वयाच्या २२व्या वर्षी दोन ऑलिम्पिक पदके आणि तीदेखील एकाच स्पर्धेत मिळवून मनू भाकरने भारतीय क्रीडा क्षेत्रात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले. अनेक अडथळ्यांवर मात करत भारतीयांनी ऑलिम्पिक स्पर्धेत मिळविलेले कांस्यपदकही सुवर्णपदकांप्रमाणे भासते. तरीदेखील एकाच स्पर्धेत दोन पदके अद्याप एकाही भारतीयाला जिंकता आली नव्हती. मनूने ती कामगिरी करून दाखवली. त्यामुळेच मनूची पॅरिसमधील दोन पदके ही भारतासाठी आणि तिच्यासाठीही वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. तिला दुसऱ्या पदकासाठी अर्थातच सरबज्योत या गुणी नेमबाजाची साथ मिळाली. 

दोन्ही पदके एअर पिस्तूलमध्ये…

बॉक्सिंग, फुटबॉल आणि अगदी थांग ता खेळ खेळून नेमबाजीत रमलेल्या मनूने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात शनिवारी वैयक्तिक कांस्यपदक मिळविले. त्यानंतर एका दिवसाच्या अंतराने मनूने याच स्पर्धा प्रकारात मिश्र दुहेरीतदेखील कांस्यपदकाची कामगिरी केली. दोन दिवसांत मनूने दोन ऑलिम्पिक पदकांची कमाई करून एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला.

हेही वाचा – ऑलिम्पिक उद्घाटनावरून वाद का झाला? काय आहे ‘द लास्ट सपर’चा संदर्भ?

विक्रमवीर मनू भाकर…

स्वातंत्र्यानंतरच्या अधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांचा विचार केला, तर अशी कामगिरी करणारी मनू पहिली भारतीय खेळाडू ठरते. पण, ऑलिम्पिकचा इतिहास बघितला तर मूळ ब्रिटिश पण, १९००च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या नॉर्मन प्रिचार्डने सर्वात आधी अशी कामगिरी केली होती. प्रिचार्डने तेव्हा २०० मीटर धावणे आणि २०० मीटर अडथळा अशा दोन शर्यतीत रौप्यपदक मिळविले होते. आजही भारताचा पहिला पदकविजेता म्हणून प्रिचार्डचीच ओळख दिली जाते. त्यानंतर २०२४ मध्ये मनूने एकाच स्पर्धेत दोन पदके मिळविण्याची कामगिरी केली.

सरबज्योत सिंग कोण?

ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या भारतीय संघातील सरबज्योत हा आणखी एक युवा खेळाडू. पंजाबमधी अंबाला येथून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर सरबज्योतने आपल्या प्रभावी कौशल्य आणि सातत्यपूर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सात वर्षांपूर्वी सरबज्योतने आपल्या नेमबाजी प्रशिक्षणास सुरुवात केली. 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कामगिरी कशी?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अगदी सुरुवातीला १० मीटर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक प्रकारात सरबज्योत अपयशी ठरला होता. प्रयत्नांची शिकस्त करूनही सरबज्योतला चीन, कोरियन नेमबाजांसमोर आव्हान राखता आले नाही. पण, मिश्र दुहेरीत पदकविजेत्या मनूच्या कामगिरीतून प्रेरणा घेत त्याने अचूक लक्ष्य साधत पूरक कामगिरी करताना कांस्यपदकात आपला वाटा उचलला. कणखर मानसिकता ही सरबज्योतची खरी ताकद असून, मोठ्या स्पर्धेत खडतर आव्हानाच्या दडपणाचा सामना करण्याची क्षमता त्याच्याकडे चांगली आहे.

सरबज्योतच्या कारकिर्दीतला निर्णायक क्षण

नेमबाजीला सुरुवात केल्यावर दोन वर्षांतच सरबज्योतने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. सर्व प्रथम २०१९ मध्ये कुमार विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र दुहेरीत त्याने रौप्यपदक मिळविले. याच स्पर्धेत तो सांघिक सुवर्णपदकाचाही मानकरी ठरला. त्याने पहिले वैयक्तिक पदक जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१९ मध्येच मिळविले. याच स्पर्धा प्रकारात तेव्हा सरबज्योत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. त्यानंतर मात्र सरबज्योतने मागे वळून बघितले नाही. 

एकापेक्षा अधिक वैयक्तिक ऑलिम्पिक पदके

ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत दोनच भारतीयांनी एकापेक्षा अधिक वैयक्तिक पदके मिळविली आहेत. यामध्ये सर्वप्रथम कुस्तीगीर सुशील कुमारचे नाव येते. त्याने २००८ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत फ्री-स्टाईल कुस्तीत कांस्यपदक मिळविले होते. त्यानंतर २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सुशील रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. त्यानंतर पी. व्ही. सिंधूने २०१६ रियो स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. पाठोपाठ २०२१ मध्ये टोक्योत सिंधूने कांस्यपदकाची कामगिरी केली. सुशील आणि सिंधू यांनी लागोपाठच्या स्पर्धेत ऑलिम्पिक पदके मिळविली. पण, येथे मनूने एकाच स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली.

आणखी पदक मिळण्याची संधी किती?

मनू भाकरने या वेळी गुरु जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली टोक्योतील अपयश आठवणीतूनही काढून टाकण्याचा ध्यास घेतला आहे. स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात दोन दिवसांत तिने दोन पदके मिळवून आधीच आपला दबदबा निर्माण केला आहे. रायफल प्रकारातील नेमबाज अपयशी ठरत असताना पिस्तूल प्रकारात मनूने भारतासाठी पदकांचा नेम अचूक साधला. मनू आता २५ मीटर पिस्तूल प्रकारातही सहभागी होणार आहे. स्पर्धेतील मनूची लय लक्षात घेता तिला या स्पर्धा प्रकारातही पदकाची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – ऑलिम्पिक खेळाडू ज्वाला गुट्टाची नाराजीची पोस्ट; उद्घाटन सोहळ्यातील टीम इंडियाच्या कपड्यांवरुन वाद का होतोय?

प्रथम १९५२… नंतर २००८ पासून सतत..

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची पदकसंख्या एका पदकाच्या पुढे अभावानेच गेली. हा योग पहिल्यांदा १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये आला. त्या स्पर्धेत खाशाबा जाधवांचे कुस्तीमधील कांस्य आणि हॉकीमधील सुवर्ण अशी दोन पदके भारताने जिंकली. पण, त्यानंतर ५६ वर्षांनी म्हणजे २००८ पासून भारताने सातत्याने ऑलिम्पिक स्पर्धेत एकापेक्षा अधिक पदके मिळविली आहेत. लंडन २०१२ ऑलिम्पिक स्पर्धेत तर भारताने कुस्ती आणि नेमबाजी या खेळांत एकापेक्षा अधिक पदके मिळविली. लंडनमध्ये सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी कुस्तीत, तर विजय कुमार आणि गगन नारंग यांनी नेमबाजीत पदकाची कमाई केली होती.

मनूच्या नावावर अन्य कुठले विक्रम?

या कामगिरीने मनूच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली. २० वर्षांत सुमा शिरुरनंतर ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी मनू पहिली महिला नेमबाज ठरली. त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक मिळविणारी ती पहिली महिला नेमबाज ठरली. एअर पिस्तूल प्रकारातही पदक मिळविणारी ती पहिली भारतीय ठरते. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत सरबज्योतच्या साथीत पदक हे नेमबाजीतील पहिले सांघिक पदक ठरले. ऑलिम्पिक स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळविणारीदेखील ती पहिली भारतीय खेळाडू ठरते.