देशात सध्या एका संसर्गजन्य आजाराने चिंता वाढवली आहे. पंजाबमधील फरीदकोटमध्ये गेल्या आठवड्यात तीन वर्षांच्या मुलीचा संशयास्पद घटसर्प आजाराने मृत्यू झाला, या वर्षी पंजाबमधील या आजाराची ही पहिली घटना असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रतिबंधित रोगाविरुद्ध मुलीचे लसीकरण केले गेले नव्हते. पंजाब सरकारच्या ऑगस्ट २०२४ च्या अहवालानुसार, राज्यातील सुमारे ९६ टक्के मुलांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. राजस्थानमध्येही या आजारामुळे काही मुलांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गेल्या काही वर्षांत घटसर्प आजाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. घटसर्प हा आजार नक्की काय आहे? या आजाराची लक्षणे आणि उपाय काय? त्याविषयी जाणून घेऊ.

पंजाबमधील घटसर्प आजाराचे प्रकरण

फिरोजपूरमधील बस्ती आवा येथील एक मुलगी ६ ऑक्टोबर रोजी आजारी पडली आणि तिला डिप्थीरिया म्हणजेच घटसर्प या आजाराशी संबंधित अनेक लक्षणे दिसून आली. डॉक्टरांनी तिला फरीदकोटमधील गुरु गोविंद सिंग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (GGSMCH) नेण्यास सांगितले. ८ ऑक्टोबर रोजी तिचे निधन झाले. फिरोजपूर सिव्हिल सर्जनला या घटनेची माहिती दिल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) पथकांसह एक सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या बस्ती आवा आणि जवळच्या बस्ती बोरियनवली येथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वेक्षणानुसार, मृत मुलीचे पालक आणि त्यांची इतर दोन मुले निरोगी असल्याचे सांगण्यात आले. परिसरातील एका बालकाला हा आजार असल्याचा संशय असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. फिरोजपूर जिल्ह्यातील आरोग्य शिबिराच्या नोडल अधिकारी डॉ. मीनाक्षी धिंग्रा यांनी सांगितले की, चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) कडून दोन्ही मुलांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे.

राजस्थानमध्येही या आजारामुळे काही मुलांचा मृत्यू झाला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘या’ भारतीय स्टार्टअप संस्थापकाने कर्मचाऱ्यांना केलं करोडपती, कसं केलं शक्य?

आजाराची लक्षणे काय?

डिप्थीरिया म्हणजेच घटसर्प हा आजार ‘कोरीनेबॅक्टेरियम डिप्थीरिया बॅक्टेरिया’मुळे होतो. हे जीवाणू श्वसनमार्गावर परिणाम करतात आणि संपूर्ण शरीरात पसरतात. आजाराची लागण झाल्यास ताप, थंडी वाजून येणे, लिम्फ नोड्समध्ये सूज येणे, थकवा येणे, धाप लागणे यांसारखी सामान्य लक्षणे दिसून येतात. या आजारामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. लसीकरण हा त्याविरुद्ध सर्वोत्तम उपाय आहे. वेळापत्रकानुसार ०-१६ वर्षांच्या दरम्यान मुलांना सात डोस देणे आवश्यक आहेत. मूल एक वर्षाचे होण्यापूर्वी तीन डोस दिले जातात; ज्यात एक बूस्टर डिप्थीरिया आणि पेर्ट्युसिसचा समावेश असतो. मूल दोन वर्षांचे झाल्यावर टिटॅनस (डीपीटी)चा पाचवा डोस दिला जातो. मूल सहा वर्षांचे झाल्यावर एक आणि १० व १६ वर्षांमध्ये एक-एक असे डोस दिले जातात. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, २०२३-२४ मध्ये एक वर्ष वयोगटातील ९३.५ टक्के मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. पंजाबमधील लसीकरणाची टक्केवारी ९३.९६ टक्के इतकी आहे.

पंजाबच्या राज्य लसीकरण अधिकारी डॉ. बलविंदर कौर यांनी सांगितले की, ही संख्या वाढली आहे. “या वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत पंजाबचा संपूर्ण लसीकरण डेटा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्ये पोलिओ, गोवर, रुबेला, टिटॅनस, डिप्थीरिया, रोटाव्हायरस आणि एक वर्षापर्यंतच्या इतर आजारांसंबंधित लसीकरण झालेल्या एक वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे,” असे त्यांनी सांगितले.

२०२३-२४ मधील डेटा सांगतो की, भारतातील जवळजवळ ८४ टक्के डिप्थीरिया प्रकरणे १० राज्यांमधून नोंदवली गेली आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अलीकडच्या वर्षांत घटसर्पच्या रुग्णांमध्ये वाढ का झाली?

२०२३-२४ मधील डेटा सांगतो की, भारतातील जवळजवळ ८४ टक्के डिप्थीरिया प्रकरणे १० राज्यांमधून नोंदवली गेली आहेत; ज्यात केरळ, आसाम, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, नागालँड, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या डेटा पोर्टलने २०२३ मध्ये भारतात ३,८५० डिप्थीरियाची प्रकरणे नोंदवली आहेत; २०२२ मध्ये ३,२८६ आणि २०२१ मध्ये १,७६८ प्रकरणे नोंदवली आहेत. हा आकडा २०२० मध्ये ३,४८५, २०१९ मध्ये ९,६२२ आणि २०१८ मध्ये ८,६८८ होता. भूतकाळात लसीकरण न झालेल्या मुलांशी संबंधित प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केवळ आठ वर्षे सत्तेवर का राहू शकतात? काय आहेत नियम?

‘डब्ल्यूएचओ’च्या मते, “नैसर्गिक आपत्ती किंवा संघर्षातून बरे होत असलेल्या देशांमधील आरोग्याच्या पायाभूत सुविधा बिघडल्यामुळे नियमित लसीकरणात व्यत्यय येतो.” लोकांमध्ये लसीविषयी असणारा संकोचदेखील एक प्रमुख समस्या मानली जाते. आरोग्य शिबिरांनी फिरोजपूरमधील झोपडपट्ट्यांमधील लोकांची लसीकरण स्थिती तपासली आहे. मृत मुलीचे आई-वडील आणि जवळच्या संपर्कातील व्यक्तींचे त्यांचे वय विचारात न घेता लसीकरण करण्यात आले आहे, असे डॉ. धिंग्रा यांनी सांगितले. पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमधून येणाऱ्या स्थलांतरित लोकसंख्येचेदेखील लसीकरण होत आहे, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे; तेव्हाच ही प्रकरणे नियंत्रणात येऊ शकतील.