सोयाबीनचे दर सध्या किती?

अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, चीन आणि भारत या देशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या प्रमुख देशांमधून जागतिक उत्पादनाच्या सुमारे ९० टक्के उत्पादन होते. यामुळे या देशांतील सोयाबीनची मागणी, पुरवठा आणि उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलांचा परिणाम सोयाबीनच्या किमतीवर होत असतो. २०२४-२५ च्या हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विन्टल इतका आहे. देशात सोयाबीनच्या काढणीला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे सरासरी दर ४ हजार ५०० रुपयांपेक्षाही कमी आहेत.

गेल्या वर्षी काय स्थिती होती?

गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किमती कमी आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत सोयाबीनची आवक सर्वाधिक असते. २०२१ मध्ये या तीन महिन्यांत सोयाबीनचे सरासरी दर ५ हजार ९८० रुपये, २०२२ मध्ये ५ हजार ४२५ रुपये, तर २०२३ मध्ये ४ हजार ८५४ रुपये प्रति क्विन्टल इतके होते. यंदा बाजारात सोयाबीनची आवक वाढू लागली आहे, पण दर कमी आहेत. व्यापारी मनमानीपणे हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे.

हेही वाचा >>>मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी कायमची की तात्पुरती?

सरकारने कोणता निर्णय घेतला?

नवीन सोयाबीन बाजारात येण्याआधी दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यातेल आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ केली. कच्चे सोयातेल, पामतेल आणि सूर्यफूल तेल आयातीवर २७.५ टक्के आयातशुल्क लागू झाले. त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या दरांमध्ये किंचित सुधारणा झाली. पण, ही किरकोळ दरवाढ टिकू शकली नाही. बाजारात सोयाबीनची आवक वाढू लागताच दर पुन्हा खाली गेले आहेत. केंद्र सरकारने गेल्या वर्षी देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यातेलाच्या किमती नियंत्रित आणि कमी करण्यासाठी खाद्यातेलावरील आयात शुल्क कमी केले होते. त्यामुळे देशात खाद्यातेलाची विक्रमी आयात तर झाली, पण सोयाबीनचे देशांतर्गत भाव कमी झाले होते.

सरकारी उपाययोजनांचे काय?

राज्यात सोयाबीन, मूग आणि उडदाच्या खरेदीसाठी नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटना) आणि एनसीसीएफने (राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना) २०९ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. या खरेदी केंद्रांवर १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी हमीभावानुसार सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. या व्यवस्थेतून १३ लाख टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये नाफेड तर एनसीसीएफची ६३ खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यातून शेतकऱ्यांना कितपत दिलासा मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, सोयाबीनच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>Christopher Columbus:अमेरिकेचा शोध लावणारा कोलंबस इटालियन नव्हे तर स्पॅनिश ज्यू?

सोयाबीन तेलाचे दर का वाढले?

सुमारे महिनाभरापूर्वी सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यातेल आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ केल्यानंतर तत्काळ सोयाबीन तेलाचे भाव किलोमागे २० ते २५ रुपयांनी वाढले. सध्या किरकोळ बाजारात सोयाबीन तेल १२५ ते १६० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा तर झालाच नाही, पण सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. कमी आयात शुल्काच्या काळात देशात आयात केलेल्या खाद्यातेलापैकी सुमारे ३० लाख टन साठा शिल्लक असल्यामुळे खाद्यातेलाच्या दरात वाढ करू नये, असे निर्देश केंद्र सरकारने खाद्यातेल प्रक्रिया उद्याोजकांच्या संघटनांना दिले होते, पण तरीही खाद्यातेलाच्या किमती चढ्याच राहिल्या.

देशातील सोयाबीनची स्थिती काय?

अमेरिकन कृषी विभागाच्या (डब्ल्यूएएसडीई) अहवालानुसार २०२४-२५ मध्ये जगात ४२२६ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी अधिक आहे. भारतात १२२ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी जास्त आहे. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या (एसईए) अहवालानुसार २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये सोयाबीनच्या निर्यातीत वाढ झाली. चालू वर्षी एप्रिल ते मे २०२४ मध्ये ३.४५ लाख टन सोयापेंड निर्यात झाली. नोव्हेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत १५.९२ लाख टन सोयातेलाची आयात झाली आहे.