चालू व ऑगस्ट महिन्यांपासून काही बडय़ा बँकांनी क्रेडिट कार्डाच्या नियम आणि शुल्क रचनेत फेरबदल केले आहेत. एप्रिल-मेपासूनच सुरू असलेल्या या बदलांचा कार्डधारकांवर काय परिणाम होईल? 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रेडिट कार्ड वापराची संकल्पना काय?

क्रेडिट कार्ड हा एक अल्पकालीन उसनवारीचाच प्रकार आहे. ज्याचा वापर वस्तू-सेवांची खरेदी, देयकांचा भरणा करण्यासाठी केला जातो अथवा कर्जाऊ रोख रक्कमही विनाविलंब मिळविता येते. अशा तऱ्हेने मिळविलेली कर्ज रक्कम व्याजासह (जो बँकांच्या सामान्य ग्राहक कर्ज व्याजदरापेक्षा खूप जास्त असतो) नियतकालात फेडावी लागते. याव्यतिरिक्त वार्षिक शुल्क, सेवा शुल्क आणि अधिभार वगैरे निर्धारित मात्रेत त्यावरील जीएसटी दरासह कार्डधारकाला भरावा लागतो. या संबंधाने प्रत्येक कार्डप्रदात्या बँकेची वेगवेगळी नियमरचित पद्धती असते. अनेक क्रेडिट कार्डवर हे वापरानुरूप कार्डधारकाला बक्षीस गुण – रिवॉर्ड पॉइंट्स बहाल करतात. काहींकडून ग्राहकांना कॅशबॅक, ट्रॅव्हल पॉइंट्स किंवा खरेदीवर विमा संरक्षण वगैरे फायदे मिळतात. क्रेडिट कार्डाचा जबाबदारीने वापर आणि परतफेड विलंबाविना नियमित असल्यास, कार्डधारकाला चांगला पत-गुणांक स्थापित करण्यात किंवा सुधारण्यात मदत मिळते. जो  दीर्घ मुदतीची कर्जे मिळविताना फायद्याचा ठरतो.

हेही वाचा >>>मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगवास; आंदोलने, उपोषणे, कारावास आणि संघर्ष; कशी होती ‘नर्मदा बचाव’ची ३९ वर्षे?

नवीन नियम बदल कोणाकडून?

एसबीआय कार्डस्, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक (सिटीबँकेच्या रिटेल व्यवसायासह) या सध्या भारतातील चार मोठय़ा क्रेडिट कार्डप्रदात्या संस्था आहेत. यांचा या बाजारपेठेवर वरचष्माच आहे. त्यांनीच चालू आणि आगामी ऑगस्ट महिन्यापासून काही नियम बदल केले आहेत, जे संलग्न बँकांच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे. कार्डधारकांना तशी आगाऊ सूचना त्यांनी देणे बंधनकारक आहे आणि तसे या बँकांनी केले असेल, असे त्रू्त गृहीत धरू या.

नेमके काय बदलले आहे?

क्रेडिट कार्ड सेवाविषयक नियमांमध्ये कार्डधारकांसाठी अनेक बदल १ जुलैपासून लागू झाले आहेत. त्यात प्रत्येक विनिमयासह मिळणारे बक्षीस गुण अर्थात रिवॉर्ड पॉइंट आणि शुल्कासह इतर बाबींचा समावेश आहे. जसे एसबीआय कार्डने सरकारशी निगडित क्रेडिट कार्ड विनिमय व्यवहारांवर बक्षीस गुण देणे बंद केले आहे. याचबरोबर तिच्या अन्य काही कार्डावरील सरकारशी निगडित क्रेडिट कार्ड व्यवहारांवर बक्षीस गुणांचे संचयन १५ जुलैपासून बंद होईल. येस बँक आणि आयडीएफसी फस्र्ट बँकेने ठरावीक रकमेपेक्षा जास्त देयक भरणा करण्यासाठी कार्ड वापरावर अतिरिक्त शुल्क लागू केले आहे. आयसीआयसीआय बँकेने बहुतेक कार्डासाठी कार्ड बदलण्याचे शुल्क वाढवले आहे. एचडीएफसी बँकेने तिच्या स्विगी क्रेडिट कार्डवरील कॅशबॅक रचनेमध्ये सुधारणा केली आहे. बँक ऑफ बडोदा आणि आयडीएफसी फस्र्ट बँक यासारख्या बँकांनी काही विशिष्ट क्रेडिट कार्डावर व्याजदर आणि परतफेड करण्यास ग्राहकाला उशीर झाल्यास दंडात्मक शुल्क वाढवले आहे. अनेक बँकांना कार्डाद्वारे घर व अन्य भाडय़ांचा भरणा, शिक्षण शुल्क, देयक भरणा, इंधन भरणा विशिष्ट रकमेपेक्षा जास्त केल्यास, जास्तीच्या रकमेवर एक टक्का अतिरिक्त शुल्क कार्डधारकांकडून वसूल केले जाईल.

हेही वाचा >>>राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शहीद अब्दुल हमीद यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन: काय होते अब्दुल हमीद यांचे शौर्य?

काही सकारात्मक बदल काय?

आयसीआयसीआय बँकेने काही धनादेश आणि रोख रकमेसंबंधित सेवांसाठी शुल्क किंवा त्यावरील अधिभार कार्डधारकांसाठी पूर्णपणे माफ केले आहेत. बँकेचे कार्डधारक आता परतफेडीचा धनादेश अथवा रोख रक्कम घेऊन (पिक-अप) जाण्याची नि:शुल्क विनंती करू शकतील. शिवाय पीओएस व्यवहारावरील चार्ज स्लीप शुल्क, डायल-अ-ड्राफ्ट व्यवहार शुल्क, आऊटस्टेशन धनादेश प्रक्रिया शुल्क, कार्ड स्टेटमेंटची नक्कल प्रत नि:शुल्क मिळवू शकतील. एचडीएफसी बँकेनेही क्रेडिट कार्डाद्वारे क्रेड, पेटीएम, मोबिक्विक आणि फ्रीचार्ज यासारख्या पेमेंट वॉलेटमध्ये पैसे जमा करणाऱ्या ग्राहकांच्या व्यवहारांवर सध्याचे २.५ टक्क्यांचे शुल्क कमी करून ते १ टक्क्यावर आणले आहे. ग्राहक आता बँकेच्या पसंतीच्या नेटवर्कशी जोडले जाण्याऐवजी, त्यांना हव्या त्या कार्ड नेटवर्क पर्यायातून निवड करू शकतील.

अ‍ॅक्सिस आणि सिटी बँक कार्डधारकांसाठी बदल काय?

अ‍ॅक्सिस बँकेने १ मार्च २०२३ रोजी भारतातील सिटी बँकेच्या ग्राहक व्यवसायाचे संपादन पूर्ण केले. यात सिटी बँकेच्या क्रेडिट कार्ड व्यवसायाचाही समावेश आहे. आता १५ जुलै २०२४ पर्यंत सिटी बँकेतील क्रेडिट कार्ड खात्यांसह सर्व संबंधित व्यवहार अ‍ॅक्सिस बँकेत स्थलांतरित होत आहेत. अर्थात सिटी बँकेचे सुमारे १२ लाख क्रेडिट कार्डधारक आता अ‍ॅक्सिस बँकेच्या सेवेअंतर्गत येतील. स्थलांतराच्या तारखेपर्यंत संचित बक्षीस गुण हे सिटी बँक कार्डधारकांकडे कायम राहतील. परंतु स्थलांतरानंतर हे संचित गुण केवळ तीन वर्षांसाठी वैध राहतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained credit card usage will become more expensive due to rule changes print exp 0724 amy
First published on: 03-07-2024 at 00:57 IST