Netaji Subhas Chandra Bose भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. किंबहुना नेताजींमुळे भारताला १९४७ च्या आधीच स्वातंत्र्य मिळणार होते, असे आज अनेक इतिहासकार मानतात. असे असले तरी नेताजींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांपैकी एक घटना म्हणजे त्यांचा मृत्यू. मृत्यू सर्वांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची घटना असली तरी या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यात घडलेली ही घटना चमत्कारापेक्षाही कमी नाही. किंबहुना आज या घटनेला एवढी वर्षे लोटल्यानंतरही त्याबद्दल जागतिक स्तरावर चर्चा होत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेताजींच्या विमानाला झालेला अपघात

दुसऱ्या महायुद्धाचा शेवट नजीक आला होता. दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता आणि नाझी-फॅसिस्ट यांचा पराभव, याच पार्श्वभूमीवर नेताजींच्या आझाद हिंद फौजेला माघार घ्यावी लागली होती. आणि त्यातच एक बातमी जपानच्या ‘डोमेई’ या वृत्तसंस्थेने २३ ऑगस्टला प्रकाशित केली… हा हा म्हणता संपूर्ण जगात या बातमीने वेग घेतला. ही बातमी भारताचे लाडके स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाताची होती. १८ ऑगस्ट १९४५ रोजी तायहोकू विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला, त्याविषयीची ती बातमी होती. या अपघातात सापडलेल्या व्यक्तींच्या शरीराची ओळखही पटणार नाही, अशी वाईट अवस्था होती. त्यामुळे या अपघातात नेताजींचा खरंच मृत्यू झाला का? या विषयी पलीकडच्या बाजूस आजवर संभ्रम आहे. किंबहुना ज्या वेळी ही बातमी भारतात पोहोचली त्यावेळी खुद्द महात्मा गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही यावर विश्वास बसला नव्हता. म्हणूनच वेळोवेळी भारत सरकारने नेताजींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी वेगवेगळे आयोग आणि समित्या नेमल्या होत्या. यात शाह नवाज समिती, न्यायमूर्ती खोसला आयोग आणि न्यायमूर्ती मुखर्जी आयोग यांचा समावेश होतो. परंतु या चौकशांअंती एकतर अपघात झाला याचे पुरावे सादर करण्यात आले किंवा त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारणारे पुरावे सादर झाले. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अधिकच गूढ ठरला आहे.

तैवान मधील पुरावे काय सांगतात?

अपघाताबाबत तैवान पोलीस तपास अहवाल अस्तित्वात आहे, ज्यात स्पष्टपणे इंडियन नॅशनल आर्मीशी (INA) संबंधित कोणतेही पुरावे शोधले गेल्याचे नाकारण्यात आलेले आहे. या अहवालात “दुसर्‍या महायुद्धादरम्यान भारताचे राष्ट्रीय नेते बोस यांचा तैवानमध्ये मृत्यू झाल्याचे सिद्ध करण्यात अयशस्वी” किंवा “दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारताचे नेते बोस तैवानमध्ये मरण पावले हे प्रमाणित केले जाऊ शकत नाही.” असे स्पष्ट नमूद केले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे १९ जून १९५६ ते ३० ऑगस्ट १९५६ या काळात तैवान सरकारच्या आदेशानुसार करण्यात आलेला हा तपास आहे. त्याच वेळी नेताजींचे माजी सहकारी आणि तत्कालीन काँग्रेस खासदार शाह यांच्या अध्यक्षतेखालील भारत सरकारने या प्रकरणाची खोलवर तपासणी करण्यासाठी शाह नवाज समितीची नियुक्ती केली होती.

अधिक वाचा : विश्लेषण: प्राणी का ठरतात मानवी वासनेचे बळी? काय आहे झूफिलिया आणि बेस्टीयालीटी?

शाह नवाज समितीचा तपास

नवाज खान, यांनी १९५६ सालच्या एप्रिल ते जुलै या कालावधीत भारत, जपान, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये तपास आणि साक्षीदारांच्या मुलाखती घेतल्या; परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संदर्भात तैवानमध्ये कुठल्याही प्रकारचा तपास करण्यात आला नाही. “तैवान पोलिसांच्या चौकशी अहवालातील पृष्ठ क्रमांक ३ हे स्पष्टपणे नमूद करते की, भारतीय राष्ट्रीय लष्कराचे नेते सुभाष चंद्र बोस हे दुसऱ्या महायुद्धात तैवानमध्ये मरण पावले, हे सिद्ध करण्यात अधिकारी अयशस्वी ठरले आहेत,” विशेष म्हणजे १९७० साली नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती खोसला आयोग आणि २००५ साली नियुक्त झालेल्या न्यायमूर्ती मुखर्जी आयोग यांच्या चौकशी अहवालात कुठेही या भारतीय नेत्याचा ज्या भूमीत कथित मृत्यू झाला त्या संदर्भात वाच्यता करण्यात आलेली नाही.

तैवान अहवाल

तैचुंग येथील चिनी शिक्षकाने केलेल्या अनुवादानुसार, तैवान पोलीस तपास अहवालाच्या पृष्ठ क्रमांक ५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे “भारतीय राष्ट्रीय सैन्याचे नेते सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूची तारीख तीस ऑगस्टच्या मध्यरात्री अशी नोंदवली गेली आहे हे चीन प्रजासत्ताकचे चौथे वर्ष होते (म्हणजेच इसवी सन १९४५) त्या वेळेस हा प्रांत जपानच्या ताब्यात होता. अधिक तपासणीत तत्कालीन जपानी गव्हर्नर कार्यालयाच्या पोलीस विभागाच्या छापील फाईल्समधून बोस यांच्याविषयी कोणतेही दस्तऐवज सापडलेले नाहीत.” एका कॉम्रेडच्या म्हणण्यानुसार, जपानी पोलीस अधिकाऱ्यांनी गोपनीय आणि राजकीय फाइल्स सोपवण्यापूर्वी नष्ट केल्या होत्या. बोस यांच्या मृत्यूची कोणतीही फाईल सापडत नसेल तर त्या नष्ट झाल्या असाव्यात. सुभाष चंद्र बोस यांच्यावर तैपेई येथील जपानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. हा दिवस २२ ऑगस्ट १९४५ होता. त्यामुळेच नेताजींच्या मृत्यूमागील गूढता या द्वारे शोधणे सहज शक्य होते. स्मशानभूमीच्या नोंदीद्वारे हे सिद्ध करता येवू शकत होते. ज्या दिवशी नेताजींना स्मशानभूमीत दफन करण्यात आले ते स्थळ नंतर शिनशेंग नॉर्थ रोडजवळील लिनसेन पार्कच्या सध्याच्या सार्वजनिक जागेत बदलले गेले.

अधिक वाचा : विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?

तत्कालीन स्मशानाच्या रेकॉर्डनुसार, स्मशानभूमीत अंत्यसंस्कार किंवा दफन करण्यात आलेली एकमेव व्यक्ती इचिरो ओकुरा नावाची जपानी नागरिक होती ज्याचा अनुक्रमांक २६४१ होता. विशेष म्हणजे या स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात आलेली व्यक्ती “जपानी आर्मी पार्ट-टाइमर” होती. या व्यक्ती संदर्भात विविध तपशील उपलब्ध आहेत. या व्यक्तीचा जन्म ९ एप्रिल १९०० मध्ये झाला आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मयत व्यक्ती जपानच्या “२-१, डोगेन्झाका, टोकियोमधील शिबुया-कू’’ या पत्त्यावर राहणारी होती आणि तिचा मृत्यू १९ ऑगस्ट १९४५ रोजी झाला होता. याखेरीज तैवानमधून गोळा केलेल्या तत्कालीन स्मशानभूमीच्या तसेच मयत लोकांच्या नोंदीमध्ये नेताजींच्या अंत्यसंस्काराच्या उल्लेख नाही. किंबहुना जपानी लोकांनी तैवान हस्तांतरित करत असताना स्मशानभूमीचे रेकॉर्ड नष्ट केले असे मानले जात होते, परंतु तशा स्वरूपाचे काहीही घडले नसल्याचे ऐतिहासिक तथ्य समोर आले आहे.

तैवानची भूमिका

जर अपघात झाला या सिद्धांतावर विश्वास ठेवला तर, तैवान हे नेताजींच्या शेवटच्या दिवसांचे केंद्रबिंदू आहे. तैवान हे नेहमीच आंतराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे ठरले आहे. जपान आणि तैवान, चीन आणि तैवान अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून जाताना तैवानचे जटिल भू-राजकीय अस्तित्व आणि त्याचे सामर्थ्य-संतुलन यामुळे चीनचे प्रजासत्ताक ते चायनीज तैपेई (युनायटेड नेशन्स आणि अनेक आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या “एक चीन धोरणानुसार”) ते तैवानचे स्वतंत्र सीमाशुल्क क्षेत्र, पेंगू, किनमेन आणि मात्सू (जागतिक व्यापार संघटनेनुसार) अशा अनेक स्थित्यंतरातून गेले आहे. त्यामुळेच या राजकीय गोंधळात नेताजींच्या त्या भूमीवर झालेल्या मृत्यूशी संबंधित सत्य आणि पुरावे गमावले आहेत. असे असले तरी तैवान सरकारने आधीच स्पष्टपणे सांगितले आहे की तैवानला भेट देण्यासाठी भारतीय संशोधकांचे ते स्वागत करतील आणि त्यांच्या अभिलेखागाराची दारे खोलवर परीक्षणासाठी नेहमीच खुली असतील. प्रत्यक्षात असे झाल्यास भारतीय स्वातंत्र्य इतिहासातील एक अद्वितीय योद्धा कसा नाहीसा झाला हे समजण्यास नक्कीच मदत होणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netaji subhas chandra bose died in taiwan on 18 august 1945 svs
Show comments