दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नोबेल पारितोषिकांची घोषणा केली जाते. जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या तीन विज्ञान शाखांमध्ये अतुलनीय कामगिरीसाठी दिला जातो. या विषयात भारताला नोबेल पारितोषिक मिळवून ९४ वर्षे झाली आहेत. १९३० साली डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रामण यांना भौतिकशास्त्रातील त्यांच्या विशेष कार्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले होते. भारतीय वंशाच्या आणखी तीन शास्त्रज्ञांनी नोबेल पारितोषिक जिंकले आहेत. १९६८ साली हरगोविंद खोराना यांना वैद्यकशास्त्रात, १९८३ साली सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रात आणि २००९ साली वेंकटरामन रामकृष्णन यांना रसायनशास्त्रातील त्यांच्या कामगिरीसाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. असे असले तरी तिघांनीही त्यांचे कार्य भारताबाहेर केले आणि त्यांना सन्मानित करण्यात आले, तेव्हा ते भारतीय नागरिक नव्हते. इतक्या वर्षांत भारताला एकही नोबेल पदक न मिळण्याचे कारण काय? त्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.

नोबेल पारितोषिक न मिळण्यासाठी कारणीभूत घटक कोणते?

मूलभूत संशोधनावर अपुरे लक्ष, सार्वजनिक निधीची कमतरता, नोकरशाही, खाजगी संशोधनासाठी प्रोत्साहन न मिळणे, संधींचा अभाव आणि विद्यापीठांमधील संशोधन क्षमतांचा ऱ्हास, ही प्रमुख कारणे नमूद केली जातात. भारतातील काही संस्था अत्याधुनिक संशोधनात गुंतलेल्या आहेत आणि लोकसंख्येच्या तुलनेत विचार केल्यास संशोधकांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा पाचपट कमी आहे.

भारताला नोबेल पारितोषिक मिळवून ९४ वर्षे झाली आहेत. १९३० साली सी.व्ही. रामण यांना भौतिकशास्त्रातील त्यांच्या विशेष कार्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : Massive Door In Antartica: अंटार्क्टिकामध्ये सापडलेल्या रहस्यमयी दरवाजामागील सत्य काय?

भारताला नामांकन, पण पदक नाही

भारतातून विज्ञान क्षेत्रातील अनेक शास्त्रज्ञांना नामांकन मिळाले आहे, तर काहींना विज्ञान क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करूनही नामांकन मिळालेले नाही. दरवर्षी, निवड गटाद्वारे संभाव्य उमेदवारांना नामनिर्देशित करण्यासाठी आमंत्रित केले जाते. या निवड गटात विद्यापीठाचे प्राध्यापक, शास्त्रज्ञ, भूतकाळातील नोबेल पारितोषिक विजेते आणि इतरांचा समावेश असतो. निवड गटातील तज्ज्ञांच्या दृष्टीने नामांकित शास्त्रज्ञाने नोबेलपात्र कार्य केले असावे, असे अपेक्षित असते. नामनिर्देशित उमेदवारांची नावे किमान ५० वर्षे तरी जाहीर केली जात नाहीत आणि हा डेटादेखील वेळोवेळी अपडेट केला जातो. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या पुरस्कारांसाठीची १९७० पर्यंतची नामांकने उपलब्ध आहेत, तर वैद्यकशास्त्रासाठीची १९५३ पर्यंतची नामांकने उघड झाली आहेत.

नामांकन यादी सार्वजनिक करण्यात आलेल्या ३५ भारतीयांमध्ये सहा वैज्ञानिकांचा समावेश आहे. मेघनाद साहा, होमी भाभा आणि सत्येंद्र नाथ बोस यांना भौतिकशास्त्रासाठी तर जी. एन. रामचंद्रन आणि टी. शेषाद्री यांना रसायनशास्त्रासाठी नामांकन मिळाले आहे. मेडिसिन किंवा फिजिओलॉजीसाठी एकमेव भारतीय नामांकनात उपेंद्रनाथ ब्रह्मचारी यांचे नाव आहे. सर्व सहा जणांना वेगवेगळ्या नामांकनकर्त्यांनी अनेक वेळा नामांकन दिले होते. त्या काळात भारतात राहणारे आणि काम करणारे काही ब्रिटीश शास्त्रज्ञही नामांकन यादीत आहेत.

नोबेल पदकाबाबत हाती निराशाच

१८९५ मध्ये वायरलेस कम्युनिकेशनचे प्रात्यक्षिक करणारे जगदीशचंद्र बोस हे पहिले व्यक्ती आहेत. मात्र, त्याच कार्यासाठी १९०९ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक गुग्लिएल्मो मार्कोनी आणि फर्डिनांड ब्रॉन यांना देण्यात आले होते. बोस यांनी वनस्पती शरीरविज्ञानामध्येदेखील प्रचंड प्रभावशाली कार्य केले, मात्र त्यांना कधीही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले नव्हते.

के. एस. कृष्णनदेखील एक प्रतिभाशाली शास्त्रज्ञ होते; ज्यांना कधीही नामांकन मिळाले नाही. डॉ. सी. व्ही. रामण यांचे जवळचे सहकारी कृष्णन हे रामण स्कॅटरिंग इफेक्टचे सह-शोधक म्हणूनही ओळखले जातात, ज्यासाठी एकट्या सी. व्ही. रामण यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. १९७० नंतरचे नामांकन अद्याप उघड झालेले नसले तरी या पुरस्कारासाठी किमान एका भारतीय शास्त्रज्ञाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. सॉलिड स्टेट केमिस्ट्रीमध्ये सीएनआर राव यांचे कार्य दीर्घकाळापासून नोबेलसाठी पात्र मानले जाते, परंतु आतापर्यंत त्यांना हा सन्मान मिळाला नाही.

एका भारतीय शास्त्रज्ञाला या पुरस्कारासाठी दोनदा वगळण्यात आले होते. ते होते एन्नाकल चांडी जॉर्ज सुदर्शन (ईसीजी सुदर्शन). १९७९ आणि २००५ मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिके त्यांना जाहीर करण्यात आली होती, कारण भौतिकशास्त्रातील त्यांचे कार्य अतुलनीय होते. परंतु, १९६५ मध्ये ईसीजी सुदर्शन अमेरिकन नागरिक झाले होते आणि त्यांचे बहुतेक काम अमेरिकेत पूर्ण झाले होते. २०१८ साली त्यांचे निधन झाले.

विज्ञानाच्या नोबेलमधील पाश्चात्य वर्चस्व

चीन किंवा इस्रायलसारख्या वैज्ञानिक संशोधनासाठी संसाधनांचे जास्त वाटप होत असलेल्या देशांमध्ये विज्ञानातील नोबेल पारितोषिकांची संख्या आश्चर्यकारकपणे कमी आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकलेल्या ६५३ लोकांपैकी १५० हून लोक अधिक ज्यू समुदायाचे आहेत, हे प्रमाण आश्चर्यकारकपणे मोठे आहे. पण, ज्यूंची मातृभूमी मानल्या जाणाऱ्या इस्रायलला विज्ञानात केवळ चार नोबेल पारितोषिके मिळाली आहेत आणि ती सर्व रसायनशास्त्रासाठी मिळाली आहेत. त्याचप्रमाणे, चीनमध्ये भारताच्या तुलनेत प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे चार पट जास्त संशोधक आहेत. त्यांचा जीडीपीचा वाटा म्हणून संशोधन आणि विकासावरील खर्च भारतापेक्षा किमान तीन पट जास्त आहे आणि त्यांची अनेक विद्यापीठे जागतिक टॉप ५० मध्ये आहेत. मात्र, त्यांना विज्ञानात आतापर्यंत फक्त तीन नोबेल पारितोषिके मिळाली आहेत. संशोधन क्षेत्रात दक्षिण कोरियादेखील पुढे आहे, मात्र त्यांना आजवर एकही पारितोषिक मिळालेले नाही.

विज्ञानाच्या नोबेल परितोषिकावर अमेरिका आणि युरोपमधील शास्त्रज्ञांचे प्रचंड वर्चस्व राहिले आहे, त्यापैकी बरेच जण चांगल्या वैज्ञानिक पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाच्या शोधात इतर देशांतून आले होते. भौतिकशास्त्र पारितोषिकाच्या २२७ विजेत्यांपैकी केवळ १३, रसायनशास्त्र पारितोषिकाच्या १९७ विजेत्यांपैकी १५ आणि वैद्यकशास्त्र पारितोषिकाच्या २२९ विजेत्यांपैकी सात आशिया, आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिकेतून आले आहेत. खरेतर उत्तर अमेरिका आणि युरोपच्या बाहेर केवळ नऊ देश आहेत; ज्यांच्या संशोधकांना विज्ञानात नोबेल पारितोषिक मिळाले आहे.

हेही वाचा : Diphtheria: देशात ‘घटसर्प’ आजाराच्या प्रकरणांमध्ये वाढ; हा आजार काय आहे? याची लक्षणे अन् उपाय काय?

नोबेल पारितोषिक वितरणाच्या बाबतीत प्रादेशिक किंवा वांशिक पूर्वग्रहाच्या तक्रारी येत असल्या तरी अमेरिका किंवा युरोपमधील संशोधनाचे कार्य अतुलनीय राहिले आहे, हेदेखील तितकेच खरे आहे. स्वच्छ ऊर्जा, क्वांटम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या नवीन तंत्रज्ञानातील संशोधनावर विशेषत: लक्ष केंद्रित करणार्‍या, संशोधनासाठी योग्य वातावरण तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्या चीनलाही पुढे पारितोषिके मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत वैज्ञानिक क्षमता निर्माण करण्यात किंवा संशोधनासाठी संसाधने वाटप करण्यात चीन, दक्षिण कोरिया किंवा इस्रायलसारख्या देशांपेक्षा मागे आहे. त्यामुळे भारताला विज्ञानातील नोबेल पारितोषिके मिळण्याची शक्यता शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक प्रतिभेवर अवलंबून आहे.