संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेता या नात्याने आपल्या पहिल्या भाषणात राहुल गांधी यांनी अभयमुद्रेचे आवाहन केले, भारतीय संस्कृतीत अभयमुद्रेचे विशेष महत्त्व आहे. ही एक आश्वासक आणि भयमुक्तता दर्शवणारी मुद्रा आहे. राहुल गांधींनी विद्यमान सरकार भीतीवर आधारित असल्याचे म्हटले आहे. तर भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात भीतीला कुठलाही थारा नाही. या मुद्रेमागील मूळ अर्थ भीतीचा सामना करावा, घाबरून जाऊ नये असाच आहे असे राहुल गांधी म्हणाले. ते पुढे म्हणाले, अभय मुद्रेचा समान दुवा आपल्याला भगवान शिव, गुरु नानक, येशू ख्रिस्त यांच्या प्रतिमेत आढळतो. शिवाय इस्लाम, बौद्ध, जैन या धर्मातही या मुद्रेला महत्त्व आहे. त्याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक आणि तात्विकदृष्ट्या, अभय मुद्रा म्हणजे काय? या मुद्रेचे मूळ कशात आहे? याचा घेतलेला हा आढावा.

अधिक वाचा: गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनीचे ऐतिहासिक महत्त्व काय?

बौद्ध धर्मातील मुद्रा

संस्कृतमध्ये, मुद्रा या शब्दाचा अर्थ शिक्का, चिन्ह, किंवा चलन असा होऊ शकतो, परंतु बौद्ध धर्मात या मुद्रांचा अर्थ हा हाताने करावयाच्या चिन्हांशी संबंधित आहे. एखाद्या विशिष्ट अनुष्ठाना दरम्यान या मुद्रा केल्या जातात. गौतम बुद्ध, बोधिसत्व, तांत्रिक देवतांच्या आणि इतर बौद्ध प्रतिमांमध्ये या मुद्रा आढळतात (Buswell and Lopez, The Princeton Dictionary of Buddhism, 2013). मुद्रा या सामान्यतः बुद्धरुपाच्या चित्रणाशी संबंधित असतात. या मुद्रा बुद्धाच्या अनुभूतीच्या अवस्थांचे सूक्ष्म प्रकटीकरण दर्शवतात. इसवी सनपूर्व सहावे शतक हा गौतम बुद्धांचा कालखंड आहे. गौतम बुद्धांनंतर जवळपास ५०० वर्षांपर्यन्त बुद्धांची मूर्ती तयार करण्यात आलेली नव्हती. सुरुवातीच्या कालखंडात बुद्धांचे रूप प्रतुकात्मक स्वरूपात दर्शवण्यात आले. म्हणूनच सांची स्तूपाच्या शिल्पांमध्ये बुद्धांचे अस्तित्त्व पदचिन्हाच्या किंवा सिंहासनाच्या स्वरूपात दर्शविले गेले. गौतम बुद्धांची पहिली मूर्ती इसवी सन पहिल्या शतकात घडवली गेली. या प्रारंभीच्या मूर्तींवर हेलेनिस्टिक प्रभाव होता. गौतम बुद्धांच्या सुरुवातीच्या मूर्तींमध्ये अभय मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, धर्मचक्र मुद्रा, ध्यानमुद्रा या चार मुद्रा प्रमुख आहेत. महायान आणि वज्रयान या दोन पंथांच्या स्थापनेनंतर आणि भारताबाहेर बौद्ध कलाकृतींचा प्रसार झाल्यामुळे गौतम बुद्धांच्या अनेक मूर्ती तयार करण्यात येऊ लागल्या. तांत्रिक पंथाच्या वाढत्या प्रभावामुळे बौद्ध धर्मात मूर्ती तयार करण्याचे प्रमाण अधिक वाढले.

निर्भयतेची मुद्रा

अभयमुद्रेत हाताचा तळवा हा आशीर्वाद देण्याच्या स्थितीत असतो. कधीकधी, तर्जनी, दुसरे किंवा तिसरे बोट अंगठ्याला स्पर्श करते. बौद्ध परंपरेत, अभयमुद्रा बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीशी संबंधित आहे, या मुद्रेतून ज्ञानातून प्राप्त होणारी सुरक्षितता, शांतता आणि करुणेची भावना व्यक्त होते. या बुद्धांच्या मुद्रेला पाहून पिसाळलेला हत्ती शांत झाला होता अशी दंतकथा बौद्ध परंपरेत आढळते. त्यामुळेच ही मुद्रा बौद्ध अनुयायांना निर्भयता प्रदान करण्याची क्षमता दर्शवते (बौद्ध धर्माचा ज्ञानकोश, २००४)

अधिक वाचा: भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?

बौद्ध पौराणिक कथेनुसार, देवदत्त हा गौतम बुद्धांचा चुलत भाऊ आणि बुद्धांचा शिष्य होता, त्याला अपेक्षित असलेली विशेष वागणूक न मिळाल्याने, त्याने प्रबुद्धाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याने एका जंगली हत्तीला मादकद्रव्य देऊन बुद्धांच्या मार्गावर सोडले. बुद्धांच्या शिष्यांमध्ये धावपळ सुरु झाली. परंतु बुद्ध शांत होते. बुद्धांनी प्रेम आणि दयाळूपणा दर्शविणाऱ्या अभयमुद्रेमध्ये हात वर केला. त्याबरोबर हत्ती ताबडतोब शांत झाला, त्याने आपले गुडघे टेकून बुद्धांना अभिवादन केले. म्हणूनच अभयमुद्रेला संरक्षण देणारी किंवा आश्रय दर्शविणारी मुद्रा म्हणून देखील पाहिले जाते.

हिंदू धर्मातील अभयमुद्रा

कालांतराने अभयमुद्रा हिंदू देवतांच्या चित्रणांमध्येही दिसू लागली. बुद्ध स्वतः पुराण देवता विष्णूचा नववा अवतार म्हणून हिंदू परंपरेत विलीन झाले. इ.स. ४५० ते सहाव्या शतकादरम्यान हिंदूंनी बुद्धांना विष्णूचा अवतार मानले, असे इंडोलॉजिस्ट वेंडी डोनिगर यांनी त्यांच्या द हिंदूज: ॲन अल्टरनेटिव्ह हिस्ट्रीमध्ये लिहिले आहे. बुद्ध अवताराचा पहिला उल्लेख विष्णु पुराणात (इ.स. ४००-५००) आला आहे. हिंदू धर्मावर अनेक परंपरा, प्रथा आणि संस्कृतींचा प्रभाव असल्यामुळे त्याचेच प्रतिबिंब कला आणि देवांच्या दृश्य चित्रणात दिसते. याचेच उदाहरण म्हणजे अभयमुद्रा, जी हिंदू देवता परंपरांचा अविभाज्य भाग ठरली.