भारताने २०३६ सालच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची तयारी यापूर्वीच दाखवली आहे. आता यजमानपदासाठी तब्बल १० देश शर्यतीत असताना भारताने ऑलिम्पिकचा देशभर प्रसार व्हावा यासाठी निविदा सादर करताना विविध शहरांत स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे. आधी केवळ अहमदाबाद शहराचे नाव पुढे आले होते. या सगळ्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑलिम्पिकचे नियोजन नेमके कसे?

भारताने २०३६ ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाची तयारी दाखवली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत सरकारने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) तसे कळवले आहे. आता जे काही नियोजन आहे ते अंतिम नाही. चर्चा करून आणि एक ठोस योजना बनवून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला ती कळवली जाणार आहे. यामध्ये गुजरातमधील अहमदाबाद हे स्पर्धेचे मुख्य केंद्र राहील. ऑलिम्पिक स्पर्धा ही देशपातळीवरील एक चळवळ व्हावी यासाठी विविध शहरांतही काही खेळांच्या स्पर्धा घेण्याची कल्पना केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

हेही वाचा >>>डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?

अहमदाबादच मुख्य केंद्र का?

अहमदाबादमध्ये तब्बल सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने योग्य, मनोरंजनासाठी जनतेची सेवा करणे आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर झळकण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ऑलिम्पिकचे यजमानपद मिळविण्यात भारत यशस्वी ठरला नाही, तरी ही कामे सुरूच राहणार आहेत.

अहमदाबादसह कोणती शहरे?

ऑलिम्पिकसाठी अहमदाबाद हे मुख्य शहर असून तेथे नारनपूरा क्रीडा संकुल हे एक केंद्र असेल. तब्बल २०.३९ एकर जागेत हे संकुल उभे राहिले असून, साधारण ६३१.७७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मार्च महिन्यात हे संकुल पूर्ण होईल. सध्या तेथे एक हजार कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. यामध्ये ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल आणि बॅडमिंटन कोर्ट, जिम्नॅस्टिक, कबड्डी, कुस्ती, तायक्वांदो आणि टेबल टेनिस या खेळांच्या सुविधा आहेत. त्याच बरोबर मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमला लागून असलेल्या ३५५ एकर जागेत सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल आणि १४३ एकर जागेत वसलेले कराई स्पोर्ट्स हब या दोन केंद्रांचाही ऑलिम्पिकसाठी विचार होऊ शकतो. याखेरीज हॉकीसाठी भुवनेश्वर, रोईंगसाठी भोपाळ, कॅनॉइंग-कयाकिंगसाठी पुणे आणि क्रिकेटसाठी मुंबई ही शहरे सरकारच्या नजरेसमोर आहेत.

भारतासमोर कोणती आव्हाने?

ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताकडे अनेक महत्त्वाकांक्षी योजना असल्या तरी त्यांच्यासमोर आव्हानेही खूप आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेमधील (आयओए) प्रशासकीय वाद अजून संपलेला नाही. अध्यक्ष पी. टी. उषा आणि कार्यकारी समितीमधून विस्तवही जात नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या आघाडीवर प्रगतीचा अभाव असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आधी ही अंतर्गत समस्या सोडवावी लागेल. तसेच २०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी तब्बल १० देशांनी तयारी दाखवली आहे. यातही कतार आणि सौदी अरेबिया या दोन देशांचे आव्हान अधिक कठीण आहे. आतापर्यंत या दोन्ही देशांनी आपली आर्थिक ताकद पणाला लावून ‘फिफा’ विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांचे यजमानपद मिळवले आहे. ऑलिम्पिक २०३६च्या यजमानपदाचा निर्णय २०२६ मध्ये घेतला जाऊ शकतो.

हेही वाचा >>>पाकिस्तानसाठी वेगळी… चीनसाठी वेगळी…‘थिएटर कमांड’च्या माध्यमातून नवीन वर्षात भारतीय सैन्यदलांची नवी व्यूहरचना?

नजीकच्या काळात भारतात किती स्पर्धा?

भारताला मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाचा अनुभव नाही असे नाही. मात्र, आता ऑलिम्पिक घेण्याचा मनोदय व्यक्त केल्यावर या पुढे भारतात होणाऱ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनावर बारीक लक्ष राहणार आहे. यामध्ये २०२८ मध्ये भारताने २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स आणि आशियाई जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याच बरोबर २०३० युवा ऑलिम्पिक आणि जागतिक पोलीस, तसेच लष्करी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठीही भारत उत्सुक आहे. या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाल्यास त्या भारताच्या क्षमतेची चाचणी ठरू शकतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympics to visit india how is the 2036 games being planned why are more than one city preferredprint exp amy