देशभरातील पर्यटनस्थळांसह धार्मिक स्थळांकडे मोठ्या संख्येने पर्यटक – भाविकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळे रोप वेने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात ४५ ठिकाणी रोप वे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या ४५ प्रकल्पांत मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ५ प्रकल्पांचा समावेश आहे. देशभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या माथेरान, अलिबाग आणि घारापुरी (एलिफंटा) या पर्यटनस्थळांचा त्यात समावेश आहे. केंद्र सरकारचा विशेष कार्यक्रम नेमका काय आहे आणि रोप वे प्रकल्प कसा असणार याचा हा आढावा…

रोप वे म्हणजे नेमके काय?

हवाई रज्जू अर्थात रोप वे हा वाहतुकीतला एक अत्याधुनिक असा वाहतूक पर्याय आहे. ओव्हरहेड केबल वायर आणि इलेक्ट्रिक मोटारच्या मदतीने प्रवाशांची ये-जा केली जाते. फ्रान्समधील लियोन येथे १८६२ मध्ये पहिला रोप वे उभारण्यात आला होता. पण पहिल्या केबल रोप वेची निर्मिती लंडनमधील अँड्र्यू स्मिथ हॅलिडी यांनी १८७३ मध्ये केली. पुढे रोप वेच्या तंत्रज्ञानात अनेक बदल होत गेले आणि हा वाहतूक पर्याय अधिकाधिक अत्याधुनिक तसेच सुरक्षित होत गेला. आज जगभरात रोप वेचा वापर पर्यटनासह वाहतुकीसाठी केला जात आहे. महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी १९९६ मध्ये रोप वे बांधण्यात आला. आता हा रोप वे जुना झाला असून तेथे नवीन रोप वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रोप वेसह राज्यात, एमएमआरमध्ये अनेक ठिकाणी रोप वे प्रकल्प राबवविले जाणार आहेत.

पर्वतमालाची अंमलबजावणी?

देशभरातील पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळे रोप वेने जोडण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय रोप वे कार्यक्रम – पर्वतमालाची २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात रोप वे प्रकल्प राबविण्यासाठी २०२४ मध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग लाॅजिस्टीक व्यवस्थापन लिमिटेडबरोबर (एनएचएलएमएल) सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार आता राज्यात ४५ रोप वे प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने बुधवार, १९ मार्च रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला असून राज्यात एनएचएलएमएलच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या ४५ पैकी २९ रोप वे प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे शासन निर्णयानुसार राज्य सरकारकडून राबविण्यात येणार्‍या १६ रोप वे प्रकल्पांतील नेरळ – माथेरान रोप वेची जबाबदारी एमएमआरडीकडे सोपविण्यात आली आहे.

४५ रोप वे प्रकल्प कुठे?

राज्यातील ४५ धार्मिक आणि पर्यटनस्थळे रोप वेने जोडली जाणार आहेत. त्यानुसार रायगड विकास प्राधिकरण (सार्वजनिक बांधकाम विभाग) रायगड किल्लावर जाण्यासाठी १.५ किमी लांबीचा रोप वे बांधणार आहे. तर नेरळ – माथेरान (१२ किमी) रोप वे प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) राबविला जाणार आहे. अलिबागमधील कुणकेश्वर (३.९) येथील प्रकल्प रायगड जिल्हा परिषदेकडून, अलिबाग चौपाटी – अलिबाग किल्ला (३ किमी) रो पवे प्रकल्प अलिबाग नगर परिषदेकडून, घारापुरी लेणी (३ किमी) प्रकल्प रायगड जिल्हा परिषदेकडून राबवविला जाणार आहे. तर श्री खंडोबा निमगाव खेड (१ किमी), सिंहगड किल्ला (२.२ किमी), महाबळेश्वर (२ किमी), प्रतापगड किल्ला (१किमी), सज्जनगडमधील परळी किल्ला (१.२ किमी), उरमोडी धरण – कास पठार (१० किमी), सातारा शहर – अजिंक्यतारा (०.६ किमी) आणि ठोसेघर धबधबा (०.५ किमी) हे रोप वे प्रकल्प सावर्जनिक बांधकाम विभागाकडून राबविले जाणार आहेत. श्री उत्तरेश्वर मंदिर (५.४३ किमी) प्रकल्प एमएसआरडीसीकडून, तर महामंडळाकडून तर रेणुका माता, नांदेड (३.५ किमी) रोप वे प्रकल्प केंद्रीय मार्ग निधी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून राबवविला जाणार आहे. एनएचएलएमएलकडून बाणकोट किल्ला (६.५ किमी), केशवराज मंदिर असुध (२.५ किमी), माहुली गड, ठाणे (२.४ किमी), सनसेट पॉइंट जव्हार (२ किमी), सुवर्णदुर्ग किल्ला (१.५ किमी), गगनगिरी मंदिर (६ किमी), राजगड किल्ला (१.४ किमी), शिवनेरी किल्ला (१.५ किमी), अष्टविनायक लेण्याद्री (०.८ किमी), दर्या घाट, पळू (३.२ किमी), पन्हाळा ज्योतिबा (३ किमी), विशाळगड (३ किमी), भीमाशंकर (२ किमी), हरिहर किल्ला (१.५किमी), ब्रह्मगिरी – अंजनेरी (५.८ किमी), मांगीतुंगी, नाशिक (४.५ किमी), चंद्रेश्वरम महादेव मंदिर (३ किमी), कळसूबाई शिखर (२.५ किमी), हरिश्चंद्र किल्ला (२ किमी), तोरणमाळ (२.८ किमी), हनुमान टेकडी मंदिर, छत्रपती संभाजीनगर (२.७ किमी), वेरूळ लेणी (६.१ किमी), अंजठा लेणी (५.४ किमी), कानिफनाथ गड (३.६ किमी), नागपूर मेट्रो स्थानक (५ किमी), रामटेक (०.६ किमी) आणि गोसेखुर्द धरण (१.१ किमी) या २९ प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

एमएमआरमध्ये पाच रोप वे प्रकल्प

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रोप वे कार्यक्रम – पर्वतमालाअंतर्गत राज्यात राबविण्यात येणार्‍या ४५ रोप वे प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आहेत. देशाच्या आर्थिक विकास वाढीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी केंद्राने एमएमआरचा विकास ग्रोथ हब म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतूक व्यवस्था मजबूत करून पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी एमएमआरडीएने रोप वे प्रकल्प राबविण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. त्यानुसार एमएमआरमधील सर्व मेट्रो स्थानके रोप वे प्रकल्पाने जोडण्यासाठी एमएमआरडीए अभ्यास करणार आहे. यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. आता राज्य सरकारने एमएमआरमध्ये पाच रोप वे प्रकल्प हाती घेतले आहेत. यात देशभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या माथेरान, अलिबाग आणि घारापुरी या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. नेरळ – माथेरान, अलिबाग चौपाटी – अलिबाग किल्ला, माहुली गड (ठाणे), कुणकेश्वर (अलिबाग) आणि घारापुरी (एलिफंटा) या पाठ ठिकाणी रोप वे प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांकडून केली जाणार आहे.

नेरळ – माथेरान अवघ्या काही मिनिटांत?

माथेरानला पोहचण्यासाठी आता मिनी ट्रेन, घोडा, हात रिक्षा, ई – रिक्षासह आणखी एक सुकर, अतिजलद पर्याय लवकरच पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. तो म्हणजे रोप वे. राज्य सरकारने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी एमएमआरडीएवर सोपवली आहे. नेरळ – माथेरान प्रवास करण्यासाठी आजघडीला ३० ते ४० मिनिटे लागतात. त्यासाठी आधी रस्ते प्रवास आणि त्यानंतर मिनी ट्रेन, घोडा, हात रिक्षा वा ई – रिक्षाचा वापर करावा लागतो. पण आता लवकरच अवघ्या काही मिनिटात रोप वेने हा प्रवास करता येणार आहे. नेरळ – माथेरान रोप वे १२ किमी लांबीचा असणार असून रोप वेतून जाताना माथेरानचे मनोहरी दृश्य न्याहळत प्रवास करण्याची संधी पर्यटकांनी लवकरच उपलब्ध होणार आहे. दरम्यान नेरळ – माथेरान रोप वे प्रकल्प राज्य सरकारने राष्ट्रीय रोप वे कार्यक्रम – पर्वतमालाअंतर्गत आता हाती घेतला असला तरी हा प्रकल्प जूनाच आहे. नेरळ – माथेरान दरम्यान ४.७ किमी लांबीचा रोप वे प्रकल्प २०१० मध्येच हाती घेण्यात आला होता.या प्रकल्पाच्या उभारणीचा २०१७ मध्ये प्रयत्नही झाला. १५० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प काही कारणाने रखडला. पण आता मात्र हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. राष्ट्रीय रोप वे कार्यक्रम-पर्वतमाला कार्यक्रमात या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. नेरळ – माथेरान दरम्यान १२ किमी लांबीचा हा रोप वे असणार असून हा रोप वे झाल्यास नेरळ – माथेरान अंतर सुमारे २० मिनिटांत पार करता येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या एमएमआरडीएकडून येत्या काही महिन्यातच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.

अलिबाग, घारापुरीतही रोप वे

माथेरानसह देशभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या अलिबाग येथेही रोप वे बांधण्यात येणार आहे. अलिबाग किल्ला कायमच पर्यटकांना आकर्षित करतो. ओहोटीच्या वेळी चालत अथवा घोडागाडीतून या किल्ल्यावर जावे लागते. पण लवकरच पर्यटकांना अलिबाग किल्ल्यावर रोप वेने जाता येणार आहे. अलिबाग चौपाटी – अलिबाग किल्ला रोप वे प्रकल्प ३ किमीचा असणार असून या प्रकल्पाची जबाबदारी अलिबाग नगर परिषदेवर असणार आहे. त्याचवेळी अलिबागमधील कुणकेश्वर येथेही ३.९ किमी लांबीचा रोप वे प्रस्तावित करण्यात आला असून प्रकल्प उभारणीची जबाबदारी जिल्हा परिषद रायगडवर सोपविण्यात आली आहे. राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील माहुली गडावर पोहचण्यासाठीही रोप वे बांधण्यात येणार आहे. हा रोप वे २.४ किमी लांबीचा असणार असून हा रोप वेची उभारणी एनएचएलएमएलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने शिवडी – घारापुरी (एलिफंटा) दरम्यान ८ किमी लांबीचा रोप वे प्रस्तावित आहे. मात्र जागिक वारसा म्हणून ओळख असलेल्या घारापुरी येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास भारतीय पुरातत्व विभागाने परवानगी नाकारल्याने हा प्रकल्प रखडला आहे. आता राज्य सरकारने ३ किमी लांबीचा घारापुरी रोप वे प्रस्तावित करून त्याची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेवर सोपविली आहे. हा रोप वे नेमका कसा असणार, कुठून कसा जाणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.