राज्यातील पथकर (टोल) नाके आणि पथकर वसुली हा विषय मागील काही वर्षांपासून संवेदनशील विषय बनला आहे. कंत्राटदाराच्या हितासाठी पथकर नाके उभारत वसुली केली जात असल्याचा आरोप होत असतो. तर पथकर वसुली केली जाते, पण त्या तुलनेत रस्त्यांचा दर्जा वा रस्त्यांवर आवश्यक त्या सुविधा नसल्याचाही आरोप होतो. राज्यातील सर्वच्या सर्व पथकर नाके बंदच करावेत अशीही मागणी काही राजकीय पक्षांसह नागरिकांकडून होत असते. मात्र तशी कोणतीही शक्यता नाही. आता मुंबईतील पाच पथकर नाक्यांवरून ये-जा करणाऱ्या हलक्या वाहनांना पथकरमाफी मिळाली आहे. यासंबंधीचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला आहे. तेव्हा हा निर्णय नेमका काय आहे, याचा हा आढावा…

पथकर म्हणजे काय? तो का आकारतात?

रस्ते, उड्डाणपूल, महामार्ग, द्रुतगती महामार्ग, सागरी महामार्ग अशा वाहतूक सुविधा विविध सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून बांधण्यात येतात. या कामासाठी लागणारा खर्च तसेच रस्त्यांचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च वसूल करणे आवश्यक असते. हा खर्च वसूल करण्यासाठी वाहनचालकांकडून निश्चित अशी रक्कम वसूल केली जाते. ही रक्कम म्हणजेच टोल अर्थात पथकर. वसुली कधी थेट सरकारकडून होते किंवा काही वेळा त्यासाठी स्वतंत्र कंपन्या मुक्रर केल्या जातात. हा पथकर वसूल करण्यासाठी त्या-त्या रस्त्यांवर काही ठराविक अंतरावर पथकर नाके असतात. या पथकर नाक्याच्या माध्यमातून पथकर वसुली केली जाते. मुंबईसह राज्यभरात शेकडो पथकर नाके आहेत.

आणखी वाचा-Christopher Columbus:अमेरिकेचा शोध लावणारा कोलंबस इटालियन नव्हे तर स्पॅनिश ज्यू?

मुंबईच्या वेशीवर कधीपर्यंत वसुली?

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला महत्त्व आहे. अशा वेळी पायाभूत सुविधा विकसित करणाऱ्या सरकारी यंत्रणांकडून मुंबईतील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून एमएसआरडीसीने मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधले. या कामासाठी जो काही खर्च आला तो वसूल करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या वाहनांकडून पथकर वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दहिसर, मुलुंड, एलबीएस मार्ग, ऐरोली आणि वाशी असे पाच पथकर नाके उभारत एमएसआरडीसीने पथकर वसुली सुरू केली. ही वसुली २०२७ पर्यंत सुरू राहणे अपेक्षित आहे. त्यास तूर्त विराम मिळाला असला, तरी २०२७ नंतरही वाहनचालक-प्रवाशांची मुक्तता होण्याची शक्यता नाही. कारण मुंबईतील प्रवेशद्वारावर २०२७ नंतर एमएमआरडीएकडून पथकर वसुली सुरू केली जाणार आहे. त्यांच्या या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएच्या प्राधिकरण बैठकीत मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे २०२७ नंतरही मुंबईतील पथकर नाक्यावरील पथकर वसुलीतून सुटका होणार नसल्याचे चित्र आहे.

आता हलक्या वाहनांनाच टोलमाफी…

दहिसर, मुलुंड, एलबीएस मार्ग, ऐरोली आणि वाशी असे पाच पथकर नाक्यांवर पथकर अदा करतच वाहनांना मुंबईतून प्रवेश करावा लागतो वा मुंबईतून बाहेर पडावे लागते. पथकरातून हलक्या वाहनांची तरी मुक्तता करावी अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून होत होती. राजकीय पक्षांनी, त्यातही मनसेने यासाठी मोठी आंदोलने केली आहेत. पण आता मात्र त्यांच्या या आंदोलनाला, मागणीला यश आले आहे. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील पाच पथकर नाक्यांवरून ये-जा करणाऱ्या हलक्या वाहनांना पथकरमाफी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. सोमवारी, १४ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही पथकरमुक्ती केवळ आणि केवळ हलक्या वाहनांसाठी असणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना सत्ताधाऱ्यांकडून देण्यात मिळालेली ही भेट मानली जात आहे. अंदाजे पावणे तीन लाख हलक्या वाहनचालकांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा-विश्लेषण : पुन्हा लॉरेन्स बिष्णोई! आमदार बाबा सिद्दिकी हत्येमागेही हात? तुरुंगात राहूनही सूत्रे कशी हलवतो?

इतर नाक्यांवरही मागणी?

आता मुंबईतील पाच पथकरनाक्यांप्रमाणे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अटल सेतू आणि अन्य पथकरनाक्यांवरही हलक्या वाहनांना पथकरमुक्ती देण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. तर पथकर विषयाच्या अभ्यासकांची राज्यातील सर्वच्या सर्व पथकर नाके बंद करण्याची मागणी आहे. आता लवकरच सत्तेत येणारे नवीन सरकार याविषयी काय भूमिका घेते, ही मागणी मान्य करते हा का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.