महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या देशाच्या नावाचा मुद्दा पदाधिकाऱ्याच्या २३ ऑगस्टच्या मेळाव्यामध्ये उपस्थित केला. यानंतर २५ ऑगस्ट रोजी पुण्यात राज यांच्या उपस्थित पार पडलेल्या सभासद नोंदणीच्या कार्यक्रमामध्ये नवी पेठेतील शहर कार्यालयाबाहेर या विधानाच्या पार्श्वभूमीवर “आता भारत नाही, हिंदूंचा हिंदूस्थान” असं वाक्य लिहिलेल्या राज ठाकरेंचं बॅनर झळकलं. तसेच ‘हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी हिंदूजननायक’ असा उल्लेख करत राज ठाकरेंचा भगवी शाल गुंडाळलेला फोटो आणि पाठीमागे भागव्या रंगात भारताचा नकाशाही या बॅनरवर दिसून आला. भारताच्या नकाशावर ‘हिंदूंचा हिंदूस्थान’ असं लिहिण्यात आलं होतं. या बॅनरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. मनसेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना असे बॅनर पुण्यामध्ये अनेक ठिकाणी लावले जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता देशाच्या नावाच्या मुद्द्यावरुन मनसे नवा राजकीय डाव टाकण्याच्या तयारी असल्याची चिन्हं दिसत आहेत. मात्र आपल्या देशाला पडलेलं ‘भारत’ किंवा ‘इंडिया’ हे नाव कुठून आलं तुम्हाला ठाऊक आहे का? या नावांमागील गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का? याचवर टाकलेली ही नजर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे मेळाव्यात नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये भाषणादरम्यान केलेल्या विधानानंतर पुण्यात त्याच संदर्भातून बॅनर झळकले. ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली. याचसंदर्भातून राज यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ या गाण्याचा संदर्भ देत आपण देशाचं नावं ‘हिंदुस्थान’ असं घेतलं पाहिजे असंही म्हटलं होतं. “कवी इक्बाल या माणासाने लिहिलेल्या काव्यामध्ये तो भारत नाही म्हणत आहे. तो काय म्हणतोय तर, सारे जहाँ से अच्छा ये हिंदुस्थान हमारा. हे हिंदूचं स्थान आहे. हे तो कवी म्हणतोय आणि आम्ही हिंदू या देशाला भारत म्हणतोय. आम्ही बोलताना बोलत पण नाही की, आम्ही हिंदुस्थानात आहोत. आमच्या भारतात म्हणतो आपण. नाहीतर अगदी सोप इंडिया,” असं म्हणत राज यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. या विधानाचा परिणाम दोनच दिवसांनी राज यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये बॅनरच्या माध्यमातून पहायला मिळाला.

मनसे पुण्यात सगळीकडे लावणार ‘हिंदुस्थान’वाले बॅनर
अजय शिंदे यांनी, “हिंदूंचाच हिंदुस्थान हीच आपली ओळख आहे. भारत असे संबोधित करून ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापूर्वीच्या कागदपत्रांमध्ये, विदेशी पर्यटकांकडूनही ‘हिंदुस्थान’ असेच नमूद करण्यात आले आहे. त्यासाठीच आता शहरात असे बॅनर उभारण्यात येतील,” असं स्पष्ट केलं आहे. तसेच, “गणेशोत्सवाच्या कालावधीत तरूणाईला त्याची माहिती दिली जाईल. त्यानंतरच्या टप्प्यात घरोघरी जाऊन हिंदूंचा हिंदुस्थान बाबत माहिती दिली जाईल. मनसेच्या प्रत्येक शाखेसमोर बॅनर उभारण्याचे नियोजित आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय हे बॅनर्स उभारले जातील. गणेशोत्सवानंतर ही कार्यवाही तातडीने केली जाईल,” असंही शिंदे म्हणाले. यामुळे भविष्यात देशाच्या नावावरुन हिंदुस्थानवर मनसे आग्रही असेल असं चित्र सध्या दिसत आहे. पण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचं नाव ‘भारत’ किंवा ‘इंडिया’ असं न घेण्याचं आवाहन केलं असलं तरी साधारण वर्षभरापूर्वीच हा मुद्दा अभिनेत्री कंगना रणौतने मांडला होता. मात्र तिने ‘हिंदुस्थान’ आणि ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हे अधिकृत नावं असावं अशी मागणी केलेली.

कंगनाने केलेली ‘भारत’ नावाची मागणी
देशाचं नाव बदलण्याची गरज असल्याचं मत कंगनाने वक्तव्य केलं होतं. कंगनाने देशाचं ‘इंडिया’ऐवजी बदलून ‘भारत’ असं करण्याची मागणी आपल्या फेसबुक पोस्टमधून केली होती. ‘इंडिया’ हे नाव ब्रिटीशांनी ठेवलं असून ते गुलामगिरीची आठवण करून देणारं आहे, असं ती म्हणाली होती. ‘भारत’ शब्दाचा अर्थ सांगताना कंगनाने तिच्या पोस्टमध्ये, ” ब्रिटीशांनी आपल्याला ‘इंडिया’ हे गुलामीचं नावं दिलंय. ज्याचा अर्थ केवळ सिंधू नदीच्या पूर्वेकडील देश असा होतो. आपण एखाद्या लहान मुलाला ‘लहान नाक’,’दुसरा मुलगा’ किंवा त्याहून वाईट म्हणजे ‘सी-सेक्शन’ अशा नावाने उल्लेख करू का? हे कसलं नाव आहे?” असं म्हटलं होतं. कंगनाने पुढे ‘भारत’ या शब्दाचा अर्थ सांगितला होता. “भारत हा संस्कृत शब्द आहे. भा म्हणजे भाव. र म्हणजे राग आणि त म्हणजे ताल असा आहे. गुलाम होण्याआधी आपण सांस्कृतिक आणि कलात्मकतेच्या बाबतीत खूपच विकसित होतो,” असं कंगना तिच्या २२ जून २०२१ च्या पोस्टमध्ये म्हटलेलं.

कंगनानंतर आता पुन्हा राज यांच्या भूमिकेमुळे देशाच्या नावाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज यांनी ‘भारत’ या नावालाही विरोध केला असून ‘हिंदुस्थान’ असं देशाचं नाव घेतलं पाहिजे असं म्हटलं आहे. मात्र आपल्या देशाला ‘भारत’ किंवा ‘इंडिया’ ही नावं कशी पडली याची गोष्ट फार रंजक आहे. संजीव संन्याल यांनी लिहिलेले ‘लँड ऑफ द सेव्हन रिव्हर्स – अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियाज् जिओग्राफी’ पुस्तकामधील ‘हिंदुस्थान’ आणि ‘भारत’ या नावांचा उगम कसा झाला याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी एकंदरितच भारताच्या भौगोलिक इतिहासाबद्दल मांडलेले मुद्दे खालीप्रमाणे…

– सरस्वती नदीकाठचे भरभराटीला आलेले नागरीकरण, जशी नदी आटत गेली तसे लयाला गेले. या लयाचा विचार, अभ्यास केल्याशिवाय भारताच्या इतिहासाचा प्रवाह समजून घेता येणार नाही.

– भारतीय लोक भूगोल, इतिहास, नागरीकरण यांविषयी पाश्चात्त्यांच्या तुलनेत मागासलेले होते, अशी समजूत आहे, ती खरी नाही.

– नवीन संशोधनानुसार भारतीय उपखंड आता जसा भौगोलिकदृष्टय़ा स्वतंत्र आहे, तसा पूर्वी नव्हता, तर आफ्रिका व मादागास्करशी जोडलेला होता.

– ख्रिस्तपूर्व १५००च्या दरम्यान आर्य (इंडो-युरोपियन) घोडे आणि पोलादी तलवारी घेऊन आशियावर आक्रमण करून आले. त्यांनी त्यानंतर भारताचे नागरीकरण केले अशी समजूत आहे. ती घट्ट करणे युरोपीय ब्रिटिशांच्या सोयीचे होते. परंतु नवीन संशोधनाकडे पाहिले असता सरस्वती काठचे ‘द्रविडी-हडाप्पा’ नागरीकरण हे त्याहून खूपच प्राचीन व प्रगत होते.

– हार्वर्ड मोडिकल स्कूलच्या डेव्हीड रीच या शास्त्रज्ञाने २००९मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार भारतातील लोक हे प्राचीन दक्षिण भारतीय (Ancestral South Indian) आणि प्राचीन उत्तर भारतीय (Ancestral North Indian) या दोन ढोबळ गटांत विभागले जातात. यातील दक्षिणेकडील प्रजा ही युरोप, पूर्व आशिया वा इतर कोणत्याही वंश-गटाशी संलग्न नाही. पण उत्तर भारतातील लोकांमध्ये काहीसा युरोपियन संकर आढळतो. उत्तरेतील R1a1 हे जैविक मिश्रण (Gene Mutation) हे उत्तर भारतीयांत आणि पूर्व युरोपीयन, चेकोस्लोवाकिया, पोलंड, लिथुआनिया, दक्षिण सबेरिया, कझाकिस्तान, उत्तर पूर्व इराण आणि कुर्दस्तिान यात सामायिक आढळते. जसा उत्तर भारतीय मानव हा कोणत्याही एका वंशाशी निगडित नाही, त्याचप्रमाणे दक्षिण भारतीय मानवही कोणत्याही एका वंशाशी निगडित नाही. त्यामुळे शुद्ध वंश असे काही भारतात अस्तित्वात नाही.

– प्राचीन भारतीय इतिहासात दोन स्रोत उपयोगाचे पडतात-
१) पुरातत्त्व पुरावा आणि २) वैदिकपरंपरेतील साहित्य रचना. यांचा थेट संबंध हडप्पन, इंडस व्हॅली किंवा इंडस-सरस्वती नागरी प्रस्थापनेशी आहे. १९२०च्या दशकात राखाल दास बॅनर्जी, सर जॉन मार्शल या भारतीय पुरातत्त्व खात्यांतील संशोधकांनी आणि दयाराम सहानी या शास्त्रज्ञाने हडप्पन संस्कृतीचा शोध लावेपर्यंत, आर्य संस्कृतीचे अवडंबर कमी झाले नव्हते. मोहंजोदडो या एकाच शहरात ५०,००० पेक्षा जास्त लोक राहत होते आणि या शहरात ६०० ते ७०० विहिरी होत्या. याचा अर्थ तेथील मानवाचे वास्तव्य, नागरी जीवनाचे अस्तित्व बऱ्याच काळापर्यंत अस्तित्वात होते आणि ते आर्याच्या आगमनापूर्वी होते. हडप्पन भारतीय आणि आर्य यांतील विशेष फरक हा घोडय़ांच्या वापराचा आहे. हडप्पन संस्कृतीत घोडे नव्हते, आर्य घोडे घेऊन आले. ऋग्वेदातील आर्याचा उल्लेख हा खास करून घोड्यांच्या संदर्भात येतो.

– हिंदूंच्या सर्वात जुन्या रचनांपकी ऋग्वेद ही रचना आहे आणि ती आजही पवित्र मानली जाते. ऋग्वेदात सरस्वतीचा उल्लेख ‘नदीस्तूतीसूक्त’ या रचनेत आला आहे. सरस्वतीचे भौगोलिक स्थान यमुना आणि सतलजमध्ये असल्याचे म्हटले आहे. गंगेचा उल्लेख मात्र नाममात्र असाच आहे. अलाहाबादमध्ये जिथे यमुना आणि गंगेचा संगम होतो, तिथेच जमिनीखाली सरस्वती वाहत असावी असे संन्याल यांचे मत आहे.

– सप्तसिंधू (या सात नद्या) हे ऋग्वेदाचे उगम स्थान होय. कदाचित सप्तसिंधू म्हणजे फक्त सरस्वती आणि वर्णघात होऊन सप्तसिंधूचे ‘हप्तिहदू’ असे नामकरण झाले आणि त्यातून हिंदू हे नाव उदयाला आले.

‘हिंदू’ या शब्दाच्या आणखी दोन व्याख्या सापडतात. १. हिंदेन – इजिप्शीयन भाषेत कापसाला हिदेन म्हणत असत. कापूस भारतातून इजिप्तला गेला या संदर्भात हिंदेनचे हिंदू झाले असावे. २. इंडस-सिंधू नदीच्या जवळ हिंदूकुश आदी ठिकाणी राहणारे लोक ते हिंदू असेही असावे.

– ‘दहा राजांचे युद्ध’ असा जो एका महायुद्धाचा उल्लेख ऋग्वेदात येतो ते युद्ध पंजाबातील रावी नदीच्या किनारी झाले. दहा वेगवेगळ्या टोळ्यांनी एकत्र येऊन ‘भारत’ नावाच्या बलाढ्य टोळीवर हल्ला केला. ऋग्वेदामध्ये ‘भारत’ या टोळीचा उल्लेख त्रुसू असाही येतो. ‘भारत’ ही टोळी आज जिथे हरयाणा आहे तेथील. ‘भारत’ या टोळीचे गुरू वसिष्ठ (आणि त्यांचे शत्रू विश्वामित्र) होत. या टोळीने इतर टोळ्यांचा दणदणीत पराभव केला. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव पडले असावे.

– ‘भारत’ या बलाढ्य टोळीने पराभूत केलेल्या टोळ्यांपकी दोन मोठ्या टोळ्या म्हणजे द्रुया (Druhya) आणि पारसू (Parsu) या होय. त्यातील द्रुया या टोळीला पंजाबातून पूर्व अफगाणिस्तानात हाकलण्यात आले. ‘गंधर्व’ हा त्यांचा राजा. त्यावरूनच आजचे ‘कंदाहार’ हे नाव रूढ झाले. म्लेंच्छ (Mlechhas) या शब्दाचा अर्थ राक्षसी वृत्तीचे परकीय लोक असा होतो. द्रुया या टोळीचा उल्लेख ऋग्वेदात म्लेंच्छ (Mlechha) असा केलेला आढळतो.

– दुसरी टोळी पारसू. ही टोळी बरेच अंतर गाठत पाख्ता या टोळीबरोबर (आजचे पख्तून) पार पíशयाच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली. तिथे गेल्यावरही त्यांनी आपला आर्य धर्म टिकवून ठेवला. पर्शियात न आढळणारा सिंह हा परसूनी आपले प्रतीक म्हणून कसा वापरला? कारण त्यांना सिंह-आर्यावर्तामुळे माहिती होता. अगदी अलीकडे इराणच्या शहाचे प्रथम बिरुद हे ‘आर्य-मिहीर’ असेच होते. ऋग्वेद आणि झेंद अवेस्ता यांमध्ये आढळणारे साम्य सर्वश्रुत आहे. यातूनच सप्तसिंधू, हप्तिहदू हा वर्णबदल अभिप्रेत आहे. कालांतराने पर्शियातून यातीलच काही लोक इस्लामच्या हल्ल्यामुळे पारसी म्हणून भारतात परत आले.

– ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही महाकाव्ये, महायुद्धे दक्षिणापथ आणि उत्तरापथ या दोन महामार्गावर घडलेली दिसतात. सीता, द्रौपदीपेक्षा रेशीम, रत्ने, मसाले यांच्या व्यापारावर ताबा मिळवणे हे या युद्धांचे अर्थकारण असावे. (Helen of troy किंवा Cleopatra यांच्यामुळे झालेल्या युद्धांतसुद्धा, व्यापार हे मूळ कारण असल्याचे दिसते.)

– प्राचीन भारतातील विजयनगर आणि आर्यावर्त हे दोन प्रांत वेगवेगळ्या काळी केंद्रिबदू होते. विजयनगरचे साम्राज्य आणि दौलताबादचा किल्ला यांची जशी महती पुस्तकात वर्णिली आहे, त्यापेक्षा अधिक महती ही आर्यावर्त, (म्हणजे आताचा हरयाणा) याविषयी आहे. आर्यावर्त हेच केंद्रस्थान धरून इतिहासाचे विश्लेषण संन्याल यांनी केले आहे. हरियाणाचे आजचे संदर्भ आर्यावर्ताशी कसे निगडित आहेत, तसेच आर्यावर्ताचे केंद्र म्हणजे आत्ताचे गुडगांव असे थोडेसे धाडसाचे विधान संजीव संन्याल ‘लँड ऑफ द सेव्हन रिव्हर्स – अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियाज् जिओग्राफी’ या पुस्तकात केलं आहे.

इंडिया’ नाव कुठून आलं?

कंगनाने जरी ‘इंडिया’ हे नाव ब्रिटीशांनी दिल्याचा दावा केला असला तरी ‘इंडिया’ हा शब्द मूळच्या लॅटीन भाषेतून आलाय. ‘इंडिया’ नावाबद्दल सांगायचं झाल्यास या शब्दाचा उगम हा लॅटीन भाषेत सापडतो. इंडस या पर्शियन नावाने सिंधू नदी ओळखळी जायची. याच नदीच्या आजूबाजूचा परिसर या अर्थाने सिंधू नदीच्या पूर्वेकडील भूभागाला ग्रीक आणि पर्शियन लोकांनी ‘इंडिया’ असं नाव दिल्याचं सांगितलं जातं. नंतर हळूहळू सिंधू नदीपासून ते पूर्व आणि दक्षिणेपर्यंतच्या भूभागाला ‘इंडिया’ नावाने संबोधलं जाऊ लागल्याचं सांगण्यात येतं.

मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray says we should called out nation hindustan but how does bharat india get its name scsg
Show comments