवृष्टीच्या पद्धतीत बदल झाल्याचा निष्कर्ष काढता येईल, अशी माहिती पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा संस्थेच्या प्रमुख डॉ. मेधा खोले यांनी दिली. dattatray.jadhav@expressindia.com