महिंद राजपक्षे यांचे ३८ वर्षीय सुपुत्र नमल राजपक्षे हे पुढील महिन्यात श्रीलंकेमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत. महिंद राजपक्षे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. ६ ऑगस्ट रोजी श्रीलंका पोडुजाना पेरामुना (SLPP) या पक्षाकडून नमल राजपक्षे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. २१ सप्टेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. २०२२ साली आर्थिक दिवाळखोरीमुळे श्रीलंका डबघाईला आला होता. महिंद राजपक्षे यांचे बंधू गोटाबाया राजपक्षे हे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना श्रीलंकेतून पलायन करावे लागले होते. त्या सर्व घटनाक्रमानंतर होणारी ही पहिलीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. महिंद राजपक्षे यांनी २००५ ते २०१५ या दरम्यान राष्ट्राध्यक्षपद भूषवले आहे. तसेच गोटाबाया राजपक्षे यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते देशाचे पंतप्रधान झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : बांगलादेश, श्रीलंका नि अफगाणिस्तान: अराजक असताना लोक ‘असे’ का वागतात?

नमल यांचा सामना विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्याशी होणार आहे. समगी जना बालवेगया (SJB) पक्षाचे सजिथ प्रेमदासा व जनता विमुक्ती पेरामुना (JVP)च्या नेत्या अनुरा कुमारा दिसनायके हेदेखील या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आर्थिक दिवाळखोरीनंतर श्रीलंकेची परिस्थिती अद्याप पूर्णपणे सुधारलेली नाही. तेव्हापासून आर्थिक राजकीय पातळीवरही श्रीलंका अस्थिरच आहे. अशा पार्श्वभूमीवर नमल यांच्या उमेदवारीकडे आशेने, तसेच साशंकतेनेही पाहिले जात आहे. काही श्रीलंकन नागरिकांना या नव्या तरुण चेहऱ्याकडून आशा वाटत आहे; तर काहींना राजपक्षे कुटुंबाच्या सत्ताकाळात भोगलेल्या आर्थिक चटक्यांमुळे ते उमेदवार म्हणून नकोसे वाटत आहेत.

ध्रुवीकरण करणाऱ्या राजकीय घराण्याचा वंशज

नमल हे सिंहली बौद्ध अशी ओळख असलेल्या राजकीय घराण्याचे सदस्य आहेत. नमल यांचा राजकीय प्रवास २०१० मध्ये सुरू झाला. तेव्हा ते श्रीलंकेच्या संसदेमध्ये पहिल्यांदा निवडून गेले. त्यांनी आपल्या वडिलांच्या मतदारसंघाचेच प्रतिनिधित्व केले होते. २००५ मध्ये राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी १६ वर्षे या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. ते सिंहली बौद्ध घराण्याचे राजकीय वंशज असले तरीही त्यांनी नेहमीच सांस्कृतिक अतिरेकापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. २०१८ साली दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नमल राजपक्षे यांनी म्हटले होते, “तुमच्या स्वत:च्या श्रद्धा आणि संस्कृती जपणे याला धर्मांधता म्हणत नाहीत. आपली संस्कृती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेणे खूप गरजेचे आहे.” नमल हे SLPP पक्षाचे राष्ट्रीय संघटक आहेत. त्यांनी स्वत:चा असा गट बांधण्यावर अधिक भर दिला आहे. पक्षाच्या दक्षिणेकडील बालेकिल्ल्यांच्या पलीकडे ते आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. तमीळबहुल उत्तर श्रीलंकेशी संबंध जोडण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

“सामंजस्यासाठी निश्चितच जास्त वेळ लागेल,” असे नमल यांनी म्हटले होते. त्याबरोबरच नव्या तरुण तमीळ नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणात सहभागी होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती. नमल यांचे वडील महिंद यांनी २००९ मध्ये लष्करी कारवाई करून लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलमला चिरडून श्रीलंकेमधील २५ वर्षांचे गृहयुद्ध संपवले होते. नमल यांना मिळालेला कौटुंबिक वारसा हा एखाद्या दुधारी तलवारीसारखा आहे. एकाच वेळेला हा वारसा एका मोठ्या ताकदवान कुटुंबाचा आहे; तर दुसऱ्या बाजूला तो त्रासदायक आठवणींनी भरलेलाही आहे. श्रीलंकेतील गृहयुद्ध संपवल्याबद्दल अनेक श्रीलंकन ​​लोक राजपक्षे यांची स्तुती करतात; दुसऱ्या बाजूला देशातील आर्थिक दिवाळखोरीला हेच कुटुंब जबाबदार असल्याची टीकाही त्यांच्यावर होते. या कुटुंबावर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा आरोपही होतो. तसेच, नमल राजपक्षे यांच्यावर घराणेशाहीचाही आरोप केला जातो.

वडिलांच्या पावलावर पाऊल

नमल यांनी तळागाळातील सामान्य नागरिकांबरोबर जोडून घेण्यावर विश्वास दर्शवला आहे. अशा संबंधांमुळेच त्यांचे वडील श्रीलंकेतील बहुसंख्य सिंहली बौद्धांमध्ये लोकप्रिय झाले होते. “राजकारणातील तुमचे अस्तित्व तुम्ही स्वत: कसे वागता, तुम्ही कसे काम करता व तुम्ही तुमच्या मतदारसंघातील लोकांसोबत कसा वेळ घालवता, यावर अवलंबून असते”, असे नमल यांनी म्हटले होते.

नमल राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकू शकतात का?

नमल यांच्याकडे भलामोठा राजकीय वारसा असला तरीही त्यांच्यासाठी ही निवडणूक तितकीशी सोपी नसणार आहे. त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. श्रीलंकेच्या सरकारवर आर्थिक अडचणी आणि कायदेशीर लढायांचा हवाला देऊन निवडणुका होऊ नयेत यासाठी विलंब करण्याचे डावपेच वापरल्याचा आरोप केला जात आहे. २०२० च्या निवडणुकीमध्ये गोटाबाया राजपक्षे हे राष्ट्रीय भावनेच्या लाटेवर स्वार होऊन सत्तेवर आले होते. मात्र, त्यांचा हाच सत्ताकाळ श्रीलंकेच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय ठरला. दैनंदिन जीवनातील खाद्यपदार्थ, इंधन, वीज, अत्यावश्यक औषधे अशा सर्वच गोष्टींचे भाव अक्षरश: गगनाला भिडले आणि देश आर्थिक दिवाळखोरीत गेला. या सगळ्याचे खापर अर्थातच सत्ताधारी राजपक्षे कुटुंबावर फोडण्यात आले. सध्या श्रीलंका हा देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेल्या मदतीच्या जोरावर स्थिर दिसत असला तरीही या देशावर भीषण आर्थिक परिस्थितीची छाया अद्यापही दाट आहे. श्रीलंकेतील मतदार देशाला या दिवाळखोरीतून बाहेर काढू शकणारा आणि लोकांचे जीवनमान सुसह्य करू शकणाऱ्या सक्षम नेत्याच्या शोधात आहेत. नमल यांचे प्रतिस्पर्धी असलेले विक्रमसिंघे, प्रेमदासा व दिसनायके या प्रत्येकाचा श्रीलंकेच्या भविष्याबाबतचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. मात्र, देशातील जनमत कुणाही एकाच्या बाजूने कललेले नाही.

हेही वाचा : बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू धोक्यात; भारतासमोर हिंदू निर्वासितांच्या आश्रयाचे संकट?

शेजारील राष्ट्रांतील तरुण नेते म्हणजेच राहुल गांधी, बिलावल भुट्टो झरदारी व शेख हसीना यांचा मुलगा साजिद वाझेद यांच्याबरोबरचे नमल यांचे संबंध चांगले आहेत, असे म्हटले जाते. इतकेच नव्हे, तर भारतातील बॉलीवूड स्टार सलमान खान याच्याबरोबरची मैत्री हीदेखील सामान्य श्रीलंकन नागरिकांसाठी मोठी गोष्ट आहे. श्रीलंकेतील राजकीय निरीक्षक असे मत व्यक्त करतात की, नमल यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवणे हा राजपक्षे कुटुंबाकडून खेळला गेलेला एक प्रकारचा जुगारच आहे. त्यांचा तरुण चेहरा पक्षाला फायदा मिळवून देऊ शकतो, अशी भावना त्यामागे आहे. मात्र, कुटुंबाची वादग्रस्त पार्श्वभूमी झाकोळून देशातील नागरिकांना नवी आशा देण्यात ते कितपत यशस्वी ठरतील, ते येणारा काळच ठरवेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namal rajapaksa mahinda rajapaksa son could be sri lanka next president vsh
Show comments