पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी झाले. डेलावेअर येथील विल्मिंग्टन येथे शनिवारी (२१ सप्टेंबर) ही परिषद आयोजित करण्यात आली होती. “मी माझे सहकारी राष्ट्राध्यक्ष बायडेन, पंतप्रधान अल्बानीज आणि पंतप्रधान किशिदा यांच्याबरोबर क्वाड परिषदेत सामील होण्यास उत्सुक आहे. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित करणारे समविचारी देशांचे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून ‘क्वाड’ उदयास आल्याचे त्यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सांगितले. क्वाड म्हणजे नक्की काय? भारतासाठी त्याचे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.

क्वाड म्हणजे काय?

हिंद महासागरातील डिसेंबर २००४ च्या सुनामीनंतर, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या चार देशांनी आपत्ती निवरणामध्ये सहयोग करण्यासाठी एक अनौपचारिक युती तयार केली. २००७ मध्ये, तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या युतीला क्वाड संघटना असे नाव दिले. क्वाड म्हणजेच ‘क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग’. परंतु, संघटनेच्या सदस्यांमधील एकसंधतेच्या अभावामुळे आणि क्वाड ही केवळ चीनचे वर्चस्व रोखण्यासाठी आहे, असे आरोप झाल्यामुळे संघटनेच्या कामकाजात अनेक अडथळे आले. अखेरीस सागरी सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या या संघटनेचे कामकाज थांबले. २०१७ मध्ये, वाढत्या चिनी आव्हानांचा पुन्हा सामना करण्यासाठी चार देशांनी क्वाड संघटनेचे पुनरुज्जीवन केले आणि संघटनेच्या विस्तरावरदेखील काम करण्यात आले.

हेही वाचा : ‘सायलेंट सॅकिंग’ म्हणजे काय? ॲमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी याचा वापर का करत आहे?

क्वाडची रचना सामान्य बहुपक्षीय संस्थेसारखी नाही आणि त्यात सचिवालय, तसेच कोणतीही कायमस्वरूपी निर्णय घेणारी संस्था (जसे की, ईयू किंवा यूएन) नाही. क्वाडमध्ये सामूहिक संरक्षणाच्या तरतुदींचा समावेश नाही, त्याऐवजी एकता आणि राजनैतिक सामंजस्य दाखवण्यासाठी संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. २०२० मध्ये, त्रिपक्षीय भारत-अमेरिका-जपान मलबार नौदल सराव विस्तारीत करण्यात आला आणि त्यात ऑस्ट्रेलियालाही सहभागी करण्यात आले. २०१७ मध्ये पुनरुत्थान झाल्यापासून क्वाडचा हा पहिला अधिकृत आणि चार देशांमधील पहिला संयुक्त लष्करी सराव होता. मार्च २०२१ मध्ये, क्वाड नेत्यांची भेट झाली आणि नंतर ‘द स्पिरिट ऑफ द क्वाड’ नावाचे एक संयुक्त निवेदन जारी केले गेले; ज्यामध्ये गटाचा दृष्टीकोन आणि उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली. वॉशिंग्टन डीसी येथे त्या वर्षाच्या उत्तरार्धात क्वाडची पहिली वैयक्तिक बैठक झाली.

वॉशिंग्टन डीसी येथे २०२१ च्या उत्तरार्धात क्वाडची पहिली वैयक्तिक बैठक झाली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

क्वाडची उद्दिष्टे काय आहेत?

गटाच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये सागरी सुरक्षा, हवामान बदलाच्या जोखमींना तोंड देणे, प्रदेशात गुंतवणुकीसाठी परिसंस्था (इकोसिस्टम) तयार करणे आणि तांत्रिक नवकल्पनांना चालना देणे यांचा समावेश आहे. २०२०-२१ मध्ये, संघटनेने करोना महामारीचा सामना करण्यासाठी, विशेषत: लसींच्या बाबतीतही सहकार्य केले. क्वाड सदस्यांनी तथाकथित क्वाड प्लसद्वारे भागीदारी वाढवण्याची इच्छा देखील दर्शविली आहे; ज्यात दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश असेल.

सर्व चार सदस्य देशांतील नेत्यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील मार्च २०२१ च्या एका ‘ओपिनियन पीस’मध्ये युतीची गरज आणि भविष्यासाठी त्याच्या हेतूंविषयी लिहिले, “त्सुनामीपासून, हवामानातील बदल अधिक धोकादायक झाले आहेत, नवीन तंत्रज्ञानाने आपल्या दैनंदिन जीवनात क्रांती घडवून आणली आहे, भू-राजकारण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे आणि महामारीने जग उध्वस्त केले आहे. या पार्श्वभूमीवर, आम्ही हिंद प्रशांत महासागर क्षेत्रासाठी सामायिक दृष्टीकोनासाठी पुन्हा वचनबद्ध आहोत. आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत की, हिंद प्रशांत महासागर प्रवेशयोग्य आणि गतिमान आहे, आंतरराष्ट्रीय कायदा आणि मार्गदर्शक तत्त्वांद्वारे शासित आहे.

समस्यांच्या विस्तृत श्रेणीसाठी ही संघटना वचनबद्ध असली, तरीही हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील इतर देशांना चिनी वर्चस्वापासून वाचवणे, हा या युतीमागील मुख्य उद्देश असल्याचे मानले जाते. चीनने भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी हिंद महासागरात आपल्या हालचाली वाढवल्याचे चित्र आहे. या प्रदेशातील महत्त्वाचे सागरी मार्ग कोणत्याही लष्करी किंवा राजकीय प्रभावापासून मुक्त ठेवणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या संघटनेकडे चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला धोरणात्मक गट म्हणूनही पाहिले जाते.

हेही वाचा : राजस्थानच्या सहाय्यक जिल्हाधिकारी चुकीच्या शस्त्रक्रियेचा बळी? कोण होत्या प्रियांका बिश्नोई?

चीनने सातत्याने क्वाडच्या अस्तित्वाला विरोध केला आहे. ही संघटना म्हणजे अमेरिकेने केलेल्या कुरापतींचा भाग असल्याचाही आरोप केला आहे. बीजिंगने उघडपणे आशियातील देशांमधील मतभेद भडकवल्याचा आरोप या संघटनेवर केला आहे. क्वाड म्हणजे चीनला घेरण्याच्या मोठ्या रणनीतीचा भाग आहे, असाही आरोप चीनकडून करण्यात आला आहे. चीनच्या वाढत्या सामर्थ्याला अटकाव करण्यासाठी तयार करण्यात आलेली संघटना असल्याचे क्वाडच्या सदस्य देशांनी कधीच जाहीरपणे बोलून दाखवलेले नाही, मात्र या संघटनेचा मुख्य हेतू तोच आहे, हेही तितकेच खरे.