भाजपा नेते नरेंद्र मोदी आज रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनामध्ये पार पडणार असून या समारंभाला जवळपास ८ हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये काही इतर देशातील राष्ट्रप्रमुखांचाही समावेश आहे. एखाद्या घटनादत्त पदाचा कार्यभार स्विकारपूर्वी त्या व्यक्तीला जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी शपथविधी केला जातो. सामान्यत:, राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही संबंधित पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते. मात्र, शपथेमधील शब्दावरुनही बरेच वादविवाद झाले होते. शपथेमध्ये देवाला स्थान असावे की नसावे? ‘ईश्वरसाक्ष’ आणि ‘गांभीर्यपूर्वक’ या शब्दांचे स्थान नेमके कुठे असावे, यावरुनही बरेच वाकयुद्ध झाले होते. शपथविधी समारंभाची प्रक्रिया आणि त्याचा इतिहास जाणून घेऊयात.

शपथविधी समारंभ म्हणजे काय?

शपथविधी समारंभ हा एखाद्या घटनादत्त पदाचा पदभार स्विकारण्यासाठीची औपचारिकता असते. या प्रक्रियेच्या माध्यमातून पदभार स्विकारणारी व्यक्ती भारताच्या राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची आणि नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ घेते. वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या व्यक्तींकडून शपथ दिली जाते. राज्य स्तरावर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना राज्याचे राज्यपाल शपथ देतात. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना राष्ट्रपती शपथ देतात; तर राष्ट्रपती पदाची शपथ भारताचे सरन्यायाधीश देतात. शपथ घेणारी व्यक्ती देवाच्या नावाने शपथ घेऊ शकते किंवा ते “गांभीर्याने शपथ घेते की…” असे म्हणू शकते. या शपथविधी प्रक्रियेमधून भारतातील विविध पदांचे राजकीय अधिकारक्षेत्र तसेच राज्यघटना हीच देशाच्या सर्वोच्च स्थानी असल्याचे अधोरेखित केले जाते.

loksatta readers feedback
लोकमानस: दोन उद्याोगपतींच्या पलीकडे जावे लागेल
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Raj thackeray on Baba Siddique
Raj Thackeray : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बाहेरच्या राज्यातून…”
Surya Gochar sun transit in guru rashi dhanu
Surya Gochar 2024 : सूर्य देव करणार गुरूच्या राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशी होणार मालामाल; मिळणार धनसंपत्ती अन् अपार पैसा
reason behind celebration of wildlife week
विश्लेषण : वन्यजीव सप्ताह हा आता इव्हेंट झाला आहे का?
Lakshmi Narayan Rajyog before Diwali
Lakshmi Narayan Rajyog : दिवाळीपूर्वी निर्माण होणार लक्ष्मी नारायण राजयोग, ‘या’ पाच राशींना मिळणार पैसाच पैसा!
lokmanas
लोकमानस: एकांगी कल्पनाविलास
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती

हेही वाचा : शपथविधी समारंभाचा इतिहास कुठून सुरु होतो? भारतात कधीपासून सुरु झाली शपथविधीची प्रथा?

नेमकी कशी शपथ घेतली जाते?

पदभार कोणताही असो, प्रत्येक व्यक्तीला भारतीय राज्यघटनेप्रती आपली निष्ठा व्यक्त करावी लागते. घटनेच्या कलम ६० नुसार, राष्ट्रपतीपदाची शपथ पुढीलप्रमाणे दिली जाते, “ईश्वरसाक्ष शपथ घेतो की / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी (पदभार स्विकारणाऱ्या व्यक्तीचे नाव) मी भारताचा राष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचे निष्ठापूर्वक कार्यपालन करीन (किंवा मी भारताच्या राष्ट्रपतीची कार्ये पार पाडीन) आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन, रक्षण व संरक्षण करीन आणि मी स्वत:ला भारतीय जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेईन.” राज्यघटनेच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये इतर पदांसाठीच्या शपथेचा मजकूर देण्यात आला आहे. त्यांनाही गोपनीयतेचीही शपथ घ्यावी लागते. मंत्र्याना गोपनीयतेची शपथ पुढीलप्रकारे दिली जाते. : “मी, (शपथ घेणाऱ्याचे नाव) ईश्वरसाक्ष शपथ घेतो की / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करुन एरव्ही मी कोणत्याही व्यक्तीला अथवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.”

शपथेमध्ये बदल करण्याची परवानगी असते का?

शपथविधी सोहळ्याची पद्धती आणि त्याबाबतच्या नियमांशी परिचित असलेले राज्यघटनेचे तज्ञ सांगतात की, कलम १६४ नुसार शपथ घेण्यासाठीचा मजकूर जसा आहे तसाच वाचला पाहिजे. या कलमाच्या तिसऱ्या विभागामध्ये नमूद केले आहे की, एखाद्या मंत्र्याने विशिष्ट खात्याचा पदभार स्विकारण्यापूर्वी त्याला / तिला राज्यपाल तिसऱ्या अनुसूचीमध्ये ठरवून दिलेल्या नियमांनुसार, पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतील. २०१९ मध्ये, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या माता-पित्याचे स्मरण करुन पदाची शपथ घेतली होती; तर मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करुन शपथ घेतली होती. याबाबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवत म्हटले होते की, या कृत्यांमुळेच शपथ घेण्याच्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले आहे; मात्र, अनेक तज्ञांनी या युक्तिवादाशी असहमती दर्शवली होती. महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी याबाबत म्हटले होते की, “शपथ घेण्याचा मजकूर महत्त्वाचा आहे. तो भारतीय राज्यघटनेने निश्चित करुन दिलेल्या मजकुराप्रमाणेच असायला हवा. जोपर्यंत या शपथेतील मजकुरापूर्वी किंवा मजकुरानंतर काहीही जोडल्याने शपथेचा अर्थ किंवा सारांश बदलत नाही, तोपर्यंत तसे करणे बेकायदा ठरत नाही.” याचप्रमाणे, २०२३ मध्ये कर्नाटक राज्यातील मंत्रिपदाची शपथ घेताना यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी बुद्ध आणि बसवण्णा यांच्या नावाने; तर चामराजपेटचे आमदार जमीर अहमद खान यांनी अल्लाह आणि त्यांच्या आईच्या नावाने शपथ घेतली होती. परंतु, जर एखादी व्यक्ती दिलेल्या मजकुराव्यतिरिक्त दुसरेच काहीतरी बोलत असेल वा मुद्द्यापासून भटकत असेल; तर त्यात व्यत्यय आणून शपथ घेणाऱ्या व्यक्तीला योग्य तो मजकूर वाचण्यास सांगण्याची जबाबदारी शपथ देणाऱ्या व्यक्तीची असते.

हेही वाचा : मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ७ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार; कोण कोण भारतात येणार?

उदाहरणार्थ, २०१६ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले शपथ घेताना स्वत:चेच नाव घेण्यास विसरले होते. तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांना शपथेच्या सुरुवातीला स्वत:चे नाव घेण्याची आठवण करुन दिली होती. बिहारमधील २०१५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर, राजदचे नेते तेज प्रताप यादव यांनी गोपनीयतेची शपथ घेताना चुकीचा उच्चार केला होता. तेव्हाही बिहारच्या राज्यपालांनी त्यांना अशाच प्रकारे दुरुस्त केले होते. त्यांनी आपल्या शपथेमध्ये ‘अपेक्षित’ ऐवजी ‘उपेक्षित’ असे म्हटले होते. तेव्हा राज्यपालांनी यादव यांना पुन्हा एकदा योग्य पद्धतीने शपथ घेण्यास सांगितले होते.

‘ईश्वरसाक्ष’ की ‘गांभीर्यपूर्वक’? दोन शब्दांवरुन घमासान

संविधान सभेमध्ये शपथेमधील शब्दांवर मोठा वादविवाद पहायला मिळाला होता. मोठ्या चर्चेनंतर शपथेमधील शब्द ठरवण्यात आले होते. धर्मनिरपेक्ष देशातील घटनादत्त पदभार स्विकारणाऱ्या व्यक्तींनी देवाच्या नावाने शपथ घ्यावी की नको, यावरुन घमासान चर्चा झाली होती. बऱ्याच वादविवादानंतर शपथ घेताना देवाचे नाव घेतले जाऊ शकते, यावर एकमत झाले. मात्र, “गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की…” हा वाक्यांश “ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” या वाक्यांशाच्या आधी यावा की नंतर यावा यावरुनही वाद सुरु झाला आणि तो विकोपाला गेला. यावरुन संविधान सभेतील एका सदस्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही खडसावून असे म्हटले होते की, देवाच्या आड व्याकरणाला आणणे बरोबर ठरणार नाही.

२६ ऑगस्ट, १९४९ रोजी संविधान सभेचे सदस्य महावीर त्यागी यांनी असा आरोप केला होता की, ‘ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…’ हा वाक्यांश सलग ओळीमध्येच होता आणि त्याला पर्याय म्हणून ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ हा वाक्यांश त्या ओळीच्या खाली देण्यात आला होता. परंतु डॉ. आंबेडकरांनी हा क्रम नंतर बदलला. ते म्हणाले की, “आता मला हे सांगायला खेद वाटतो की, डॉ. आंबेडकरांनी एखाद्या शाळकरी मुलाप्रमाणे एक युक्ती केली आहे. त्यांनी ओळीच्या वर ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ हा वाक्यांश आणला आहे तर ओळीच्या खाली ‘ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…’ हा वाक्यांश ठेवला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देवाला खाली ठेवण्यात आले आहे, असे लोकांना वाटू नये, याची आपण काळजी घ्यायला हवी.” यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उत्तर अत्यंत चपखल होते. बाबासाहेब म्हणाले होते की, “याबाबत कोणतीही एकमेव धोरणात्मक पद्धती आपण अवलंबलेली नव्हती, हे मला मान्य करावे लागेल. उदाहरणार्थ, कलम ४९ मध्ये, ‘ईश्वरसाक्ष’ ओळीच्या वर घेतले आहे तर ‘गांभीर्यपूर्वक’ खाली घेतले आहे. या कलमाच्या सुधारणेमध्ये आम्ही फक्त मुख्य कलमामध्ये नमूद केलेल्या शब्दांचे पालन केले आहे. कारण, मुख्य कलमामध्ये ‘प्रतिज्ञा घ्या किंवा शपथ घ्या’ असे शब्द आहेत. तोच क्रम शपथेमध्येही घेण्यात आला आहे. त्यामुळेच, शपथेच्या मजकुरामध्ये ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा’ हा वाक्यांश वर आहे तर ‘ईश्वरसाक्ष शपथ’ हा वाक्यांश खाली आहे. हे तार्किकदृष्ट्याही अत्यंत योग्य आहे.” बाबासाहेब पुढे असेही म्हणाले की, “असे करणे आम्हाला ईष्ट का वाटले, याचेही कारण असे आहे की, या देशातील हिंदू व्यक्तीला जेव्हा कोणत्याही न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावले जाते, तेव्हा सामान्यत: तो प्रतिज्ञा घेतो. केवळ ख्रिश्चन, अँग्लो-इंडियन आणि मुस्लिमच शपथ घेतात. हिंदूंना देवाचे नाव घेणे आवडत नाही. म्हणून मला असे वाटले की याबाबत आपण बहुसंख्य समाजाच्या भावनांचा आणि आचरणाचा आदर केला पाहिजे आणि म्हणूनच ही पद्धत स्विकारली आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या या युक्तिवादावर त्यागी फारसे खुश नव्हते. त्यांनी आंबेडकरांना रागाने म्हटले की, “देवाच्या आड व्याकरणाला आणणे बरोबर ठरणार नाही.” दोघांच्या वादविवादामध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी मध्यस्थी केली आणि म्हटले की, “या विषयावर एवढी चर्चा होण्याची गरज नाही. त्यापेक्षा या विषयावर मतदान घ्या. कारण, या विषयावर चर्चेला फार जागा आहे, असे वाटत नाही.”

सध्या राज्यघटनेमध्ये “ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” हा वाक्यांश “गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की…” या वाक्यांशाच्या वर आहे.