गेल्या आठवड्यात शाळेच्या बसला भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये घडला. त्या आगीत २३ विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आता थायलंडमधील रस्ता सुरक्षेचा प्रश्न प्रकाशात आला आहे. आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे; परंतु गॅसगळतीमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, बसमध्ये ११ नैसर्गिक वायूचे डबे बसविण्यात आले होते. मात्र, बसमध्ये नैसर्गिक वायूचे केवळ सहा डबे बसविण्याचे परमिट होते. आग लागण्यापूर्वी चार महिन्यांपूर्वी बसची अखेरची तपासणी करण्यात आली होती. ही माहिती समोर येताच नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांनी वाहन सुरक्षा कडक करण्याची मागणी केली आहे. दक्षिण आशियात रस्ता सुरक्षेचा प्रश्न गंभीर असण्याचे कारण काय? त्याबाबत जाणून घेऊ.

सीएनजी बस आणि अग्निसुरक्षा मानके

थायलंडचे परिवहन मंत्री सुरिया जंगरुंगरंगकिट यांनी सांगितले की, बसमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)चा वापर करण्याबाबत सरकार चौकशी सुरू करील. अधिकृत आकडेवारीनुसार, देशात सीएनजीवर चालणाऱ्या १३,००० हून अधिक बसेस आहेत. परिवहन मंत्रालयाने भूपृष्ठ वाहतूक विभागाला (डीएलटी) सर्व सीएनजी बसेसची अग्निसुरक्षा मानकांची पूर्तता करण्याबाबत दोन महिन्यांत तपासणी करावी, असे आदेश दिले आहेत. थायलंड डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूटमधील वाहतूक व लॉजिस्टिक पॉलिसीचे संशोधन संचालक सुमेत ओंगकिट्टीकुल यांनी ब्रॉडकास्टर थाई ‘पीबीएस’ला सांगितले की, सेवेत असलेल्या अनेक बसेस मानकांची पूर्तता करीत नाहीत. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, सुमारे १०,००० बसेसपैकी फक्त पाच टक्के बसेस २०२२ मध्ये लागू झालेल्या मानकांची पूर्तता करतात. त्यांनी हेदेखील संगितले की, आधीपासून सेवेत असलेल्या वाहनांना नवीन नियम लागू झाले नाहीत आणि बस कंपन्यांनी तक्रार केली की, त्यांच्या जुन्या वाहनांमध्ये अग्निरोधक साहित्य बसविणे परवडणारे नाही. “इतर देशांमध्ये जुन्या आणि नवीन अशा दोन्ही बसेससाठी समान मानके लागू केली जातात,” असेदेखील त्यांनी अधोरेखित केले.

थायलंडमध्ये रस्ता सुरक्षा ही फार पूर्वीपासून प्रमुख समस्या आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : पुतिन घेणार इराणच्या राष्ट्राध्यक्षांची भेट; पश्चिम आशियातील युद्धात रशिया इराणची बाजू का घेतोय? ही मोठ्या युद्धाची तयारी आहे का?

धोकादायक रस्ते

थाई पत्रकार प्रवीत रोजनाफ्रूक म्हणाले की, थायलंडमध्ये रस्ता सुरक्षा ही फार पूर्वीपासून प्रमुख समस्या आहे. उपाययोजनांच्या अपूर्ण अंमलबजावणीमुळे दरवर्षी हजारो मृत्यू होतात. जागतिक आरोग्य संघटना (डबल्यूएचओ) च्या म्हणण्यानुसार, दक्षिण आशियाई देशात २०२१ मध्ये प्रत्येकी एक लाख लोकांमागे सुमारे २५.७ मृत्यू नोंदवले गेले आहेत. आशियामध्ये नेपाळनंतर थायलंडमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत प्राणघातक रस्ते आहेत. चाड आणि गिनी-बिसाऊ यांच्याबरोबरच वाहतुकीत होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत थायलंड १६ व्या क्रमांकावर आहे, असे ‘डबल्यूएचओ’ने म्हटले आहे. एकंदरीत थायलंडच्या रस्त्यांवर दरवर्षी सुमारे २०,००० लोक आपले प्राण गमवतात. “रस्त्यांमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. मोटरसायकलवरील बहुतेक दुचाकीस्वार हेल्मेट न घालताच प्रवास करतात. बसच्या तपासणीवेळी लाच घेतली जाते. आता शाळेच्या बसला लागून, त्या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला. अशा आगीसारख्या मोठ्या वाहतूक अपघाताच्या दुर्घटना घडून मृत्यू होतात आणि त्यावरून रस्ता सुरक्षेबद्दल चर्चा होते तेव्हाच बोलले जाते, ” असे प्रवीत यांनी सांगितले. “रस्ता सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी राजकारणी, अधिकारी आणि सामान्य जनतेच्या इच्छाशक्तीचा अभाव असण्यामुळे परिस्थिती अधिक दुःखद झाली आहे,” असेही ते म्हणाले.

इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये काय परिस्थिती?

ही समस्या थायलंडपुरती मर्यादित नाही. कारण- इतर दक्षिण आशियाई राष्ट्रे विशेषत: मलेशिया व व्हिएतनाम यांसारख्याच आव्हानांना तोंड देत आहेत. सप्टेंबरमध्ये मलेशियाचे वाहतूकमंत्री अँथनी लोके म्हणाले की, २०२३ मध्ये ६,४४३ मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे, त्यामुळे देशातील रस्ते सुरक्षेच्या समस्या तातडीने सोडविण्याची गरज आहे. चालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी चालकांना स्थानिक प्रवासी सुरक्षा कार्यक्रमात सामील होण्याचे आवाहन केले आणि २०३० पर्यंत रस्त्यावरील मृत्यू निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले. अपघातांमध्ये वाहतुकीचा प्रकारदेखील मोठी भूमिका बजावतो. थायलंडमध्ये उदाहरणार्थ- पाचपैकी चार मृत्यू दुचाकीचालकांचे होतात.

व्हिएतनाममध्येही मोटरसायकली आणि मोपेड स्कूटर्स मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. (छायाचित्र-रॉयटर्स)

व्हिएतनाममध्येही मोटरसायकली आणि मोपेड स्कूटर्स मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. असा अंदाज आहे की, देशातल्या रस्त्यावरील एकूण अपघातांपैकी सुमारे ८० टक्के अपघात दुचाकीचे होतात. व्हिएतनामी सरकारने रस्ता सुरक्षेच्या समस्या सोडविण्यासाठी या वर्षी नवीन नियम आणले आहेत. उदाहरणार्थ- वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व मुलांचे वय १० किंवा त्यांची उंची १३५ सेंटिमीटरपेक्षा कमी असल्यास, त्यांना चाइल्ड कार सीटवर सुरक्षितरीत्या बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, व्हिएतनाममध्ये तसेच जागतिक स्तरावर पाच ते २९ वर्षे वयोगटातील मुले आणि तरुण प्रौढांच्या मृत्यूंमागील रस्ते वाहतूक अपघात हे प्रमुख कारण आहे. नवीन सुरक्षा नियमांमुळे व्हिएतनामी मुलांच्या रस्ते अपघाताशी संबंधित मृत्यूचे प्रमाण ७१ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, असा ‘डबल्यूएचओ’चा अंदाज आहे.

हेही वाचा : जीएसटी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले गुजरातमधील पत्रकार महेश लांगा कोण आहेत?

चिनी तंत्रज्ञानाची रस्ता सुरक्षेत होणार मदत?

दक्षिण आशियातील तज्ज्ञ व उद्योजकांनी देशांत रस्त्यांच्या स्थितीचे परीक्षण करण्यासाठी आणि रस्त्यावरील चालकांना सतर्क करण्यासाठी रिअल-टाइम ॲप्स तयार करण्याचे आवाहन केले आहे. रहदारीच्या समस्या सोडविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता साधने वापरावीत, असे काही राजकारण्यांचे मत आहे. थायलंडचे वाहतूकमंत्री सुरिया यांनी रस्ते अपघात रोखण्यासाठी चिनी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार सुचवलाय. “जर Huawei च्या तंत्रज्ञानामुळे वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्ती निवारणाची कार्यक्षमता वाढू शकते, तर सरकारच्या धोरणानुसार थायलंडला प्रादेशिक वाहतूक केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्याची ही एक चांगली संधी असेल,” असे ते सप्टेंबरमध्ये म्हणाले होते.