‘शर्मा’ या खोट्या नावाने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी कुटुंबाला रविवारी कर्नाटकची राजधानी बंगळुरूत अटक करण्यात आली. रशीद अली सिद्दीकी, त्याची पत्नी आयशा आणि तिचे आई-वडील हनिफ मोहम्मद व रुबिना, अशा चार पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली. २०१४ पासून हे कुटुंब भारतात बेकायदा राहत आहे. हे चौघेही शंकर शर्मा, आशा राणी, राम बाबू शर्मा व राणी शर्मा या नावांनी राजापुरा या गावात राहत होते. त्यांच्याकडून बनावट पासपोर्ट आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. सिद्दीकी हा ऑनलाइन फूड आउटलेट चालवीत होता आणि गॅरेजला इंजिन ऑइलचा पुरवठाही करीत होता. चौघांनी पोलिसांना सांगितले की, ते मेहदी फाऊंडेशन इंटरनॅशनल (एमएफआय)शी जोडलेले आहेत. त्यांचा छळ झाल्यामुळे ते भारतात आल्याचे त्यांनी सांगितले. एमएफआय म्हणजे काय? पाकिस्तानमध्ये मुस्लीम कुटुंबाला धार्मिक छळ का सहन करावा लागत आहे? मुस्लीम असूनही शेजारी देश सोडण्याचं कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

मेहदी फाउंडेशन इंटरनॅशनल म्हणजे काय?

मेहदी फाऊंडेशन याला मसीहा फाउंडेशन म्हणूनही ओळखले जाते. १९७० साली या फाउंडेशनची सुरुवात झाली. या फाउंडेशनचे नाव रियाझ गोहर शाही इंटरनॅशनल, असे होते. त्याचे संस्थापक रियाझ अहमद गौहार शाही होते. एक आध्यात्मिक नेते म्हणून पाकिस्तानात त्यांची ओळख होती. त्यांच्याच नावाने सुरुवातीला फाउंडेशनला हे नाव देण्यात आले होते. २००२ साली त्याला औपचारिकपणे मेहदी फाउंडेशन इंटरनॅशनल, असे नाव देण्यात आले. ही संस्था आंतरधर्मीय शांतता, सौहार्द, मानवता आणि सुफी परंपरांचा उपदेश देते. ‘एमएफआय’चा दावा आहे की, आज अनेक आशियाई देशांसह युरोप आणि अमेरिकेमध्ये एमएफआय सदस्यांची उपस्थिती आहे. मात्र, इस्लामी धर्मगुरूंना पाकिस्तानातील याची लोकप्रियता मान्य नाही.

हेही वाचा : व्हेलमाशाची उलटी कशी ओळखतात? बाजारात कोट्यावधीत विकल्या जाणार्‍या उलटीचा कशासाठी वापर केला जातो?

पाकिस्तानमध्ये ‘एमएफआय’ला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला आहे?

‘एमएफआय’चे अध्यक्ष आणि युनायटेड किंगडममध्ये आश्रय घेतलेले पाकिस्तानी नागरिक अमजद गोहर यांच्या मते, परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर एमएफआय सदस्यांविरुद्ध शेकडो दोषारोपाचे खटले दाखल करण्यात आले आणि अनेकांना ठार करण्यात आले. “पाकिस्तानमधील इस्लामिक धर्मगुरू आमच्या संघटनेच्या कल्पनेवर नाखूश होते. देवाच्या (अल्लाह) नजरेत सर्व समान आहेत, असे आम्ही मानतो; पण मौलवी आमच्या विरोधात होते. आम्ही इस्लामबद्दल कोणताही प्रश्न उपस्थित केला की, तो पाकिस्तानमध्ये गुन्हा म्हणून पाहिला जात असे,” असे अमजद गोहर यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

गोहर शाहीसह ‘एमएफआय’च्या सदस्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने गोहर शाही यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर बंदी घातली आणि दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत ‘एमएफआय’ला अवैध संघटना म्हणून घोषित केले. अमजद यांनी सांगितले की, त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये डझनहून अधिक खटले आहेत आणि ते कधीही पाकिस्तानात परतणार नाहीत. मेहदी फाऊंडेशनच्या काही नेत्यांना काही प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना ९९ वर्षांचा तुरुंगवास आणि मृत्युदंडाची शिक्षाही झाली आहे.

धर्माचे चुकीचे दावे व रूढीवादी इस्लामिक शिकवणींच्या विरोधात असलेल्या समजुतींना प्रोत्साहन देणे, यांसारखे आरोप गोहर शाही आणि मेहदी फाऊंडेशन यांच्यावर लावण्यात आले आहेत. धार्मिक अधिकाऱ्यांनी संघटनेवर मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा आणि इस्लामिक तत्त्वांचा अनादर केल्याचाही आरोप केला आहे. या आरोपांमुळे गोहर शाही यांना काफिर (धर्मविरोधी) घोषित करणारे फतवे (धार्मिक आदेश) निघाले आहेत आणि त्यामुळे अनुयायांचे जीवन आणखी धोक्यात आले आहे. २००० च्या दशकाच्या मध्यात ‘एमएफआय’च्या पाच सदस्यांची अल्लाबाबत / ईश्वराबाबत निंदात्मक टीका केल्याच्या आरोपावरून धिंड काढण्यात आली आणि त्यांना मारहाण करण्यात आली होती.

२००८ मध्ये एमएफआय सदस्य मोहम्मद इक्बाल यांची पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हत्या करण्यात आली होती. २००९ मध्ये पारस मसीह या एमएफआय सदस्याची कराचीत हत्या झाली. आज एमएफआय पाकिस्तानमध्ये कार्यरत नाही आणि एमएफआयशी संबंधित कोणतीही माहिती प्रसारित करणे हा गुन्हा मानला जातो. सरकारने एमएफआयच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही बंदी घातली आहे.

यापूर्वी भारताचा एमएफआय सदस्यांशी संबंध आला आहे का?

अनेक एमएफआय सदस्य बांगलादेश आणि भारतात गेले आहेत. २००७ मध्ये तब्बल ६३ पाकिस्तानी एमएफआय सदस्यांनी भारतात पर्यटन व्हिसा मिळवला आणि नवी दिल्लीत पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावासासमोर आंदोलन केले. त्यांनी त्यांचे पाकिस्तानी पासपोर्ट आणि व्हिसा जाळले. बेकायदा भारतात राहिल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर भारत सरकारने २०११ मध्ये त्यांना निर्वासित दर्जा दिला आणि त्यांना कॅनडा, अमेरिका आणि युरोपमधील देशांमध्ये पाठविले.

हेही वाचा : महिलेने जुळ्या मुलांना दिला दोन गर्भाशयांतून जन्म; जगभरात या दुर्मीळ प्रकरणाची चर्चा का होतेय?

एमएफआयने सध्याच्या अटकेवर काय प्रतिक्रिया दिली?

एमएफआयने म्हटले आहे की, ते कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या त्यांच्या सदस्यांना समर्थन देत नाहीत, मात्र ते पाकिस्तानमधील परिस्थितीमुळे हताश आहेत. “मला अटक झाल्याची माहिती मिळाली आहे आणि आम्ही कायदा मोडणाऱ्यांना समर्थन देत नाही. परंतु हे समजून घेतले पाहिजे की, या सदस्यांनी पाकिस्तानातून तेव्हाच पळ काढला जेव्हा त्यांच्यासाठी तिथे जगणे फार कठीण झाले. मी भारत सरकारला विनंती करीन की, त्यांना पाकिस्तानात पाठवू नका. कारण- ते मारले जातील. त्यांना भारतात राहण्याची परवानगी दिली पाहिजे किंवा त्यांची राहण्याची अन्य देशात व्यवस्था होईपर्यंत त्यांना मदत दिली गेली पाहिजे,” असे अमजद म्हणाला. “आम्ही जो उपदेश करतो, तो भारताच्या कल्पनेशी मिळताजुळता आहे. कारण भारतही सर्व धर्मांना स्वीकारतो आणि त्यांचा आदर करतो,” असे ते पुढे म्हणाले.