पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२६ सप्टेंबर) तीन स्वदेशी विकसित परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्सचे अनावरण केले. भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे. काय आहेत परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स? या कॉम्प्युटर्सचे वैशिष्ट्य काय? भारतासाठी या कॉम्प्युटर्सचे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.

परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स

परम रुद्र ही एक उच्च-कार्यक्षमता संगणकीय प्रणाली आहे. हे सुपर कॉम्प्युटर्स नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) द्वारे स्वदेशी पद्धतीने विकसित केले गेले आहेत. भारताला स्वावलंबी करण्याकरिता केंद्राच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुपर कॉम्प्युटर्स राष्ट्राला समर्पित करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण कार्यक्रमादरम्यान सांगितले. १३० रुपये खर्चून तयार करण्यात आलेले हे तीन सुपर कॉम्प्युटर पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे वैज्ञानिक संशोधनासाठी सोपविण्यात आले आहेत.

हेही वाचा : चाइल्ड पोर्नोग्राफीच्या विरोधात सुप्रीम कोर्टानं कायदा कसा मजबूत केला?

परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्सची वैशिष्ट्ये

परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स विविध क्षेत्रांमधील संशोधनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. पुण्यातील जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी), फास्ट रेडिओ बर्स्ट (एफआरबी) आणि इतर खगोलशास्त्रीय अन्वेषण करण्यासाठी सुपर कॉम्प्युटर्सचा वापर करण्यात येणार आहे. या सुपर कॉम्प्युटर्समध्ये अनेक हजार इंटेल सीपीयू, ९० अत्याधुनिक ‘निव्हिडिया ए १००’ जीपीयू, ३५ टेराबाइट्स मेमरी आणि दोन पेटाबाइट्स स्टोरेज प्रणाली आहे. ही प्रगत प्रणाली खगोलशास्त्रातील वैज्ञानिक अभ्यासाला नवीन उंचीवर नेईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. दिल्लीतील इंटर युनिव्हर्सिटी एक्सीलरेटर सेंटर (आययूएसी) मधील सुपर कॉम्प्युटर अणु भौतिकशास्त्र आणि भौतिक विज्ञान यांसारख्या संशोधनाला चालना देईल.

कोलकाता येथील एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस भौतिकशास्त्र, विश्वविज्ञान आणि पृथ्वी विज्ञानातील प्रगत अभ्यासांसाठी परम रुद्र कॉम्प्युटरचा लाभ घेतील. ‘इंडियन एक्स्प्रेस’नुसार, येथे स्थापित केलेल्या सुपर कॉम्प्युटरची क्षमता ८३८ टेराफ्लॉप आहे. त्या शिवाय कॉम्प्युटर्समधील विकसित प्रणाली विज्ञानाच्या क्षेत्राबाहेरील म्हणेजेच अंतराळ संशोधन, आपत्ती निवारण आणि शेतीसह असंख्य उद्योगांसाठी फायदेशीर ठरू शकतात. उदाहरणार्थ, चांगल्या हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतो.

तांत्रिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल

देशांतर्गत हे सुपर कॉम्प्युटर्स तयार करून भारत तांत्रिक स्वावलंबनाकडे मोठी प्रगती करत आहे. हे सुपर कॉम्प्युटर्स तांत्रिक नवकल्पना आणि विज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्याच्या राष्ट्राच्या व्यापक उद्दिष्टांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आहेत. “परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स आणि एचपीसी प्रणालीसह भारत संगणकीय, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवकल्पना विकसित करण्यासाठी स्वावलंबी होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. आजचा दिवस विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील खूप मोठ्या कामगिरीचा दिवस आहे,” असे पंतप्रधान मोदी अनावरणादरम्यान म्हणाले.

“असे कोणतेही क्षेत्र नाही जे तंत्रज्ञान आणि संगणकीय क्षमतेवर अवलंबून नाही,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “या क्रांतीमध्ये आपला वाटा बिट आणि बाइट्समध्ये नसून टेराबाइट्स आणि पेटाबाइट्समध्ये असावा, त्यामुळे आपण योग्य दिशेने योग्य गतीने वाटचाल करत आहोत, हे या यशामुळे सिद्ध होत आहे,” असेही ते म्हणाले. हे सुपर कॉम्प्युटर्स तरुण शास्त्रज्ञांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सक्षम करतील; ज्यामुळे नवनवीन शोध आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार केलेल्या ८५० कोटी रुपयांच्या उच्च-कार्यक्षमता संगणकीय प्रणालीचेदेखील उद्घाटन केले. (छायाचित्र-पीटीआय)

हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग (एचपीसी) प्रणाली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार केलेल्या ८५० कोटी रुपयांच्या उच्च-कार्यक्षमता संगणकीय प्रणालीचेदेखील उद्घाटन केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ही खूप मोठी उपलब्धी असल्याचेही त्यांनी सांगितले. हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग (एचपीसी) प्रणाली हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार करण्यात आली आहे आणि हा प्रकल्प ८५० कोटींची गुंतवणूक करून तयार करण्यात आला आहे. या प्रगत प्रणालीमुळे हवामानविषयक अनुप्रयोगांसाठी भारताच्या संगणकीय क्षमतांमध्ये वाढ झाली आहे.

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (आयआयटीएम) आणि नोएडामधील नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट (NCMRWF) या दोन महत्त्वाच्या ठिकाणी एचपीसी प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. नवीन एचपीसी प्रणालींना ‘अर्का’ आणि ‘अरुणिका’ असे नाव देण्यात आले आहे. ही दोन नावे त्यांचे सूर्याशी असलेले संबंध प्रतिबिंबित करतात. ही उच्च-रिझोल्यूशन प्रणाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, अतिवृष्टी, गडगडाटी वादळे, गारपीट, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि हवामानातील इतर गंभीर घटनांशी संबंधित अंदाजांची अचूकता लक्षणीयरीत्या वाढवतील.

नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन नक्की काय आहे?

नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन (एनएसएम) २०१५ मध्ये सुरू करण्यात आले होते. राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन आणि विकास संस्थांना संगणकीय सुविधांशी जोडणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि आय मंत्रालयद्वारे संयुक्तपणे व्यवस्थापित केले जाते. बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि पुण्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्याकडे त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे.

हेही वाचा : ‘त्या’ ४३ विद्यार्थ्यांसाठी मेक्सिको का पेटलंय? २०१४ मध्ये बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर नक्की काय घडलं?

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात या मोहिमेची प्राथमिक उद्दिष्टे देण्यात आली आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या दोन्ही मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी देशाची क्षमता मजबूत करणे, शास्त्रज्ञ आणि संशोधकांना अत्याधुनिक संगणकीय संसाधने प्रदान करणे; जेणेकरून ते त्यांच्या संबंधित क्षेत्रात नाविन्यपूर्ण अभ्यास करू शकतील. भारताला सुपर कॉम्प्युटिंग पॉवरहाऊस होण्यास मदत करणे, जागतिक स्तरावर नेणे आणि ‘एचपीसी’मध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी चालना देणे आदी उद्दिष्टांचा यात समावेश आहे. या मोहिमेला तीन टप्प्यांत विभागले गेले आहे. पहिला टप्पा सुपर कॉम्प्युटर असेंब्लीवर केंद्रित आहे. दुसरा टप्पा विशिष्ट घटकांच्या देशांतर्गत उत्पादनाचे परीक्षण करण्यावर केंद्रित आहे आणि तिसरा टप्पा भारताद्वारे सुपर कॉम्प्युटर्सची रचना करण्यावर केंद्रित आहे.