२०१४ व २०१९ च्या निवडणुकांप्रमाणे यंदा भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. ४०० हून अधिक जागा मिळविण्याचा एनडीएचा दावा फोल ठरला. असे असले तरी एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे शनिवारी (८ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असे सांगितले जात आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत ५४३ पैकी २९२ जागा मिळाल्या; तर भाजपाला २४० जागा मिळाल्या. तसेच इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. निकाल स्पष्ट होताच एनडीएमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पंतप्रधान मोदी बुधवारी (५ जून) राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा विजयी झाले; मग त्यांनी राजीनामा का दिला? देशात नवीन सरकारस्थापनेची प्रक्रिया कशी आहे? याविषयी समजून घेऊ या.

निकालानंतर काय होते?

निवडणूक आयोगाने मतांची मोजणी केल्यानंतर प्रत्येक विजयी उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर विजयी उमेदवार प्रमाणपत्राच्या पावतीवर स्वाक्षरी करतो. ही पावती निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून लोकसभेच्या महासचिवांकडे नोंदणीकृत पोस्टाने त्वरित पाठवली जाते. विजयी उमेदवारांना देण्यात येणार्‍या या प्रमाणपत्राला औपचारिकपणे फॉर्म २२ म्हणून ओळखले जाते. विजयी उमेदवार जेव्हा लोकसभेत शपथविधीसाठी जातात तेव्हा त्यांची ओळख पडताळून पाहण्यासाठी अधिकार्‍यांना हे प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक असते.

हेही वाचा : ४०० पारची घोषणा अन् निकाल ३०० च्या आत; भाजपाचे नक्की काय चुकले?

या प्रक्रियेनंतर निवडणूक आयोग निवडून आलेल्या खासदारांची यादी राष्ट्रपतींकडे सुपूर्द करतो. त्यानंतर नवीन लोकसभेच्या स्थापनेला सुरुवात होते. २०१९ मध्ये खासदारांची ही संपूर्ण यादी निकाल जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २५ मे रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्याच दिवशी राष्ट्रपती कोविंद यांनी एनडीएला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आणि ३० मे रोजी शपथविधी सोहळा पार पडला.

सरकार कसे स्थापन होते?

कायद्यानुसार, भारताचे राष्ट्रपती पुढचे सरकार स्थापन करण्यासाठी आघाडीच्या पक्षाला किंवा गटाला आमंत्रित करतात. जर एकच पक्ष किंवा पक्षांची युती एकत्रितपणे २७२ चा आकडा गाठू शकली, तर ते सरकारस्थापनेचा दावा करू शकतात. राष्ट्रपती सर्वांत मोठ्या पक्षाच्या नेत्याला किंवा बहुसंख्येच्या आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात.

लोकसभेत कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळाले नाही, तर त्याला त्रिशंकू लोकसभा म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत राष्ट्रपती सर्वांत मोठ्या पक्षाच्या नेत्याला निमंत्रित करतात आणि त्याला पूर्ण बहुमत दाखविण्यासाठी १० दिवसांचा अवधी देतात. विहित कालावधीत पक्ष बहुमत दाखवू शकला नाही, तर राष्ट्रपती संसद विसर्जित करतात आणि पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करतात.

पंतप्रधान मोदी बुधवारी (५ जून) राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. (छायाचित्र-पीटीआय)

सध्याच्या परिस्थितीत भाजपाने २४० जागा जिंकल्या आहेत. हा आकडा बहुमताच्या २७२ जागांपेक्षा कमी आहे. परंतु, टीडीपी आणि जेडी (यू ) या त्यांच्या मित्रपक्षांसह भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९२ जागा जिंकल्या आहेत. एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील. मात्र, सरकारस्थापनेचा दावा करण्यापूर्वी जुन्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे; जो राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वीकारला आहे.

हेही वाचा : Lok Sabha Election 2024: सर्वाधिक आणि सर्वात कमी मतांनी लोकसभा जिंकणारे उमेदवार कोणते?

राजीनाम्यानंतर आता पुढे काय?

राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (८ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषविणारे नेते ठरतील. मोदींनी या निवडणूक निकालांबाबत “जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा विजय”, असे म्हटले आहे.