पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडीजवळ सोमवारी सकाळी (१७ जून) रेल्वेचा भीषण अपघात झाला. कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिल्याने किमान नऊ जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले. रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन रेल्वेतील जोरदार धडकेमुळे कांचनजंगा एक्स्प्रेसचे मागील तीन डब्बे रुळावरून घसरले. मात्र, अपघातामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मानवी चुकीमुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यांत्रिक बिघाडांपासून मानवी निष्काळजीपणापर्यंत अनेक कारणांमुळे गेल्या दशकभरात देशात अनेक रेल्वे अपघात झाले आहेत. या भीषण रेल्वे अपघातांवर आणि हे अपघात घडण्यामागील कारणांवर एक नजर टाकू या.

१. २०१४ – गोरखधाम एक्स्प्रेस

२६ मे २०१४ रोजी हिसार-गोरखपूर मार्गावरील गोरखधाम एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले आणि मोठा अपघात झाला. तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत या अपघाताविषयी बोलताना सांगितले होते की, गोरखधाम एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिली. मालगाडी लूप लाईनऐवजी मेन लाईनवर उभी केली. एक्स्प्रेसचा वेग ताशी १०० किमी होता. हा अपघात यांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात २९ प्रवाशांनी आपला जीव गमावला, तर ७० हून अधिक लोक जखमी झाले.

२६ मे २०१४ रोजी हिसार-गोरखपूर मार्गावरील गोरखधाम एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले आणि मोठा अपघात झाला. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : Kanchanjunga Express Accident: भारतात एवढे रेल्वे अपघात होण्याची कारणं काय?

२. २०१५ – जनता एक्स्प्रेस

वाराणसी-डेहराडून जनता एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील एका स्थानकावर न थांबताच पुढे गेली, ज्यामुळे २० मार्च २०१५ रोजी मोठा अपघात झाला आणि रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. “रेल्वे बछरावन स्थानकात प्रवेश करत असताना, रेल्वेतील लोको पायलटने सिग्नल ओव्हरशॉट केला,” असे रेल्वेच्या प्रवक्त्याने त्यावेळी सांगितले. त्या नंतर केलेल्या चौकशीत ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात ३९ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आणि १५० प्रवासी जखमी झाले.

वाराणसी-डेहराडून जनता एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील एका स्थानकावर न थांबताच पुढे गेली, ज्यामुळे २० मार्च २०१५ रोजी मोठा अपघात झाला. (छायाचित्र-पीटीआय)

३. २०१६ – इंदूर-पाटणा एक्स्प्रेस

२० नोव्हेंबर २०१६ रोजी इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे १४ डबे कानपूर देहात जिल्ह्यातील पुखरायन भागात रुळावरून घसरले. या अपघातात १५२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला होता. सरकारने या अपघाताला दहशतवादी हल्ला कारणीभूत असल्याचे सांगितले होते. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमधील एका निवडणूक प्रचारसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताला ‘षडयंत्र’ म्हटले होते. परंतु, २०२० मध्ये सीआरएसच्या अंतिम अहवालात हा अपघात यांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगण्यात आले. या अहवालात नमूद करण्यात आले की, डब्यावरील वेल्डिंगचा काही भाग गंजल्यामुळे खाली पडला आणि ट्रॅकमध्ये अडकला, ज्यामुळे दोन डबे रुळावरून उडून तिसऱ्या कोचवर प्रचंड वेगाने पडले.

२० नोव्हेंबर २०१६ रोजी इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे १४ डबे कानपूर देहात जिल्ह्यातील पुखरायन भागात रुळावरून घसरले. (छायाचित्र-पीटीआय)

४. २०१७ – हिराखंड एक्स्प्रेस

२१ जानेवारी २०१७ रोजी जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस आंध्र प्रदेशातील कुनेरू स्टेशनवर रुळावरून घसरली. ओडिशाकडे जाणाऱ्या रेल्वेच्या या अपघातात ४० जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. या अपघातामागे माओवाद्यांचा हात असल्याचे सांगण्यात आले. या घटनेच्या तपासाची जबाबदारी आंध्र प्रदेशातील गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आली. एनआयएचा एफआयआरही दाखल करण्यात आला. परंतु, जुलै २०१७ मध्ये माओवाद्यांनी या प्रदेशात स्फोटके पेरल्याचा आरोप फेटाळला गेला. इंदूर-पाटणा एक्स्प्रेस आणि हिराखंड एक्स्प्रेस प्रकरणांमध्ये अद्याप अंतिम अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही.

२१ जानेवारी २०१७ रोजी जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस आंध्र प्रदेशातील कुनेरू स्टेशनवर रुळावरून घसरली. (छायाचित्र-पीटीआय)

५. २०१८ – जालंधर-अमृतसर डीएमयू आणि अमृतसर-हावडा एक्स्प्रेस

१९ ऑक्टोबर २०१८ रोजी अमृतसरजवळ दसरा उत्सव पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या लोकांना दोन रेल्वे गाड्यांनी चिरडले. यात जवळ जवळ ६० लोकांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले. तब्बल ३०० लोकांचा जमाव फटाके पाहण्यासाठी रुळावर उभा होता. जालंधर-अमृतसर डीएमयू रुळांवर आल्यावर काही लोक दुसऱ्या ट्रॅकवर गेले आणि तितक्यात अमृतसर-हावडा एक्स्प्रेस आली; ज्यामुळे हा भीषण अपघात घडला. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. यात अनेक कलाकारांना, अमृतसर महानगरपालिका, कार्यक्रमात सहभागी असलेले राजकारणी, पोलिस आणि रेल्वे यांना दोषी ठरवण्यात आले.

१९ ऑक्टोबर २०१८ रोजी अमृतसरजवळ दसरा उत्सव पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या लोकांना दोन रेल्वे गाड्यांनी चिरडले. (छायाचित्र-पीटीआय)

या घटनेच्या तपासाची जबाबदारी मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तां (सीसीआरएस) कडे देण्यात आली. राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, “सीसीआरएसच्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार, दसरा मेळाव्यादरम्यान घडलेली रेल्वे दुर्घटना रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे घडली.”

६. २०१९ – सीमांचल एक्स्प्रेस

३ फेब्रुवारी २०१९ रोजी बिहारच्या वैशाली जिल्ह्यात दिल्लीला जाणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले, ज्यात सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. सहदेई-बुजुर्ग रेल्वे स्थानकाजवळ नऊ डबे रुळावरून घसरले. योग्य देखभालीचा अभाव, गंज आदींमुळे रेल्वे ट्रॅकमध्ये हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली.

३ फेब्रुवारी २०१९ रोजी बिहारच्या वैशाली जिल्ह्यात दिल्लीला जाणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले, ज्यात सात जणांचा मृत्यू झाला. (छायाचित्र-पीटीआय)

७. २०२० – औरंगाबादजवळ मालगाडीमुळे १६ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू

हैदराबादजवळच्या चेर्लापल्ली स्टेशनवरून नाशिकच्या पानेवाडी स्टेशनला जाणाऱ्या रिकाम्या मालगाडीने ८ मे २०२० रोजी रुळांवर झोपलेल्या १६ कामगारांना चिरडले. लोको पायलटने कामगारांना पाहिले, परंतु वेळेत रेल्वे थांबवण्यात अपयश आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. मध्य प्रदेशातील स्थलांतरित कामगार घरी परतण्याच्या प्रयत्नात होते. तो करोनाचा काळ होता. लॉकडाउन आणि अनेक रोजंदारी मजुरांचे उत्पन्न कमी झाल्यामुळे या कामगारांना घरी परतायचे होते. थकव्यामुळे ते रेल्वे रुळांवर झोपले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात आला. सीआरएसने केलेल्या प्राथमिक चौकशीत कामगारांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरण्यात आले. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक असल्याची शक्यता नाकारली गेली.

२०२१ मध्ये रेल्वे अपघाताची कोणतीही मोठी घटना नोंदवली गेली नाही, हे कोविड वर्ष होते. लॉकडाऊनमुळे २२ मार्च २०२० पासून सर्व प्रवासी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मे २०२० पासून काही गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. वार्षिक सीआरएस अहवालानुसार “२०२१-२२ हे वर्षदेखील कोविड-१९ साथीच्या रोगाने प्रभावित होते. परंतु, मागील वर्षाप्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन नव्हते.”

८. २०२२ – बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेस

१३ जानेवारी २०२२ रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील डोमोहनी भागात बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरल्याने १० प्रवाश्यांचा मृत्यू झाला आणि ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले. ‘सीआरएस’नुसार, यांत्रिक बिघाडामुळे डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात आले.

१३ जानेवारी २०२२ रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील डोमोहनी भागात बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरल्याने १० प्रवाश्यांचा मृत्यू झाला. (छायाचित्र-पीटीआय)

९. २०२३ – शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी

शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन रेल्वे गाड्यांची २ जून २०२३ रोजी टक्कर झाल्यामुळे भीषण अपघात घडला. या अपघातात किमान २९३ लोकांचा मृत्यू झाला. शालिमार येथून चेन्नईच्या दिशेने जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस बाहानगा रेल्वेस्थानकाजवळ उभ्या असलेल्या एका मालगाडीला धडकली. रेल्वेमार्ग हा दुहेरी होता आणि मालगाडी लूप लाईनवर थांबलेली होती. धडकेनंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे बाजूच्या रुळावर अस्ताव्यस्त पसरले. ही धडक इतकी जोरदार होती की, अपघातानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे इंजिन मालगाडीच्या डब्यांवर चढले. त्याचवेळी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस या ठिकाणी आली आणि रुळांवर पसरलेल्या डब्यांना तिने धडक दिली. हा अपघात आजपर्यंतच्या सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक होता.

शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन रेल्वे गाड्यांची २ जून २०२३ रोजी टक्कर झाल्यामुळे भीषण अपघात घडला. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : जपानमध्ये मांस खाणार्‍या जिवाणूचा उद्रेक, ४८ तासांत माणसाचा मृत्यू; हे जीवाणू जगभरात थैमान घालणार?

जुलै २०२३ मध्ये, रेल्वे अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले. सीआरएस अहवालात एकापेक्षा जास्त स्तरांवर त्रुटी आढळून आल्या. रेड सिग्नलकडे दुर्लक्ष केले नसते तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे यात नमूद करण्यात आले. सीबीआयने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपपत्रही दाखल केले होते.