Bahadur Shah Zafar’s Family and Descendants: १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन दिवस भारतीयांसाठी महत्त्वाचे आणि मानाचे आहेत. विशेष म्हणजे या दिवशी पंतप्रधानांचे लालकिल्ल्यावरून होणारे भाषण आणि त्यानंतरचे संचलन हाही या दिवसांचा खास परिचयच आहे. एकूणच या दोन्ही दिवशी दिसणाऱ्या लाल किल्ल्याला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व असून मुघल, ब्रिटिश आणि भारताचा स्वातंत्र लढा अशा स्थित्यंतराचे तो प्रतीक आहे. त्यामुळेच या वास्तूला अनेकार्थाने भारतीय इतिहासात महत्त्व आहे. आता याच वास्तूवरुन नवीन वाद उफाळला आहे. शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर दुसरा याच्या वंशजांनी लाल किल्ला आपली मालमत्ता असून आधी ब्रिटिशांनी आणि मग भारत सरकारने तो हडप केल्याचा दावा केला आहे. त्याच निमित्ताने भारतीय इतिहासात बहादुरशहा जफर दुसरा कोण होता, याचाच घेतलेला आढावा.
हा दावा कोणी केला आहे?
शेवटचा मुघल बादशाह बहादुरशाह जफर दुसरा याच्या पणतूच्या- मिर्झा बेदर बख्तच्या विधवा बेगमनी आपण वैध वारस असल्याचा दावा करत लाल किल्ल्यावर अधिकार दर्शवणारी याचिका दाखल केली आहे. परंतु दोन्ही वेळेस त्यांची याचिका फेटाळण्यात आली. मिर्झा बेदर बख्त यांचा जन्म १९२० साली रंगून येथे झाला होता. तर मृत्यू १९८० साली कोलकात्यात झाला. त्यांना आधी निजामाकडून, नंतर केंद्र सरकारकडून आणि मग हजरत निजामुद्दीन ट्रस्टकडून पेन्शन मिळत होती. अजूनही तुटपुंजी सहा हजार रुपयांची पेन्शन सुरु आहे. याचीच खंत मिर्झा बेदर बख्त यांच्या विधवा बेगमनी व्यक्त केली आहे. त्यांना एक मुलगा आणि पाच मुली आहेत. परंतु हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्या एकाही अपत्याने शिक्षण पूर्ण केलं नाही. त्या चहा विकून, बांगड्या तयार करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळेच त्यांनी आधी २०२१ आणि त्यानंतर आता नुकसानभरपाई व किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती.

अधिक वाचा: दख्खनमधील ‘या’ गुलामाने केला होता मुघलांचा पराभव
आत्यंतिक शेवट/ Bahadur Shah Zafar’s Exile and Final Days
१८६२ साली शेवटच्या मुघल बादशाहाने रंगून (आता यांगून) येथे एका जीर्ण लाकडी घरात शेवटचा श्वास घेतला. त्याच दिवशी ब्रिटीशांनी त्याला प्रसिद्ध श्वेडागॉन पगोडाच्या परिसरात एका अज्ञात कबरीत पुरले. पराभूत, खचलेला आणि अपमानित झालेल्या या माणसाच्या मुघल पूर्वजांनी ३०० वर्षांहून अधिक काळ आधुनिक भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशाचा समावेश असलेल्या मोठ्या प्रदेशावर राज्य केले होते. त्याच्या कारकीर्दीची तुलना त्याच्या प्रसिद्ध पूर्वजांशी ‘अकबर किंवा औरंगजेब’ यांच्याशी होऊ शकत नाही. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्याने अत्यंत महत्त्वपूर्ण नेतृत्व केले. त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात त्याला एक अमूल्य स्थान मिळाले आहे.
बहादुरशाह जफर
बहादुरशाह जफर हा भारताचा १९ वा आणि शेवटचा मुघल सम्राट होता. तिमुरी घराण्यातील बहादुरशाह याचे मूळ नाव अबू जफर सिराजुद्दीन मुहम्मद बहादुरशाह होते. तो मुघल सम्राट दुसरा अकबरशाह आणि त्यांची हिंदू रजपूत पत्नी लालबाई यांचा पुत्र होता. १८ सप्टेंबर १८३७ रोजी वडिलांच्या मृत्यूनंतर तो दिल्लीच्या सिंहासनावर आरूढ झाला. त्याने गोहत्याबंदीचा आदेश दिला होता.धर्मनिरपेक्ष भावनेने राज्यकारभार करणाऱ्या या सम्राटाचे भारताच्या इतिहासात मोठे योगदान आहे. तो केवळ एक प्रभावी राजकीय नेता नव्हता, तर एक उत्कृष्ट कवी आणि गझलकार म्हणूनही प्रसिद्ध होता.
भारतातील सैनिकांनी ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध बंड पुकारले होते. हे बंड मोडीत काढल्यानंतर बादशाहावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्याला तुरुंगात डांबण्यात आले आणि त्यानंतर ब्रिटीशांच्या नियंत्रणाखाली असलेल्या आजच्या म्यानमारमध्ये त्याला (बर्मा) हद्दपार केले. ७ नोव्हेंबर रोजी ८७ व्या वर्षी तो बंदिवासात मरण पावला. पण त्याचे काव्य जिवंत राहिले. त्याने वापरलेले टोपणनाव ‘जफर’ याचा अर्थ विजय असा होतो. १७०० च्या दशकाच्या शेवटी मुघल साम्राज्याने त्याचा प्रभाव आणि प्रदेश गमावला. १८३७ साली जफर दुसरा गादीवर आला तेव्हा त्याचे राज्य फक्त दिल्ली आणि आजूबाजूच्या प्रदेशांपुरतेच मर्यादित होते. इतर मुघल सम्राटांप्रमाणे तो चंगेझ खान आणि तैमूर सारख्या मंगोल शासकांचा थेट वंशज मानला जातो. त्याच्या मृत्यूबरोबरच जगातील एका प्रसिद्ध राजवंशाचा शेवट झाला. ब्रिटीशांनी त्याच्या अनुयायांचा संपर्क रोखण्यासाठी त्याला एका अज्ञात कबरीत पुरले. त्याच्या मृत्यूची बातमी भारतात पोहोचायला पंधरा दिवस लागले होते. यानंतर १०० हून अधिक वर्षे जफर विस्मृतीत गेला. परंतु गेल्या काही दशकांत अनेक मार्गांनी हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. १९८० च्या दशकातील एका भारतीय दूरचित्रवाणी मालिकेने त्याच्या आठवणींना उजाळा दिला आणि दिल्ली व कराचीतील रस्त्यांना त्याचे नाव देण्यात आले. ढाकात त्याच्या नावावर एक उद्यान देखील आहे.
अधिक वाचा: ‘या’ क्रूरकर्मा मुघल सम्राटाने दिल्लीत केली होती मद्यबंदी! नेमके काय घडले होते?
“जफर एक विलक्षण व्यक्ती होता,”असे ‘द लास्ट मुघल’ या पुस्तकात इतिहासकार विल्यम डॅलरिंपल यांनी म्हटले आहे. “एक उत्तम सुलेखक (कॅलिग्राफर), कवी, सूफी पिर (आध्यात्मिक मार्गदर्शक) आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या महत्त्वाला प्राधान्य देणारा माणूस.” अशी त्याची ओळख होती. जफर कधीही नायक किंवा क्रांतिकारी नेता होण्यास तयार नव्हता, परंतु तो अकबराप्रमाणे इस्लामी सभ्यतेचा सहिष्णू आणि बहुपंथीय प्रतीक म्हणून आकर्षक ठरतो,” असे डॅलरिंपल त्यांच्या पुस्तकात लिहितात. जफरच्या धार्मिक सहिष्णुतेबद्दल ते असे म्हणतात की, हे त्याच्या मिश्र वंशावरून दिसून येते. त्याचे वडील अकबर शाह दुसरे हे मुस्लिम होते तर त्याची आई लालबाई हिंदू राजपूत राजकुमारी होती.

१८५७ चा उठाव/ Bahadur Shah Zafar’s Role in the 1857 Revolt
१० मे रोजी मेरठ या उत्तर भारतातील शहरात भारतीय सैनिकांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांविरोधात उठाव केला. हा उठाव दिल्ली, आग्रा, लखनौ आणि कानपूरपर्यंत पसरला. नवीन सुधारणा, कायदे, पाश्चिमात्य मूल्ये आणि ख्रिश्चन धर्म लादण्याच्या प्रयत्नांमुळे असंतोष वाढला होता. हिंदू आणि मुस्लिम सैनिकांनी उठाव केला आणि तत्कालीन मुघल सम्राट बहादुर शाह जफर दुसऱ्याला आपला प्रमुख मानले. मेरठमधून उठाव केलेले सैनिक ११ मे १८५७ रोजी सकाळी सात वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पोहोचले. त्यांनी इंग्रज अधिकारी जेम्स डग्लसचा पराभव केला आणि १२ मे १८५७ रोजी लाल किल्ल्यात मोठ्या उत्साहाने विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी बहादुरशाह जफर दिल्लीचा नबाब होता. सैनिकांनी त्याला भारताचा सम्राट आणि स्वातंत्र्यलढ्याचा नेता म्हणून घोषित केले. देशभरातून त्याला पाठिंबा मिळाला. नानासाहेब पेशव्यांनी स्वातंत्र्ययुद्धाचा नेता म्हणून बहादुरशाह जफर यांना भेटवस्तू पाठवून आपला पाठिंबा व्यक्त केला. तसेच मंगल पांडे, तात्या टोपे, झांशीची राणी लक्ष्मीबाई आणि पंजाबच्या रणजितसिंहांच्या पत्नी यांनीही बहादुरशाहला समर्थन दिले. या सर्व नेत्यांनी उठावाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्यामुळे स्वातंत्र्यलढ्याला व्यापक रूप मिळाले. परंतु ब्रिटीश जनरल्सनी पंजाबमधून शीख सैनिक आणि उत्तर-पश्चिम सीमेच्या प्रांतातून पठाण सैनिक तैनात केले. सप्टेंबरपर्यंत दिल्ली पुन्हा काबीज करण्यात आली. दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात हत्या झाल्याचा आरोप आहे. जुलै १८५८ पर्यंत उठाव अधिकृतपणे संपला. त्याच वर्षी ईस्ट इंडिया कंपनीचे उच्चाटन करून भारतावर थेट ब्रिटिश सरकारचा अंमल सुरू करण्यात आला.

बहादुरशाहचा पराभव झाला. तरीही भारतीय जनता बहादुरशाहलाच भारताचा सम्राट मानत होती. उठाव सुरू असतानाच तो आपली तीन मुले व नातवंडांसह दिल्लीच्या हुमायूनच्या मकबऱ्यामध्ये आश्रयास गेला. मिर्झा इलाही बख्तच्या विश्वासघाताने इंग्रज सैन्याने मेजर हडसनच्या नेतृत्वाखाली १४ सप्टेंबर १८५७ ला बहादुरशाहला पकडले.

कर्मचाऱ्यांसह बर्मामध्ये बंदिवासात असताना
जफरची समाधी
बहादुरशाहची शेवटची इच्छा ही शेवटचा श्वास भारतातच घ्यावा, तसेच दफनही भारतभूमीतच व्हावे ही होती; परंतु तसे झाले नाही. यांगूनच्या एका शांत रस्त्यावर असलेली जफरची साधी समाधी भारतीय इतिहासातील एक सर्वाधिक खळबळजनक कालखंडाची दुःखद स्मृती आहे. स्थानिक लोकांना जफरला स्थानिक छावणीच्या परिसरात कुठेतरी पुरले असल्याचे माहीत होते, परंतु १९९१ पर्यंत ती सापडली नव्हती. ड्रेनसाठी खोदकाम करणाऱ्या कामगारांना विटांचे बांधकाम आढळले आणि ते नंतर जफरचे थडगे असल्याचे स्पष्ट झाले. सार्वजनिक देणग्यांच्या मदतीने नंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले. भारतातील त्याच्या पूर्वजांच्या भव्य समाधींच्या तुलनेत जफरची समाधी साधी आहे. एका लोखंडी जाळीवर त्याचे नाव आणि पद लिहिले आहे. तळमजल्यावर त्याच्या पत्नींपैकी एक झीनत महल आणि त्याची नात रौनक जमानी यांची कबर आहे. खाली असलेल्या एका कोठारात जफरची कबर गुलाबाच्या पाकळ्या आणि इतर फुलांनी सजवलेली असते. एका लांब झुंबराखाली त्याचे चित्र लावलेले आहे. शेजारीच एक मशिद आहे. सर्व स्तरांतील लोक दर्ग्यावर येतात कारण त्याला सूफी संत मानले जाते. लोक त्याच्या कबरीजवळ ध्यान आणि प्रार्थना करतात. लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर ते पैसे आणि इतर वस्तू दान करतात असे स्थानिक सांगतात.
अधिक वाचा: ‘या’ मुघल सम्राटाला होते ख्रिश्चन धर्माविषयी कुतूहल! त्याचा भारतीय कलापरंपरेवर काय परिणाम झाला?
Bahadur Shah Zafar’s Contribution to Urdu Poetry: जफर त्याच्या उर्दूतील रहस्यमय काव्यासाठी ओळखला जातो. जीवन आणि प्रेमाबद्दलच्या त्याच्या गझला प्रसिद्ध आहेत. विशेषतः क्रांतीच्या काळामध्ये अनेक कविता व गझला लिहिल्या. त्याच्या कालखंडामध्ये उर्दू शायरी बहराला आली. ब्रिटिशांनी दिलेल्या त्रासाबद्दलही त्यांनी काही लेखन केले. त्याच्या बऱ्याच कविता व गझला १८५७ च्या उठावामध्ये नष्ट झाल्या. त्याच्या उर्वरित गझला कुल्लियात–ए–जफर या नावाने विख्यात आहे. आता फक्त यांगूनच्या मुशायऱ्यांमध्ये उर्दू कविता वाचण्यासाठी आयोजित सभांमध्ये त्या सादर केल्या जातात…