भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेला सामना अतिशय रोमांचक ठरला, हा सामना भारतीय संघाने ६ धावांनी जिंकला. आणि टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला सातव्यांदा पराभूत केले. या सामन्या दरम्यान कामरान अकमल या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने अर्शदीप सिंग विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर हरभजन सिंगने कामरान अकमल याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या टी-२० विश्वचषक सामन्याचे लाईव्ह विश्लेषण करण्यासाठी कामरान अकमल याला आरे न्यूजकडून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्याने अर्शदीपच्या धर्माबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यावेळी पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात १८ धावांची गरज होती, परंतु अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी करत १८ धावांचा बचाव केला. याचेच विश्लेषण करताना अकमलने ‘अर्शदीपला शेवटची ओव्हर टाकायची आहे. तुम्हाला माहीत आहे की, ‘आता १२ वाजले आहेत’, असे म्हणून तो जोरजोरात हसू लागला. हाच व्हिडीओ रिपोस्ट करत हरभजन सिंगने आधी शिखांचा इतिहास जाणून घे, शिखांनी तुमच्या माता भगिनींना आक्रमणकर्त्यांपासून वाचवले आहे, आणि ‘त्यावेळी १२ वाजले’ होते, असे म्हणत त्याची कानउघाडणी केली. त्याच पार्श्वभूमीवर शिखांचा आणि रात्री बारा वाजण्याचा नेमका संबंध काय हे जाणून घेणे नक्कीच माहितीपूर्ण ठरावे.

अधिक वाचा: दख्खनमधील ‘या’ गुलामाने केला होता मुघलांचा पराभव; का महत्त्वाचा आहे त्याचा इतिहास?

‘१२ बजे के बाद सिख’… मग १२ वाजण्यापूर्वी नेमके काय घडले होते?

‘१२ बजे के बाद सिख’ असे म्हणत शिखांची नेहमीच खिल्ली उडवली जाते. संता-बंता या सरदारजींवर केल्या जाणाऱ्या जोक्सचा तर हा आवडता विषय आहे (संदर्भ: हाऊ द सिख जोक वॉज बॉर्न: प्रितींदर सिंग, ५ जानेवारी १९९८ इंडियन एक्सप्रेस). परंतु रात्रीचे १२ आणि शिखांचा अनन्य साधारण संबंध आहे. १७ व्या शतकात नादीर शाहने भारतावर आक्रमण केले होते. त्याने या आक्रमणात संपूर्ण दिल्ली उध्वस्त केली होती. मोठ्या प्रमाणात लूटमार आणि नरसंहार केला होता. इराणमधील १७ व्या शतकातील हा शासक त्याच्या क्रूरतेसाठी प्रसिद्ध होता. तोच इराणमधील (पर्शिया) अफशरीद राजवंशाचा संस्थापक होता. त्याच्या लष्करी यशामुळे इतिहासकार त्याला ‘पर्शियाचा नेपोलियन’ असेही म्हणतात. तैमूर आणि चेंगेज खान यांसारखे मध्य आशियातील दोन विस्तारवादी आणि निर्दयी शासक नादिरशहाचे प्रेरणास्थान होते. १७३६ ते १७४७ या कालखंडादरम्यान त्याच्या हत्येपर्यंत नादिरशहाने इराणवर राज्य केले. आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया, उत्तर कॉकसस, इराक, तुर्की, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, पाकिस्तान, बहरीन आणि ओमानपर्यंत त्याचे साम्राज्य विस्तारले होते. (संदर्भ:नादीर शाह इन इंडिया; जदुनाथ सरकार, १९२५)

नादिर शाह

नादिर शाहचा दिल्लीवर हल्ला

मुघलांनी अफगाण लोकांना आपल्या राज्यात थारा दिला म्हणून नादिर शाहने दिल्लीवर हल्ला केल्याचे मानले जाते. दिल्लीवरील हल्ल्यात नादिर शाहने २०,००० मुघल सैनिक मारले आणि त्यामुळे तत्कालीन मुघल शासक मोहम्मद शाहला शरण जावे लागले होते. पराभूत मुघलांनी तोफांचा मारा करून नादीरशाहचे दिल्लीत स्वागत केले. परंतु दिल्लीतील लोकांना हे आवडले नाही. त्यांनी या विरोधात बंड केले. या बंडाचे उत्तर नादिर शाहने भयंकर क्रौर्याने दिले. पर्शियन सैन्याने सहा तासांत ३०,००० जणांना कंठस्ऩान घातले. अनेकांना यमुना नदीच्या काठावर नेऊन तेथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. क्रूरतेची परिसीमा म्हणजे पर्शियन सैन्याने लोकांच्या घरात घुसून त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्यांनी राहत्या घरांना आगी लावल्या. ही क्रूरता पाहून बऱ्याच लोकांनी त्यांच्या कुटुंबासह स्वतःचे जीवन संपवून टाकले. सैयद नियाज खान आणि शाहनवाज खान हे दोन मुघल सरदार बंडात सहभागी झाले होते. त्यांना त्यांच्या शेकडो समर्थकांसह नादिरशहासमोर मारण्यात आले. (अ हिस्टरी ऑफ द सिख, फ्रॉम नादीर शाहज् इन्व्हेंशन टू द राईज ऑफ रणजित सिंग, १७३९-१७९९: हरी राम गुप्ता, १९४४)

यानंतर नादिरशहाने दिल्लीच्या प्रत्येक भागात कर वसूल करण्यासाठी आपली माणसं पाठवली. पर्शियन सैन्याने मुघलांचे ‘मयूर सिंहासन’ही ताब्यात घेतले . कोहिनूर आणि दिया-ए-नूर हिरेही नादिरशहाला अर्पण करण्यात आले होते. मे १७३९ च्या सुरुवातीला नादिरशहाने पर्शियाला परत जाण्याची तयारी सुरू केली. असे मानले जाते की, त्याने भारतातून इतका पैसा लुटला होता की परत गेल्यावर त्याला पुढील तीन वर्षे आपल्या देशात कर जमा करावा लागला नाही. त्याने हजारो हत्ती, उंट आणि घोडेही सोबत घेतले. त्यात भारतीय स्त्रियांचाही समावेश होता.

अधिक वाचा: ‘या’ क्रूरकर्मा मुघल सम्राटाने दिल्लीत केली होती मद्यबंदी! नेमके काय घडले होते?

१२ बजे के बाद सिख..

नादिर शाहने दिल्लीवर केलेल्या आक्रमणा दरम्यान त्याने अनेक स्त्रियांना बंदी केले. जवळपास दोन हजार स्त्रिया नादिर शाहच्या ताब्यात होत्या. वाटेत येणाऱ्या कुठल्याही मुलीला, महिलेला नादिर शाहचे सैन्य उचलत असे. त्यामुळे या भागातील महिलांनी शीख सरदारांकडून मदत मागितली. परंतु नादिर शाहचे सैन्य अफाट होते. तर तुलनेने शीख सरदार कमी होते. अशा वेळी त्यांनी परकीय सैन्याविरुद्ध गनिमी काव्याचा वापर केला. मध्यरात्री १२ नंतर शीख सरदारांनी नादिर शाहच्या सैन्यावर हल्ला केला. त्यामुळे झोपेच्या गुंगीत असलेल्या सैन्याला त्यांचा सामना कसा करावा हे समजले नाही. याच मोहिमेच्या माध्यमातून शीख सरदारांनी अनेक बंदिवसात असलेल्या स्त्रियांची सुटका तर केलीच, परंतु परकीय आक्रमकांना चांगलाच धडाही शिकवला. जे मुघलांना जमले नाही ते शीख सरदारांनी करून दाखवले. या मोहिमेत अनेक शीख सरदार धारातीर्थ पडले. शीख सरदरांच्या या मोहिमेचे नेतृत्त्व जस्सा सिंह यांनी केले होते.

जस्सा सिंह अहलूवालिया

एकूणात रात्री १२ वाजता शीख येतील अशीच भीती परकीय आक्रमकांच्या मनात कायम राहिली. परंतु कालांतराने शीख आणि रात्रीचे १२ यांचा संबंध विस्मृतीत गेला. आणि केवळ हा थट्टेचा विषय म्हणून प्रसिद्ध झाला.

कामरानने वादग्रस्त वक्तव्यानंतर जाहीरपणे मागितली माफी

हरभजन सिंगने केलेल्या कानउघाडणीनंतर कामरान अकमलने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने माफी मागितली आहे. तो लिहितो “माझ्या अलीकडील टिप्पण्णींबद्दल मला मनापासून खेद वाटतो आणि हरभजन सिंग आणि शीख समुदायाची मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अपमानास्पद होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल खूप आदर आहे आणि माझा कधीही कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला खरंच माफ करा.”

अधिक वाचा: औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर !

‘नालायक माणूसच हे करू शकतो’

या माफीनंतर एएनआयशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, ‘अतिशय मूर्खपणाचे विधान आणि बालिश कृत्य आहे, जे एखादा नालायक माणूसच करू शकतो. कामरान अकमलला हे कळलं पाहिजे की, कोणाच्याही धर्माबद्दल काहीही बोलण्याची आणि त्याची खिल्ली उडवण्याची गरज नाही. मी कामरान अकमलला विचारू इच्छितो की, तुला शिखांचा इतिहास माहीत आहे का? हे शीख कोण होते आणि यांनी काय कार्य केलं आहे. याच शिखांनी तुमचा समुदाय, तुमच्या माता, भागिनींना वाचवण्यासाठी दिलेलं योगदान माहीत आहे का? हे तुमच्या पूर्वजांना विचारा, रात्री १२ वाजता शीख मुघलांवर हल्ला करायचे आणि तुमच्या माता-भगिनींना वाचवायचे, त्यामुळे फालतू बोलणं बंद करा. त्याला इतक्या लवकर समजलं आणि माफी मागितली हे चांगलं आहे. पण त्याने पुन्हा कधीही शीख किंवा कोणत्याही धर्माच्या व्यक्तींना दुखावण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, मग तो हिंदू, इस्लाम, शीख किंवा ख्रिश्चन धर्म असो.”

कोण आहे कामरान अकमल?

कामरान अकमल हा पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज आहे. यष्टीरक्षणाच्या बरोबरीने आक्रमक फटकेबाजीसाठी तो प्रसिद्ध आहे. कामरानने ५३ टेस्ट, १५७ वनडे आणि ५८ ट्वेन्टी२० सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धेत कामरानने राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2024 pakistani cricketer controversial remark on sikhs kamran akmal 12 baje ke baad sikh controversy harbhajan slams akmal sikh history akmal apology sikh community svs