ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे आव्हान इंग्लंडने उपांत्य फेरीत अगदीच किरकोळीत मोडून काढले. नाणेफेकीचा कौल हरण्यापासून सगळे फासे भारताच्या विरोधात पडले. भारताच्या संघनिवडीतही चुका दिसून आल्या. एकूणच भारताची नेमकी गणिते कुठी चुकली, काय झाले, इंग्लंडकडून इतका दारूण पराभव का पत्करावा लागला, याचा आढावा.

उपांत्य फेरीत भारतीय संघाची निवड चुकली का?

इंग्लंड संघाचा इतिहास बघता भारतीय संघाने लेगस्पिनर यजुवेंद्र चहलला संधी देणे अपेक्षित होते. फिरकी गोलंदाजी खेळणे हा इंग्लंड संघाचा कच्चा दुवा होता. पण, त्यावर घाव घालण्याचा प्रयत्न भारताने केला नाही. फलंदाजीमध्ये असलेल्या सातत्याचा अभाव लक्षात घेता, संघ व्यवस्थापनाने एका फलंदाजाला वगळून चहलला संधी देण्याचे टाळले असावे. मात्र, ही भारताची मोठी चूक होती. एक वेगवान गोलंदाज कमी करून चहलला खेळवणे शक्य होते. अतिरिक्त वेगवान गोलंदाजीसाठी भारताकडे हार्दिक पंड्याचा पर्याय होता. भारताने धाडसी निर्णय घेण्याची गरज होती. हे धाडस संघ व्यवस्थापनाने दाखवले नाही. त्यांनी झिम्बाब्वेविरुद्धचा संघच कायम ठेवला.

नाणेफेक गमावण्याचा किती परिणाम झाला?

यापूर्वी झालेल्या सामन्यात वापरण्यात येणाऱ्या खेळपट्टीवरच हा सामना होणार म्हटल्यावर इंग्लंडने सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती. पण संथ झालेली खेळपट्टी इंग्लंडने अधिक चांगल्या पद्धतीने ‘वाचली’. त्यामुळेच नाणेफेक जिंकल्यावर जॉस बटलरने आव्हानाचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर कर्णधारांशी झालेल्या चर्चेत इंग्लंडने खेळपट्टी सोपी आणि साधारण दोनशे धावांची असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आव्हानाचा पाठलाग शक्य असेल, असे सांगितले. पण, रोहितने नाणेफेक जिंकली असती, तरी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असे उत्तर दिले होते. यावरूनच खेळपट्टीचा इंग्लंडने किती सविस्तर अभ्यास केला असेल, याचा अंदाज येतो.

फलंदाजांनी गमावले, गोलंदाजांनी घालवले असे म्हणता येईल का?

भारतीय फलंदाजीत सातत्याचा अभाव दिसून येतच होता. विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्याखेरीज एकही फलंदाज छाप पाडू शकला नव्हता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रोहित शर्मा आणि केएल राहुल ही सलामीची जोडी सपशेल अपयशी ठरली. जेव्हा २० षटकांचाच सामना असतो, तेव्हा सलामीच्या जोडीचे योगदान महत्त्वाचे असते. धावा नसल्या तरी पॉवरप्लेमध्ये गडी राखून ठेवणे आवश्यक असते. भारतीय सलामीच्या जोडीला येथेच अपयश आले. फलंदाजांचे अपयश आतापर्यंत गोलंदाजांनी धुवून काढले होते. पण, या वेळी गोलंदाजांनीही निराशा केली. एकाही गोलंदाजाला लय सापडली नाही. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना लय पकडूच दिली नाही.

प्रतिस्पर्ध्यांबाबत अभ्यास करण्यात भारतीय संघ चुकला?

उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाल्यावर दोन्ही संघांकडे एकमेकांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ होता. त्यासाठी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध आहेत. यानंतरही भारतीय संघ इंग्लंडचा अभ्यास करण्यात कमी पडला. फलंदाजीतील उणिवा भरून काढण्यात आणि भरात असणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करण्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने वेळ दवडला. तुलनेत इंग्लंड संघाचे ‘होम वर्क’ एकदम अचूक होते. त्यांनी सरावापेक्षा खेळपट्टीपासून भारताच्या प्रत्येक खेळाडूचा अभ्यास केल्याचे त्यांच्या देहबोलीतून दिसून आले. सूर्यकुमारचे त्यांनी दडपण घेतले नाही. भारतीय फलंदाजांसाठी त्यांनी चेंडू जरा पुढे टाकला आणि वेग कमी केला. ‘स्लोअर वन’ चेंडूंवर भर देऊन इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांमधील मनगटी ताकदीची कसोटी पाहिली. यात भारतीय फलंदाज अडकले. भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवता येतो हे बांगलादेशने दाखवून दिले होते. इंग्लंडने ती पूर्ण निष्प्रभही करता येते हे दाखवून दिले.

पॉवरप्लेचा उपयोग करण्यात अपयश?

फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही वेळी भारताला पॉवरप्लेचा वापर करता आला नाही. फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली नव्हती. भारताला फलंदाजी करताना ६ षटकांत ३८ धावाच करता आल्या. त्याउलट इंग्लंडने याच षटकांत ६३ धावा ठोकल्या. सलामीनंतर खेळायला येणाऱ्या फलंदाजावर दडपण ठेवण्यासाठी खेळपट्टीवरील जोडी फोडणे आवश्यक असते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यासाठी प्रयत्न केलाच नाही असे दिसून आले. भारताच्या फलंदाजांनी उत्तरार्धातील अखेरच्या १८ चेंडूंत डावाला वेग दिला. भारताची फलंदाजी १० ते १२ षटकांत खुलली नाही. जेथे २०० धावांचा अंदाज व्यक्त होत होता, तेथे १६८ धावाच झाल्या.

कर्णधार म्हणून रोहित अपयशी ठरला का?

या स्पर्धेत कर्णधाराच्या आघाडीवर रोहित अपयशी ठरताना दिसून आला. अनेकदा तो मैदानावर गोंधळलेला दिसला. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध रोहित सक्षम नेतृत्वच देऊ शकला नाही. गोलंदाजांचा त्याला वापर करता आला नाही. फिरकी गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांत गोलंदाजी मिळणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. फिरकी गोलंदाजाला थेट सहाव्या षटकांत वापरले गेले. त्याउलट जॉस बटलरने आपल्या गोलंदाजांचा वापर योग्य पद्धतीने केला. विशेषतः त्याने लियाम लिव्हिंगस्टोनचा केलेला वापर अफलातून होता. बटलरचे गोलंदाजीतील बदल भारतीय फलंदाजीला रोखण्यात महत्त्वाचे ठरले यात शंका नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 another cricket wc another heartbreak what happened this time with team india print exp scsg
Show comments