Untold Story of R. D. Banerjee and Mohenjo-Daro: २० सप्टेंबर १९२४ रोजी म्हणजेच आजपासून तब्बल १०० वर्षांपूर्वी Illustrated London News मध्ये हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीच्या शोधाची घोषणा करण्यात आली. या शोधात अनेक भारतीय अभ्यासकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यातील एक नाव म्हणजे आर. डी. बॅनर्जी. आर. डी. बॅनर्जी यांची मुख्य ओळख ‘मोहेंजोदारो मॅन’ अशी होती. जगातील आद्य संस्कृती मानल्या गेलेल्या सिंधू संस्कृतीच्या शोधात आर. डी. बॅनर्जी यांनी मुख्य भूमिका बजावली होती. १९२२-२३ साली मोहेंजोदारोत झालेल्या उत्खननाचे श्रेय त्यांच्याकडे जाते. बॅनर्जी यांनी मोहेंजोदारो या स्थळावर सापडलेल्या अवशेषांमध्ये बौद्धपूर्व काळातील पुरावशेष शोधून काढले तसेच मोहेंजोदारो आणि हडप्पा या स्थळांमधील साम्य लक्षात आणून दिलं. या शोधामुळे उत्खननाला दिशा मिळाली. त्यामुळे त्याकाळी अज्ञात असलेल्या ताम्रपाषाणयुगीन सिंधू संस्कृतीचे अस्तित्त्व सिद्ध झाले. या संस्कृतीविषयी बॅनर्जी यांनी त्यांच्या विविध लेखांमध्ये आणि पुस्तकांमध्ये वर्णन केले आहे. अ‍ॅन इंडियन सिटी थाऊजंड इयर्स अॆगो, मोहेंजोदारो, प्रीहिस्टोरिक, एन्शण्ट अँड हिंदू इंडिया, मोहेंजोदारो-ए फॉरगॉटन काही काही त्यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत. परंतु काळाच्या ओघात या मोहेंजोदारो मॅनचा वावर पुरातत्त्व क्षेत्रातून गायब झाला आणि मागे राहिले ते केवळ संदर्भ. त्याच पार्श्वभूमीवर मोहेंजोदारो मॅनचं पुढं झालं काय? याचा घेतलेला हा आढावा.

अधिक वाचा: Indus Valley Civilization: १०० वर्षांपूर्वी खोवला गेला मानाचा तुरा आणि भारतीय संस्कृती ठरली तब्बल ५००० वर्षांहून अधिक प्राचीन!

आर. डी. बॅनर्जी यांचा जन्म १२ एप्रिल १८८५ रोजी एका बंगाली कुटुंबात झाला. मूलतः हुशार असलेल्या बॅनर्जी यांनी आपल्या शालेय शिक्षणास सुरुवात बंगालमधील सर्वात जुन्या शाळेतून म्हणजे कृष्णनाथ कॉलेज-स्कूलमधून (मूळ नाव: Krishnath College School) केली. तर पुढील शिक्षण हे अनुक्रमे प्रेसिडन्सी कॉलेज आणि कोलकाता विद्यापीठातून पूर्ण केले. आर. डी. बॅनर्जी यांनी १९१० साली कोलकात्यातील इंडियन म्युझियममध्ये पुरातत्त्व विभागात सहाय्यक म्हणून काम सुरू केले. तर १९११ साली ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) विभागात सहाय्यक अधीक्षक म्हणून रुजू झाले आणि १९१७ साली त्यांना वेस्टर्न सर्कलचे अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणून पदोन्नती देण्यात आली. यानंतर ते वायव्येच्या सिंधू खोऱ्यात काही काळासाठी काम करत होते. १९२३ साली त्यांची बदली ईस्टर्न सर्कलमध्ये झाली. ही बदली त्यांनी स्वतः मागून घेतली होती. मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात पुरातत्त्व विभाग सुरू करत असताना त्यांच्याकडून झालेल्या आर्थिक गोंधळानंतर लगेचच ही बदली झाल्याचे नयनज्योत लाहिरी यांनी Finding Forgotten Cities: How the Indus Civilization was Discovered या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. ज्यावर्षी मोहेंजोदारो येथे उत्खननाची सुरुवात झाली. त्याचवर्षी त्यांची बदली ईस्टर्न सर्कलमध्ये झाली. आर. डी. बॅनर्जी हे बांगलादेशमध्ये असणाऱ्या राजशाही जिल्ह्यातील अवशेषांवर काम करत होते. त्याच निमित्ताने त्यांची बदली करण्यात आल्याचे प्रथमदर्शी दिसते. या कालखंडात त्यांनी पहारपूर येथील उत्खननात भाग घेतला. ते त्रिपुराच्या हैहय राजांवर काम करत होते. त्या संदर्भात त्यांना शिलालेख आणि इतर शिल्पांचा अभ्यास करणं आवश्यक होत, म्हणूनच जॉन मार्शल यांनी त्यांना जबलपूरपासून जवळ असलेल्या भेडाघाटला भेट देण्याची त्यांना परवानगी दिली. १९२५ साली ऑक्टोबर महिन्यात त्यांनी भेडाघाटला असलेल्या चौसष्ठ योगिनी मंदिराला दुसरी भेट दिली होती.

मोहेंजोदारो: विकिपीडिया

तारेची मूर्ती आणि कलंक

बॅनर्जी यांनी भेट दिलेले हे मंदिर योगिनींच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध होते. या मंदिरात बौद्ध देवी तारेची मूर्ती होती. हीच तारेची मूर्ती आणि तिच्याशी संबंधित घडलेल्या घटनेमुळे बॅनर्जींच्या आर्किऑलॉजिकल सर्व्हेमधील कारकिर्दीचा शेवट झाला. १९२५ साली त्यांनी या मंदिराला भेट दिल्यानंतर तारेची मूर्ती अचानक नाहीशी झाली. या घटनेमागे बॅनर्जी यांनाच दोषी ठरवण्यात आले, त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला धक्का बसला. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे १९२७ च्या गोपनीय फाइलमध्ये आहेत. त्या फाईलवर “मध्य प्रांतातील भेडाघाट येथील चौसष्ट योगिनी मंदिराशी संबंधित दगडी मूर्ती चोरण्याच्या प्रकरणात आर्किऑलॉजिकल सर्व्हेच्या ईस्टर्न सर्कलचे अधीक्षक आर.डी. बॅनर्जी यांना सेवेतून काढून टाकले” असे शीर्षक आहे असे नयनज्योत लाहिरी यांनी नमूद केले आहे. या कागदपत्रांतून आपल्याला १९२५-२६ साली बॅनर्जींसोबत काय घडले आणि कोणत्या असामान्य परिस्थितीत त्यांना आर्किऑलॉजिकल सर्व्हेमधून काढून टाकण्यात आले हे समजू शकते.

या प्रकाराला १८ ऑक्टोबर १९२५ रोजी सुरुवात झाली. राखालदास बॅनर्जी, दोन ऑफिस शिपाई -बसुदेव आणि माधवदास आणि दोन स्थानिक मजूर- अल्फू आणि मानकिया धिमार यांच्यासह मंदिरात गेले होते. त्या दिवशी दुपारी मंदिरातील पुजारी बाला प्रसाद यांच्या उपस्थितीत मानकिया धिमारने तारेची मूर्ती उचलली. त्यावेळी बॅनर्जी यांचा शिपाई त्याच्याबरोबर होता. पुजाऱ्याने मूर्ती काढण्यास कोणताही आक्षेप घेतला नाही, कारण त्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व पुरातत्त्व खात्याच्या कर्मचार्‍यांच्या आदेशाने होत होते. किंबहुना उपस्थित पुजाऱ्याने वरिष्ठ महंत जगजीवनपुरींना या बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. जबलपूरचे तहसीलदार भेडाघाट येथे आले आणि त्यांनी चौसष्ट योगिनी मंदिरातील तारेची मूर्ती नागपूर संग्रहालयात पाठवण्याबद्दल महंतांना विचारले, त्यावेळी त्यांना हा प्रकार समजला.

अधिक वाचा:  Harappa ‘या’ उत्खननात सापडले, ४००० वर्षे प्राचीन भारतीय मल्टिग्रेन हाय प्रोटिन डाएट लाडू! संशोधन काय सांगते?

मोहेंजोदारो: ग्रेट बाथ विकिपीडिया

पुजाऱ्याने दिलेली माहिती

पुजाऱ्याने पोलिसांना नंतर या प्रसंगाची तपशीलवार माहिती दिली. ‘१८ ऑक्टोबर १९२५ रोजी, सकाळी ८.३० वाजता, तो …’बाला प्रसाद’ हा गौरीशंकराची (मंदिराची मुख्य देवता) पूजा करत होता. तेव्हा मानकिया धिमार, अल्फू आणि एक भारतीय साहेब इंग्रजी पोशाखात आणि टोपी घालून मंदिरात आले. त्या भारतीय साहेबाने मंदिराचा अभ्यास केला. भारतीय साहेब बॅनर्जी होते आणि शिपाई बसुदेव होता. पुजाऱ्याने पूजा संपवल्यानंतर अल्फूने सांगितले की, बॅनर्जी आणि त्यांचे लोक दुपारी २.३० पर्यंत तिथेच राहतील. पुजाऱ्याने मंदिराची चावी अल्फूच्या हाती दिली आणि पंचमठा मंदिरात पूजा करायला निघून गेला. ते परत आल्यावर त्यांनी पाच पुरुषांना पाहिले, ज्यात ते चार होते जे सकाळी त्याने पाहिले होते आणि पाचवा छायाचित्रकार सैलेन्द्र मोहन घोष हा मूर्तीचा फोटो घेत होता.’

पुजाऱ्याने महंतांना या प्रकाराची कल्पना का दिली नाही?

महंतांना न सांगण्याचा पुजाऱ्याचा निर्णय एका आठवड्यापूर्वी घडलेल्या घटनेवर आधारित होता. त्यावेळी एक हिंदुस्तानी साहेब मंदिरावर झोपले होते, त्यावेळी पुजाऱ्याने त्यांना तिथे झोपण्यापासून रोखले होते. यावर महंतांनी त्यांना त्रास देऊ नका असे सांगितले. म्हणूनच त्यांनी महंतांना मूर्ती काढण्याबद्दल लगेच माहिती दिली नाही. त्या पुजाऱ्याला हे कायदेशीर आदेशावरूनच होत आहे असे वाटले. चौसष्ठ योगिनी मंदिर आर्किऑलॉजिकल सर्व्हेच्या अखत्यारीतील संरक्षित स्मारक होते. त्यामुळे त्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळले असे पुजाऱ्याने पोलिसांना दिलेल्या तपशिलात नमूद केले आहे. नयनज्योत लाहिरी यांनी म्हटल्याप्रमाणे बॅनर्जी यांच्या कर्मचाऱ्यांनी मंदिरातून मूर्ती काढल्यानंतर ती भेडाघाटच्या बंगल्यात आणली, जिथून ती नंतर बॅनर्जी यांच्या कारमध्ये ठेवली गेली आणि जबलपूरला नेण्यात आली. पुढे भेडाघाटची तारा मूर्ती कोलकात्याला पोहोचली. या प्रकारानंतर १९२६ साली बॅनर्जी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. पुढे त्यांनी अनुक्रमे कोलकाता विद्यापीठ आणि बनारस विश्व हिंदू विद्यापीठात अध्यापनाचं काम केलं. एकूणच या प्रकारात बॅनर्जी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते हे समजते तरीही या प्रकरणात पुढे त्यांना शिक्षा का झाली नाही? आणि जर हे आरोप खरे असतील तर कोलकाता आणि बनारस विश्व् हिंदू विद्यापीठानं त्यांना अध्ययनासारखी मोठी जबाबदारी कशी दिली? या प्रश्नांची उत्तर अनुत्तरित आहेत. याच संदर्भात काही महत्त्वाचे संदर्भ पी के मिश्रा यांच्या राखल दास बॅनर्जी: द फॉरगॉटन आर्किओलॉजिस्ट या पुस्तकात सापडतात.

श्रेयवादाचा संदर्भ

‘राखल दास बॅनर्जी: द फॉरगॉटन आर्किओलॉजिस्ट’ या पुस्तकात लेखक पी के मिश्रा यांनी सिंधू संस्कृतीच्या श्रेयवादाचा संदर्भ दिला आहे. मिश्रा यांनी प्रतिष्ठित संस्थांमध्ये या विषयावर व्याख्येनेही दिली आहेत. या श्रेय वादाच्या लढाईत मिश्रा यांनी जॉन मार्शल यांना दोषी ठरवले आहे. जॉन मार्शल यांचे भारतीय पुरातत्वशास्त्राच्या इतिहासात मोठे योगदान आहे. ते १९०२ ते १९२८ या दरम्यान भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे सर्वात जास्त काळ महासंचालक होते. मिश्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मार्शल यांनी १९२० साली बॅनर्जी यांनी मोहेंजोदारोचा दिलेला पहिला अहवाल दाबून ठेवला. मार्शल यांनी बौद्धिक संपदा अधिकाराची उघड चोरी केली होती आणि १९२२ साली त्यांनी स्वतः ‘मोहेंजोदारो अँड इंडस सिव्हिलिझेशन’ हा अहवाल संपादित केला असे म्हटले आहे.’ मिश्रा यांनी नमूद केल्याप्रमाणे बॅनर्जी यांनी मोहेंजोदारो येथील पाच मोसमातील उत्खननात भाग घेतला होता. मार्शल यांनी या संस्कृतीचा शोध लावला हे शिकवले जाते, आणि बॅनर्जी मात्र तळटिपेपुरतेच मर्यादित राहिले आहेत.

अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?

आर. डी. बॅनर्जी. (फोटो सौजन्य: विकिपीडिया)

मार्शल यांना १९२४ पर्यन्त मोहेंजोदारोबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांनी प्रथम फेब्रुवारी महिन्यात १९२५ साली या स्थळाला भेट दिली आणि १९२५-२६ साली हिवाळ्यात उत्खननाची थेट जबाबदारी घेतली. तोपर्यंत बॅनर्जी यांनी महत्त्वाचे काम करून ठेवले होते. बॅनर्जींनी सुनीती कुमार चॅटर्जी (तत्कालीन अभ्यासक) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “हे पहा, ते (ब्रिटिश सरकार) मला मोहेंजोदारोवर काहीही प्रकाशित करू देणार नाहीत. पण तुम्ही काहीतरी लिहू शकता. माझ्याकडे असलेले सर्व साहित्य आणि सर्व छायाचित्रे मी तुमच्या हाती देत ​​आहे. तुम्ही त्यावर काहीतरी लिहा आणि मी दिलेले विश्लेषण प्रकाशित करा. भावी पिढीसाठी हे महत्त्वाचे ठरू शकते,” १९१७ साली १९ वर्षांच्या वयात एएसआयमध्ये रुजू झाल्यावर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी बॅनर्जींचे तेज ओळखले होते आणि त्यांना बढती देण्यात आली. परंतु मोहेंजोदारोच्या शोधाच्या अंतिम अहवालाने या सगळ्याचा रंगच बदलला आणि अखेर बॅनर्जी यांना या क्षेत्रातून बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला.

एकुणातच या प्रकरणात दोन परस्परविरोधी मतप्रवाह असल्याचे दिसते.