पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेन दौरा पूर्ण झाला आहे. युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान ‘मारिन्स्की पॅलेस येथे अनेक व्यापक विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी कीवमधील ‘ओएसिस ऑफ पीस’ पार्कमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली आणि युद्धात मारल्या गेलेल्या युक्रेनमधील मुलांच्या स्मृती स्थळाला भेट देऊनही श्रद्धांजली वाहिली.

मोदींनी ‘एक्स’वर लिहिले, “माझी युक्रेन भेट ऐतिहासिक होती. भारत-युक्रेन मैत्री अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मी राष्ट्रात आलो आहे. माझी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाली. शांतता कायम राहिली पाहिजे यावर भारताचा ठाम विश्वास आहे. मी युक्रेनचे सरकार आणि लोकांच्या आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानतो.” पंतप्रधान मोदींच्या या दौर्‍यात कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, यावर एक नजर टाकू या.

हेही वाचा : युनिफाइड पेन्शन योजनेचा २३ लाख कर्मचार्‍यांना होणार फायदा; UPS, OPS आणि NPS मध्ये फरक काय?

द्विपक्षीय संबंध आणि युक्रेन युद्धावर विस्तृत चर्चा

युक्रेन युद्धावर भारताने त्रयस्थ भूमिका घेतल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी फेटाळून लावला. मोदी म्हणाले की, संघर्षाच्या सुरुवातीपासून भारताने कधीही त्रयस्थ भूमिका घेतली नाही. भारत नेहमीच शांततेच्या बाजूने आहे, असे ते म्हणाले. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनमध्ये रशियाच्या ‘विशेष लष्करी कारवाई’चा निषेध न केल्याबद्दल भारत सुरुवातीपासूनच अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून आक्षेप घेत आहे. पाश्चिमात्य देशांनी मॉस्कोवर अनेक निर्बंध लादले आहेत, तर भारताने या दोघांमधील संबंध संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने मॉस्कोशी आपले अनेक दशके जुने धोरणात्मक संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मॉस्को भारताला बरेचसे लष्करी उपकरणदेखील पुरवते. रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याची भारताची इच्छाही मोदींनी व्यक्त केली.

युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. (छायाचित्र-पीटीआय)

“मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, भारत शांततेच्या कोणत्याही प्रयत्नांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे. जर मला यात वैयक्तिकरित्या कोणतीही भूमिका बजावता आली, तर मी ते करेन. एक मित्र म्हणून मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “निराकरणाचा मार्ग केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीने शोधला जाऊ शकतो आणि वेळ न घालवता त्या दिशेने वाटचाल करायला हवी. या संकटातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्र बसायला हवे,” असे इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात दिले आहे. युद्धाच्या सुरुवातीपासूनच मोदींनी मुत्सद्दीपणा आणि संवाद हाच संघर्ष सोडवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे वारंवार सांगितले आहे. जुलैमध्ये नुकत्याच झालेल्या रशिया दौऱ्यावर झेलेन्स्की यांच्यासह काहींनी पंतप्रधान मोदींवर टीकाही केली होती.

रशिया दौरा आणि झेलेन्स्की यांची नाराजी

पंतप्रधान मोदींनी आपल्या रशिया दौर्‍यादरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली होती, अगदी त्याचदिवशी रशियाच्या क्षेपणास्त्रांनी युक्रेनमधील विविध ठिकाणांना लक्ष्य केले; ज्यात कीवच्या रुग्णालयातील मुलांसह अनेक लोकांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी या हल्ल्यावेळी मोदींच्या भेटीचा उल्लेख “शांतता प्रयत्नांना मोठी निराशा”, असा केला होता. “रशियन क्षेपणास्त्राने युक्रेनमधील मुलांच्या सर्वात मोठ्या रुग्णालयावर हल्ला केला. तरुण कर्करोगाच्या रुग्णांना लक्ष्य केले. बरेच लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले,” असे झेलेन्स्की यांनी त्यावेळी ‘एक्स’वर लिहिले. “जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नेत्याने अशा दिवशी मॉस्कोमध्ये जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला मिठी मारताना पाहणे ही एक मोठी निराशा आणि शांतता प्रयत्नांना एक धक्का आहे,” असे ते म्हणाले होते.

मोदींनी रशियाच्या दौऱ्यावर असताना मुलांच्या रुग्णालयावरील हल्ल्याचा संदर्भ देत निष्पाप मुलांची हत्या हृदयद्रावक आणि अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हटले होते. “मानवतेवर विश्वास ठेवणारे कोणतेही लोक जेव्हा मरतात तेव्हा वेदना होतात आणि विशेषत: जेव्हा निष्पाप मुले मरतात. काल मला तुमच्याशी या विषयांवर बोलण्याची संधी मिळाली,” असे मोदी पुतिन यांना म्हणाले.

‘भारत तटस्थ नाही’

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता निर्माण करण्याची भारताची इच्छा दर्शविली. जयशंकर म्हणाले, “दोन्ही बाजूंनी तोडगा काढण्यासाठी एकमेकांशी संवाद साधण्याची गरज आहे, असे भारताचे मत आहे. शांततेसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी सर्व भागधारकांमध्ये व्यावहारिक सहभागाची गरज आहे.” युक्रेन जागतिक शांतता परिषदेत भारताचा सहभाग कायम ठेवू इच्छित आहे, असे ते म्हणाले. त्यांनी मोदी आणि झेलेन्स्की यांच्यातील चर्चा अतिशय तपशीलवार आणि अनेक प्रकारे रचनात्मक असल्याचे म्हटले. चर्चा पुढे नेण्याचे प्रभावी मार्ग कोणते असू शकतात, यावरही चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

“पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील बहुतांश चर्चा युक्रेनमधील युद्धासंदर्भात होती. पंतप्रधान मोदींनी शांतता लवकरात लवकर परत आणण्यासाठी सर्व शक्य मार्गांनी योगदान देण्याच्या भारताच्या इच्छेचा पुनरुच्चार केला,” असे जयशंकर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. “भारताने आणि पंतप्रधानांनी या विषयात अनेक सार्वजनिक भूमिका घेतल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी जाहीरपणे सांगितले होते की, हे युद्धाचे युग नाही आणि संवाद व मुत्सद्दीपणा या महत्त्वाच्या गोष्टी आहे; युद्धातून तोडगा निघणार नाही.” परराष्ट्र मंत्री म्हणाले की, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि राज्यांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे यासारख्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे पालन करण्याचा निर्णय घेतला.

झेलेन्स्की यांना भारतात आमंत्रित करणारा सामंजस्य करार

मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात भविष्यात धोरणात्मक भागीदारी वाढवण्याविषयी चर्चा झाली. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. ‘बिझनेस टुडे’नुसार, भारत आणि युक्रेनने कृषी, अन्न उद्योग, औषध, संस्कृती आणि मानवतावादी सहाय्य या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी करार केला. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील चर्चेचा महत्त्वपूर्ण भाग द्विपक्षीय संबंधांना समर्पित होता. व्यापार, आर्थिक समस्या, संरक्षण, औषधनिर्माण, कृषी, शिक्षण या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले.

“नेत्यांनी आंतर-सरकारी आयोगालादेखील काम दिले; ज्यात मंत्री कुलेबा आणि मी सह-अध्यक्ष आहोत. याचा मूळ उद्देश अलीकडच्या काळात खराब झालेले आमचे व्यापार आणि आर्थिक संबंध पुनर्निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणे आहे. निश्चितपणे या वर्षाच्या अखेरीस, या संस्थेची लवकर बैठक होण्याची अपेक्षा करतो, ” असे जयशंकर यांनी ‘एएनआय’ला सांगितले. जयशंकर म्हणाले की, मोदींनी झेलेन्स्की यांना सोयीस्कर वेळी भारत भेटीचे निमंत्रण दिले. आम्हाला आशा आहे की, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीदेखील त्यांच्या सोयीनुसार भारताला भेट देतील.”

भारताकडून मानवतावादी मदत

भारताने युक्रेनला मदत करण्यासाठी आपले मानवतावादी प्रयत्न सुरू ठेवले असून २२ टन किमतीची वैद्यकीय मदत उपकरणे सुपूर्द केली आहेत. “आज आम्ही युक्रेनला वैद्यकीय सहाय्य उपकरणे असलेले क्यूब्स सुपूर्द केले,” असे जयशंकर म्हणाले. भीष्म क्यूब म्हणून ओळखले जाणारे उपकरण, आपत्ती झोनमध्ये जलद तैनातीसाठी डिझाइन केलेले एक अत्याधुनिक मोबाइल रुग्णालय आहे. सर्व आवश्यक औषधे आणि उपकरणे क्यूबिकल बॉक्समध्ये (प्रत्येकी १५ इंच) सुव्यवस्थित पद्धतीने पॅक करून मोबाइल रुग्णालय तयार केले जाते. तसेच युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणत्या प्रकारच्या दुखापती व वैद्यकीय समस्या येऊ शकतात, यानुसार त्याची व्यवस्था केली जाते.

हेही वाचा : अंटार्क्टिकातील बर्फाची चादर कधीपर्यंत पूर्णपणे वितळणार? संशोधक काय सांगतात? याचा काय परिणाम होणार?

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका क्यूबमध्ये आघात, रक्तस्त्राव, भाजणे, फ्रॅक्चर, शॉक यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत विविध स्वरूपाच्या सुमारे २०० प्रकरणे हाताळण्याची क्षमता आहे. त्यात मूलभूत शस्त्रक्रियांना समर्थन देण्याची क्षमतादेखील आहे आणि त्यात मर्यादित प्रमाणात ऑक्सिजन तयार करण्याचीदेखील क्षमता आहे, असेही ते म्हणाले.