टायगर ३ मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत, या सिनेमाचे कथानक पाकिस्तानबरोबरचे भारताचे संबंध दर्शविणारा या वर्षीचा नवीनतम हिंदी चित्रपट असे आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, शाहरुख खानचा पठाण आणि सनी देओलचा गदर २ हे सिनेमे प्रदर्शित झाले होते, दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले, या दोन्ही सिनेमांचे कथानक पाकिस्तानच्या मुद्द्याशी संबंधित होते आणि दोन्ही देशांमधील वैमनस्य सीमेच्या दोन्ही बाजूंच्या सामान्य लोकांवर कसा परिणाम करते हे दर्शविण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टायगर’ फ्रँचायझीमधील मागील दोन चित्रपट, एक था टायगर (२०१२) आणि टायगर जिंदा है (२०१७) यांनीही भारत-पाकिस्तान या प्रश्नाला वेगवेगळ्या प्रकारे हाताळले, मैत्री किंवा सलोखा शक्य आहे का? हे पडताळण्याचा प्रयत्न केला.
असे असले तरी बॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रदीर्घ काळासाठी पाकिस्तान या देशाचा काहीही संबंध दर्शविण्यात आलेला नव्हता. किंबहुना हिंदी चित्रपटांनी या देशाचा उल्लेखच केला नाही, परंतु ९० च्या दशकापासून चित्र पालटले आणि आपण पाकिस्तानचे अस्तित्त्व टाळू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली, असे का घडले असावे? याचा थोडक्यात आढावा..

हिंदी चित्रपटांमध्ये पाकिस्तानला शत्रू कधीपासून संबोधले जाऊ लागले? त्याआधी काय झालं?

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता सांगतात, पहिल्यांदा पाकिस्तानला मुख्य प्रवाहात ‘शत्रू’ म्हणून स्पष्टपणे नाव देण्यात आले होते, ते म्हणजे १९९९ साली प्रदर्शित झालेल्या जॉन मॅथ्यू मॅथनच्या युद्धविरहित ‘सरफरोश’ या हिंदी चित्रपटात, ज्यामध्ये आमिर खान आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते. “त्यापूर्वी, पाकिस्तान फक्त ‘पडोसी मुल्क’ (शेजारी देश), ‘विदेशी हाथ’ (विदेशी हात) इत्यादी शब्दांमध्ये अस्तित्वात होता,” गुप्ता सांगतात, “चेतन आनंदच्या १९६४ च्या ‘हकीकत’ सारख्या विशिष्ट चित्रपटांनीच पाकिस्तानला भारताचा शत्रू असे नाव दिले होते, परंतु नंतर, तसे करण्याशिवाय पर्याय नव्हता.”

अधिक वाचा: Killers of the Flower Moon: रूपेरी पडद्यावर आलेले ‘अमेरिकन- इंडियन्स’च्या हत्याकांडामागचे गूढ आहे तरी काय?

पाकिस्तानचे नाव घेण्याच्या अनिच्छेचे स्पष्टीकरण काय आहे?

एक स्पष्टीकरण असे आहे की, फाळणीचा आघात अजूनही स्मृतींमध्ये ताजा होता. सामूहिक कल्पनेत हिंसा आणि विस्थापनाच्या वेदना व्यक्त करणे अजूनही अवघड होते. हिंदी चित्रपटसृष्टीने धर्मनिरपेक्षता, समाजवाद, सरंजामशाहीविरोधी आणि उपेक्षित वर्गाच्या उत्थानाच्या नेहरूवादी आदर्शांकडे पाहणे पसंत केले होते. हा राष्ट्रनिर्मितीचा काळ होता आणि बॉलीवूडमधील प्रमुख उदाहरणांमध्ये नया दौर (दिलीप कुमार-वैजयंतीमाला, १९५७), राज कपूरचा श्री ४२० (१९५५), आणि बिमल रॉय यांचा दो बिघा जमीन (१९५३) यांचा समावेश होता.

नंतर परिस्थिती कधी बदलू लागली… पण का?

९० च्या दशकात बॉलीवूडच्या पिढ्यांमध्ये बदल झाला होता. फाळणीतून वाचलेल्यांची मुलं आता चित्रपट निर्मिती करत होती आणि त्याभोवती बहुआयामी चर्चा अधिक सोयीस्करपणे करता याव्यात याकरता त्यांच्या आठवणी पुरेशा होत्या. फाळणीवरील जे साहित्य प्रकाशित होत होते ते मोठ्या पडद्यावर पोहोचू लागले होतो. दीपा मेहतांचा अर्थ (१९९९) हा जे बाप्सी सिधवा यांच्या ‘क्रॅकिंग इंडिया’ (१९९१) या कादंबरीवर बेतलेला होता; ‘ट्रेन टू पाकिस्तान’ (१९९८) हा खुशवंत सिंग यांच्या तेच शीर्षक असलेल्या कादंबरीवर आधारित आहे; आणि चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या २००३ साली आलेल्या ‘पिंजर’चे कथानकही अमृता प्रीतमच्या ‘पिंजर’ या पंजाबी कादंबरीवर बेतलेले होते.

चित्रपट निर्मात्यांनी पाकिस्तानी समाज, राजकारण आणि लष्कराचा शोध घेण्यास सुरुवात केली. गदर: एक प्रेम कथा (२००१) या चित्रपटात भारतीय पंजाबमधील एका शीख ट्रक ड्रायव्हरने मुस्लिम पाकिस्तानी मुलीशी लग्न केले असे कथानक होते. या चित्रपटाने पाकिस्तानमधील अत्याचारी समाजाचा पुनरुच्चार केला, परंतु तरीही “सर्व पाकिस्तानी वाईट नसतात” असा संदेश दिला.

यश चोप्राची वीर-झारा (२००४) ही एक भारतीय पुरुष आणि पाकिस्तानी स्त्री यांच्यातील प्रेमकथा होती, ज्यामध्ये नायिकेचे लग्न ज्याच्याशी व्हावयाचे होते तो खलनायक- पाकिस्तानी होता, परंतु तारणहार एक पाकिस्तानी मानवाधिकार वकील होती, जिची भूमिका राणी मुखर्जीने केली होती. सीमा ओलांडूनही प्रेम शक्य आहे हे दोन्ही चित्रपटांनी दाखवून दिले.

अधिक वाचा: मृत्यूनंतर खरंच जीवन आहे का? काय सांगतेय नवीन संशोधन? 

बॉलीवूडमधील पाकिस्तान आणि बदललेले चित्रण

१९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ मधील पाकिस्तानबरोबरची चार युद्धे अर्थातच लोक यापासून अनभिज्ञ नव्हते. आर्थिक उदारीकरणानंतरच्या (post-liberalisation era) कालखंडाने भारतात समृद्धी आणि आत्मविश्वासही आला. ‘नवश्रीमंतांच्या’ पिढीच्या हातात पैसा आला, तर १९९० च्या दशकात पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि हिंसाचाराला चालना देण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले ​​आणि भारतभर असंख्य दहशतवादी हल्ले केले. १९९९ मध्ये पाकिस्तानने कारगिलमध्ये भारतीय भूभाग बळकावण्याचा प्रयत्न केला आणि १९७१ ची आठवण नसलेल्या भारतीयांच्या पिढीने प्रथमच युद्ध जवळून पाहिले. हीच ती वेळ होती जेव्हा पाकिस्तानने इस्लामी दहशतवादाचे समर्थन आणि निधी पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा निर्माण केली होती.

जे. पी. दत्ताच्या बॉर्डर (१९९७) ने युद्धपटांच्या निर्मितीमध्ये एक नवीन मानक स्थापित केले आणि त्यानंतर मिशन काश्मीर (२०००), एलओसी: कारगिल (२००३), आणि लक्ष्य (२००४) सारखे चित्रपट आले. मात्र, गेल्या दशकात बॉलीवूडच्या पाकिस्तानविषय़क चित्रणात मोठा बदल झाला आहे. नरेंद्र मोदी सरकारने, आणि पंतप्रधानांनी वैयक्तिकरित्या, २०१४ साली पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करून सुरुवात केली. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ने पाकिस्तानला सकारात्मक प्रकाशात दाखवले आणि एक प्रचंड व्यावसायिक यश मिळविले.
जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट हवाई तळावर झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये उरी आणि नगरोटा येथील भारतीय लष्कराच्या तळांवर झालेल्या हल्ल्यांमुळे भारताची भूमिका अधिक कठोर झाली. परिणामी २०१७ पासून पाकिस्तानचे सर्वच बॉलिवूडपटांमधील चित्रण ‘दुष्ट शत्रू’ असेच होण्यास सुरुवात झाली. २०१८ मध्ये ‘राझी’ आणि २०१९ मध्ये ‘उरी: सर्जिकल स्ट्राइक’ हे चित्रपट प्रदर्शित झाले.

अधिक वाचा: एक उत्कट अधुरी प्रेम कथा…. उर्वशी आणि पुरुरवा!

पाकिस्तानने केलेल्या अक्षम्य हल्ल्यांनंतर भारताच्या मुख्य प्रवाहातील राजकारणात देशाच्या अखंडत्वाला प्रोत्साहन दिले गेले. आणि त्याच वेळेस देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतल्याने पाकिस्तान बॉलिवूडपटांमध्ये शत्रूच्या भूमिकेत चपखल बसला. या पार्श्वभूमीवर टायगर ३ हा अपवाद म्हणावा लागेल आणि त्याच्या व्यावसायिक यशाकडे एक ट्रेण्ड म्हणून पाहिले जाऊ शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger 3 bollywoods portrayal of pakistan and a new change but why svs
Show comments