गेल्या सोमवारी (२९ जुलै) लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषण केले. त्यांनी या भाषणामध्ये महाभारतातील चक्रव्यूहाचे रुपक वापरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर सडकून टीका केली. त्यांच्या या भाषणाची विशेष चर्चाही होत आहे. हे भाषण चर्चेत असतानाच काल शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या ‘एक्स’वर पोस्ट करून भाजपावर आरोप केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वरकरणी पाहता असे दिसत आहे की, टू इन वन यांना माझे चक्रव्यूहावरचे भाषण आवडलेले नाही. ईडीमधील आतील काही लोकांनी कळवले आहे की, माझ्यावर छापा टाकण्यासाठीची तयारी केली जात आहे. मी तुमचे खुल्या दिलाने स्वागत करतोय. चहा आणि बिस्कीट मात्र माझ्याकडून…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : महाभारत ते मुघल साम्राज्य तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास; का महत्त्वाचे आहे हे संग्रहालय?

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, कमळाचा आकार असलेले चक्रव्यूह सहा जणांकडून रचण्यात आले होते. कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूला याच चक्रव्यूहामध्ये अडकवून कौरवांकडून मारण्यात आले होते. पुढे राहुल गांधी यांनी शेतकरी, युवा, महिला, कामगार, लघु-उद्याोजक, दलित-आदिवासी आणि ओबीसींची तुलना महाभारतातील अभिमन्यूशी केली. महाभारतात सहा जणांनी अभिमन्यूची हत्या केली. आताच्या आधुनिक चक्रव्यूहात आधुनिक अभिमन्यूंना अडकवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्याोगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या सहा जणांनी हा आधुनिक चक्रव्यूह रचल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. या लोकसभेतच ‘इंडिया’ आघाडी हमीभावाचा कायदा आणि जातगणना संमत करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मध्यमवर्गही भाजपापासून दूर जात असल्याचा दावा गांधी यांनी केला. ‘चक्रव्यूहा’चे दुसरे नाव ‘पद्माव्यूह’ असेही आहे. कमळाच्या आकाराचे व्यूह असा याचा अर्थ आहे. आधुनिक ‘कमळ’रूपी चक्रव्यूहात अख्ख्या देशाची होरपळ सुरू आहे. सगळीकडे हिंसा आणि भयाचे वातावरण आहे, असेही ते म्हणाले.

द्रोणांचे चक्रव्यूह

कुरुक्षेत्रामध्ये सुरू झालेल्या महाभारतातील युद्धाच्या दहाव्या दिवशी भीष्म मारले गेले होते. त्यानंतर द्रोणाचार्य यांनी कौरवांच्या सैन्याचा ताबा स्वत:कडे घेतला. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये द्रोणांच्या नेतृत्वाखालील सैन्याकडून रणांगणामध्ये काही विशेष कामगिरी झाली नाही. त्यावेळी कौरवांमधील सर्वांत ज्येष्ठ बंधू दुर्योधनाने द्रोणांवर टीका करून पांडवांना पराभूत करण्याच्या प्रतिज्ञेची त्यांना आठवण करून दिली. या घटनेने बेचैन झालेले द्रोण पेटून उठले आणि त्यांनी शत्रूला धडकी भरवेल, अशा चक्रव्यूहाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या युद्धात सामील असलेल्या कौरव आणि पांडव अशा दोन्ही बाजूंनी विविध प्रकारचे व्यूह तयार केले आणि आपल्या सैनिकांना त्यानुसार तैनात केले. हे व्यूह म्हणजे एकप्रकारची लष्करी रचना होती. या व्यूहांच्या माध्यमातून शत्रू पक्षाचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचे ध्येय होते. शत्रू पक्षातील ताकदवान योद्ध्याला अधिकाधिक नुकसान पोहोचवून युद्धातील आपली बाजू अधिक भक्कम करण्याचे काम या व्यूहांच्या माध्यमातून केले जायचे. मात्र, शत्रू पक्षाने तयार केलेले अशाप्रकारचे व्यूह तोडायचे कसे आणि त्यातून बाहेर कसे निघायचे, याचेही एक तंत्र पारगंत योद्ध्याला ज्ञात असायचे. अशा अनेक व्यूहांपैकी चक्रव्यूह हे भेदण्यास सर्वांत कठीण असे व्यूह मानले जायचे. फार कमी योद्ध्यांना ते भेदायचे कसे, याचे ज्ञान अवगत होते. पांडवांच्या बाजूने केवळ कृष्ण, अर्जुन आणि अभिमन्यू यांनाच हे चक्रव्यूह कसे भेदायचे याची माहिती होती. अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा यांचा सुपुत्र होता. महर्षी द्रोणांनी कौरवांच्या लष्कराला विशिष्ट पद्धतीने तैनात करून चक्रव्यूहाची रचना केली होती. मात्र, ही रचना करतानाही सावधगिरी बाळगली होती. अर्जुन आणि त्याचा सारथी कृष्ण यांचे लक्ष इतरत्र वळवले जाईल, अशी तजवीज करूनच हे चक्रव्यूह रचण्यात आले.

चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू

इतर सर्व योद्ध्यांचे लक्ष इतरत्र वळवल्यामुळे पांडवांच्या बाजूने १६ वर्षांचा अभिमन्यू हाच हे चक्रव्यूह भेदू शकणाऱ्या योद्ध्यांमध्ये उरला होता. हे चक्रव्यूह भेदून आतमध्ये कसे जायचे, फक्त याचे ज्ञान अभिमन्यूला अवगत होते. मात्र, त्यातून बाहेर कसे पडायचे याबाबत तो अनभिज्ञ होता. असे का, याबाबतची कथाही मोठी रंजक आहे. अभिमन्यू जेव्हा सुभद्रेच्या पोटात होता, तेव्हा अर्जुनाने सुभद्रेला चक्रव्यूह कसे भेदायचे, याची इत्यंभूत माहिती सांगितली होती. चक्रव्यूह भेदण्यापर्यंतची माहिती सुभद्रेने ऐकली होती; मात्र चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे, ही माहिती ऐकताना ती झोपी गेली. यामुळे तिच्या पोटात असणाऱ्या अभिमन्यूलाही चक्रव्यूहाबाबतची माहिती अर्धवटच मिळाली होती. त्यामुळेच अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आत तर जाऊ शकला; मात्र त्यातून बाहेर कसे पडायचे, याची माहितीच त्याला ज्ञात नव्हती.

हेही वाचा : अनुसूचित जाती-जमातींसाठीही क्रिमीलेअर; क्रिमीलेअर म्हणजे नक्की काय आणि त्याचे निकष काय आहेत?

वास्तवात अभिमन्यू हा एक कुशल आणि शूर योद्धा होता. महाभारतामध्ये त्याला ‘जन्मवीर’ असे म्हटले गेले आहे. जन्मवीर याचा अर्थ जन्मापासून शूर असा होतो. असा जन्मापासून शूर असलेला अभिमन्यू रणांगणांमध्ये तयार करण्यात आलेले चक्रव्यूह सहजपणे भेदून आत जाऊ शकला. चक्रव्यूहाच्या बहुस्तरीय चकतीसारख्या रचनेमध्ये आत जाण्याचे धाडस अभिमन्यूने लीलया पार केले होते. इतर पांडव योद्ध्यांनी त्याचा पाठलाग करायचा आणि चक्रव्यूहामध्ये आत जाऊन हाहाकार माजवायचा अशी मूळ योजना होती, मात्र असे घडले नाही. कौरवांकडून पांडवांचा कठोर प्रतिकार करण्यात आला. विशेषत: जयद्रथाने केलेल्या प्रतिकारामुळे पांडवांना ही योजना पार पाडणे सहज शक्य झाले नाही. महर्षी द्रोणांनी आखलेली चक्रव्यूहाची रचना यशस्वी ठरली. युधिष्ठिर आणि भीम यांना चक्रव्यूहापासून लांब ठेवण्यात आणि एकट्या अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकवण्यात महर्षी द्रोण यशस्वी ठरले. कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये चक्रव्यूहामध्ये एकटा अडकलेला अभिमन्यू एखाद्या तरुण आक्रमक सिंहासारखा भासत होता. त्याने चक्रव्यूहामध्येही अनेक कौरवांना यमसदनी धाडले. दुर्योधन, दु:शासन आणि दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण यांना जबर जखमी करण्यात तो यशस्वी ठरला. मात्र, सरतेशेवटी सहा कौरवांनी एकाच वेळी अभिमन्यूवर हल्ला केला. खरे तर हे युद्धाच्या नियमांच्या विरोधात होते. मात्र, सगळी नैतिकता गुंडाळून ठेवत नियमांविरोधात जात कौरवांनी अभिमन्यूला कोंडित पकडले होते आणि त्याच्या विरोधात चढाई केली होती. चक्रव्यूहाच्या आतमध्ये जाऊन पराक्रमी कामगिरी करणारा अभिमन्यू सरतेशेवटी आपल्या प्राणाला मुकला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of abhimanyu and the chakravyuh invoked by rahul gandhi vsh