-सुशांत मोरे 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई ते नवी दिल्ली मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला १७ मे २०२२ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. प्रतिष्ठित अशा समजल्या जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये गेल्या काही वर्षांत बरेच बदल झाले. विद्युतीकरण पूर्ण होताच डिझेल इंजिनवर धावणाऱ्या राजधानीने नंतर वेग पकडला. येत्या दोन ते तीन वर्षांत मुंबई ते दिल्ली मार्गावर राजधानीचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. या मार्गावरील रुळ अद्ययावत करण्याबरोबरच अन्य कामे सध्या सुरू असून हे काम मार्च २०२४पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याचा फायदा राजधानी गाडीचा वेग वाढण्यासाठी होईल. 

पन्नाशीचा प्रवास कसा?

देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबई तसेच दिल्ली या शहरांना जोडणारा राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास १७ मे १९७२ साली सुरू झाला. त्यापूर्वी १९६९मध्ये हावडा ते दिल्ली मार्गावर पहिली राजधानी रेल्वे मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई ते दिल्ली शहरांना जोडणारी राजधानी सेवेत आली. त्यावेळी सात डब्यांसह ही गाडी धावली. चार चेअर कार, प्रथम श्रेणी वातानुकूलित डबा, दोन वातानुकूलित शयनयान डबे या गाडीला होते. आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीला प्रवाशांचा सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. वाढत्या प्रतिसादामुळे हळूहळू या गाडीच्या डब्यांत वाढ करण्यात आली. ऑक्टोबर १९८१मध्ये ही गाडी १८ डब्यांची करण्यात आली. त्याला दोन इंजिने जोडण्यात आली. डिझेल इंजिन जोडून सुरू केलेल्या प्रवासासाठी त्यावेळी १९ तास ५ मिनिटे लागत होती.

महुसालात कोट्यवधींची भर कशी ?

राजधानी गाडीतून प्रवास करणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जात होते. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद पाहता तिच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली. नोव्हेंबर १९८९ मध्ये आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावू लागली. वाढत्या प्रतिसादामुळे त्यातून मिळणाऱ्या महसुलातही वाढ होऊ लागली. 

त्यानंतर २ ऑक्टोबर २००० पासून राजधानी दररोज धावण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला राजधानी एक्स्प्रेसमधून दरवर्षी साडेचार कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. त्यानंतर वर्षाला जवळपास १०० कोटी रुपयांचे उत्पन्न या गाडीतून पश्चिम रेल्वेला मिळू लागले. मुंबई ते दिल्ली दरम्यान जुलै १९९१ मध्ये ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस गाडीही सुरू झाली.

राजधानीत परिवर्तन सुरू?

मुंबई ते दिल्ली मार्गावर धावणाऱ्या राजधानीत हळूहळू परिवर्तनही होत गेले. या गाडीच्या डब्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. वेगवान प्रवास आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता २००३नंतर या गाडीला लाल रंगाचे अपघातरोधक एलएचबी डबे जोडण्यात आले. हे डबे वजनाने हलके पण मजबूत, अधिक प्रशस्त आहेत. त्यानंतर राजधानीसाठी २०१७ मध्ये एचओजी (हेड ऑन जनरेशन) तंत्रज्ञान वापरण्यात आले. यात थेट ओव्हरहेड वायरमधून गाडीच्या उपकरणांसाठी विद्युत पुरवठा उपलब्ध होतो. त्यामुळे गाडीला विद्युत पुरवठ्यासाठी दोन अतिरिक्त जनरेटर घेऊन जाण्याची गरज लागत नाही. २०२१ मध्ये ‘तेजस’ रेकमध्ये तिचे परिवर्तन करण्यात आले. आता पुढच्या टप्प्यात तेजसच्या जागी ट्रेन सेट ‘वंदेभारत’चे अत्याधुनिक डबे जोडण्याचे नियोजन आहे.

राजधानीचा वेग वाढणार?

मुंबई ते दिल्ली मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने रुळांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ६ हजार ८०० कोटी रुपयांचा प्रकल्प असून रुळ अद्ययावत करण्याबरोबरच सिग्नल, ओव्हरहेड वायर, संरक्षक भिंत इत्यादी कामे करावी लागतील. यातील 

काही कामांना सुरुवातही झाली आहे. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होईल. सध्या राजधानी प्रतितास १२० ते १३० किलोमीटर वेगाने धावते. त्यामुळे या मार्गावर प्रवासासाठी १५ तास ३२ मिनिटे लागतात. रुळ अद्ययावत करण्याचे काम पूर्ण होताच राजधानीचा वेग मार्च २०२४ नंतर आणखी वाढेल. त्यावेळी प्रतितास १६० किलोमीटर वेगाने गाडी धावेल आणि बारा तासांत मुंबई ते दिल्लीदरम्यानचा प्रवास होईल. सध्या या मार्गावर राजधानी, शताब्दी, दुरान्तोसारख्या वेगवान गाडय़ा धावतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai new delhi rajdhani express celebrates 50 years print exp scsg