World Population and Malthus Theory : जगाची लोकसंख्या मंगळवारी (१५ नोव्हेंबर) ८०० कोटी होणार असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात वर्तवण्यात आला. या लोकसंख्येत सर्वाधिक वाटा चीन आणि भारताचा आहे. विशेष म्हणजे याच अहवालात संयुक्त राष्ट्राने भारत चीनला मागे टाकून लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर येईल, असंही सुतोवाच केलंय. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाचा हा अहवाल काय आहे? त्यात नेमके कोणते अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत? भारत चीनला मागे टाकून लोकसंख्येत पहिल्या क्रमांकावर कधी येणार? आणि लोकसंख्येबाबतचा माल्थस सिद्धांत काय आहे? याचा हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील लोकसंख्या वाढीचा दर काय असणार?

२०३० पर्यंत जगातील लोकसंख्या ८५० कोटी होईल, २०५० पर्यंत हा आकडा ९७० कोटींपर्यंत जाईल आणि २१०० पर्यंत जगाची लोकसंख्या १०४० कोटी इतकी होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०८० मध्ये जगाची लोकसंख्येचा उच्चांक होईल. २१०० नंतर लोकसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल.

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश कधी होणार?

संयुक्त राष्ट्राच्या या अहवालात वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असणारा भारत चीनला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर कधी येईल याबाबतही अंदाज वर्तवण्यात आला. यानुसार, भारत सध्याच्या वेगाने पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये चीनला मागे टाकत लोकसंख्येत पहिल्या क्रमांकावर येईल.

२०५० पर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ केवळ आठ देशांमध्ये होईल. यात काँगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपाईन्स आणि टांझानियाचा समावेश आहे.

लोकसंख्या वाढीचा दर कमी

संयुक्त राष्ट्राचा वार्षिक वर्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट सोमवारी (१४ नोव्हेंबर) जागतिक लोकसंख्या दिनी प्रकाशित झाला. यात हे सर्व अंदाज वर्तवण्यात आले आहेत. या अहवालात सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर १९५० पासूनचा सर्वात कमी असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. २०२० मध्ये लोकसंख्या वाढीचा दर १ टक्क्यांपेक्षा कमी झाला होता.

जगाची लोकसंख्या ७०० कोटींवरून ८०० कोटी होण्यासाठी एकूण १२ वर्षे लागली. आता ही लोकसंख्या ८०० वरून ९०० कोटी होण्यासाठी १५ वर्षे लागतील. म्हणजेच ९०० कोटी लोकसंख्या होण्यासाठी २०३७ साल उजाडेल. यावरूनच जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर मंदावला आहे, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.

माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत काय आहे?

ब्रिटेनचे अर्थशास्त्रज्ञ थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी लोकसंख्या वाढीवर एक सिद्धांत मांडला होता. त्याचं नाव माल्थस सिद्धांत असंच आहे. माल्थस यांच्या या सिद्धांतानुसार, प्रत्येक २५ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. जेव्हा संसाधनांमध्ये सामान्य गतीने वाढ होते, तेव्हा लोकसंख्या वाढीचा दर दुप्पट असतो. उदा. लोकसंख्या २ वरून ४ आणि ४ वरून ८ झाली असेल, तर संसाधन २ वरून ३ आणि ३ वरून ४ होईल.

लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम

माल्थसच्या सिद्धांतानुसार, लोकसंख् वेगाने वाढली, तर संसाधनं कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक संसाधनावर ताण येतो. माल्थस म्हणतात की, अशास्थितीत लोकसंख्या नियंत्रणासाठी आपोआप नैसर्गिक घटना घडतात. उदा. दुष्काळ, साथीरोग, युद्ध आणि नैसर्गिक संकट अशा घटनांमधून लोकसंख्या नियंत्रित होते. असं असलं तरी माल्थस यांच्या सिद्धांतावर अनेकदा टीकाही झाली आहे.

लोकसंख्या वाढीमागील कारणं

संयुक्त राष्ट्रानुसार, उपचार आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकास झाल्याने जनारोग्य, पोषण, स्वच्छता आणि औषधं अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे साथीरोगाचं प्रमाण कमी झालंय. साथीरोग आले तरी त्यात उपचार उपलब्ध असल्याने आधीच्या तुलनेत मृतांची संख्या कमी आहे. आरोग्य सुविधा असल्याने आयुष्यमान वाढलं आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी झाला आहे आणि लोकसंख्या वाढली.

आंतरराष्ट्रीय कुटुंब नियोजन परिषदेत काय चर्चा?

याबाबत पट्टाया-थायलंड येथील परिषदेला उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि पुण्यातील सम्यकचे प्रमुख आनंद पवार म्हणाले, “जगाच्या उत्पत्तीपासून प्रथमच १५ नोव्हेंबरला पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्यांची संख्या ८०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. आज जगाची लोकसंख्या आठ बिलिअन म्हणजे ८०० कोटी होणार आहे. हा निश्चितच एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे.”

हेही वाचा : विश्लेषण : यंदा ५० टक्के लोक स्वतःच आपली माहिती भरू शकणार, काय आहे अमित शाहांनी घोषणा केलेली ई-जनगणना?

“पट्टाया-थायलंड येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुटुंब नियोजन परिषदेमध्ये बोलताना संयुक्त राष्ट्रसंघाचा लोकसंख्या निधी (युएनएफपीए) या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. नटालिया कानेम यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ‘आठ’चा आकडा हा प्रतिकात्मक आहे. तो जर फिरवून आडवा केला, तर अनंताचे (इनफिनिटी) चित्र तयार होते. हा आकडा पार करत असणाऱ्या जगात आता स्त्रिया व मुलींसाठी विकासाच्या अनंत शक्यता निर्माण झाल्या पाहिजेत,” अशी माहिती आनंद पवार यांनी दिली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on when will india top in world population what is malthus theory pbs
Show comments