Fear Grips 11 Villages as ‘Sugarcane Tiger’ Remains Uncaptured: उत्तर प्रदेशच्या लखनऊ परिसरातील काही गावांमध्ये सध्या ऊसातील बागायती वाघामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. २०२४ च्या डिसेंबर महिन्यापासून रहमान खेड़ा आणि मिठेनगरसह ११ गावांमध्ये हा वाघ मुक्तपणे संचार करत असून आतापर्यंत त्याने १२ जनावरांची शिकार केली आहे. परिणामी, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेकांच्या दैनंदिन कामावरही त्याचा परिणाम झाला आहे. वन विभागाने या वाघाला पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. तरीही, हा वाघ पकडण्यात अपयश येत आहे. या परिस्थितीमुळे स्थानिक लोकांना रात्री घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्याइतपत वेळ आली आहे. प्रत्यक्ष शाळा बंद करून त्या ऑनलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच, लग्न समारंभ आणि इतर सामाजिक कार्यक्रमांवरही याचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे या वाघाचे मूळ जंगलातले नसून ऊसाच्या मळ्यातील बागायती आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, याचा घेतलेला हा आढावा.
रहमान खेड़ा गावातील रहिवासी मनोज कुमार यादव यांना पुढच्या महिन्यात शेजारील गावात होणाऱ्या कौटुंबिक लग्नसमारंभासाठी कोण येणार याची चिंता आहे. मिठेनगर गावातील गृहिणी शबीना खातून जवळच्या जंगलातून जळाऊ लाकूड गोळा करण्यासारख्या साध्या कामासाठी इतर महिलांबरोबर फिरू लागली आहे. २०२४ च्या डिसेंबर महिन्यापासून लखनऊजवळील १००० एकर क्षेत्रात पसरलेल्या ११ गावांमध्ये ऊसातील ‘बागायती वाघा’मुळे भीती आणि निराशेचे वातावरण आहे. आतापर्यंत १२ जनावरांना ठार मारणाऱ्या या वाघाला उत्तर प्रदेश वन विभाग अजूनही पकडू शकलेला नाही.
वाघ पकडण्यासाठी…
लखनऊचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक रेणू सिंग यांनी सांगितले की, सुमारे १०० अधिकारी वाघ पकडण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. वन विभागाने या भागाला तीन झोनमध्ये विभागून शोधमोहीम सुरू केली आहे. वाघाचा ठाव शोधण्यासाठी त्याच्या अंगावरील पट्ट्यांच्या विशिष्ट नमुन्यांची तुलना राज्यभरातील वाघांच्या नोंद असलेल्या छायाचित्रांशी करण्यात आली. मात्र कोणतीही साम्यरेखा न आढळल्याने वन अधिकाऱ्यांना हा ‘ऊसातील बागायती वाघ’ असल्याचा संशय आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते हा वाघ लखीमपूर खीरी जिल्ह्यातील तराई प्रदेशातून २०० किमी अंतर कापून येथे आला असावा. अलीकडेच सापडलेल्या पंजांच्या खुणांवरून तो आपल्या मूळ ठिकाणी परत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याला सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
‘ऊसातला बागायती वाघ’ म्हणजे काय?
उत्तर प्रदेशचा तराई प्रदेश १५ जिल्ह्यांमध्ये पसरलेला असून पश्चिमेकडील सहारनपूरपासून ते पूर्वेकडील कुशीनगरपर्यंत विस्तारलेला आहे. या प्रदेशात सुमारे ७०% क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या वाघांचे बालपण ऊसाच्या शेतांमध्येच जाते आणि ते आपल्या आईकडून मळ्यात राहून शिकार कशी करतात हे शिकून घेतात. ऊस तोडणीच्या वेळी त्यांची मुले जंगलात जाण्याऐवजी एका शेतातून दुसऱ्या शेतात स्थलांतर करतात. त्यामुळे हे वाघ जंगलांपेक्षा ऊसाच्या शेतांमध्ये अधिक सहजपणे राहतात.
डिसेंबर २०२४ साली वाघाच्या हालचाली आढळल्या
२०२४ साली डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लखनऊपासून २० किमी अंतरावर असलेल्या करझन गावात वाघ फिरत असल्याच्या अफवा पसरल्या. सुरुवातीला या अफवा असल्याचे मानले गेले. परंतु, १२ डिसेंबर २०२४ रोजी २ किमी क्षेत्रात १०० हून अधिक पंजांचे ठसे आढळले. त्याच दिवशी वाघाने एका नीलगायीची (बोसेलाफस ट्रॅगोकेमेलस) शिकार केली. १३ डिसेंबरला वन विभागाने रहमान खेड़ा गावातील केंद्रीय उपोष्णकटिबंधीय फलोत्पादन संस्थेत तळ ठोकला आणि वाघावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत फक्त एका अधिकाऱ्याने वाघ पाहिला असून तो सुमारे पाच वर्षांचा तरुण नर वाघ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
स्थानिकांमध्ये दहशत आणि सुरक्षेचे उपाय
२०२४ साली डिसेंबर महिन्यापासून प्रभावित भागातील २० हजाराहून अधिक रहिवासी वाघाच्या सावटाखाली जगत आहेत. गावभर काय करावे आणि काय करू नये यासंबंधी सूचना देणारे फलक लावले गेले आहेत. स्थानिकांना गटाने फिरण्याचा आणि रात्री ५ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडू नका, तसेच गरज असल्यास मोठ्याने आवाज करत बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वन विभागाने रात्री उशिरा बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी वाहतूक व्यवस्था केली आहे. “दोन पथके रात्रीच्या वेळी कार्यरत असतील, जेणेकरून लोक सुरक्षितरित्या त्यांच्या घरी पोहोचू शकतील,” असे लखनऊचे विभागीय वन अधिकारी सितांशु पांडे यांनी सांगितले. तसेच जनावरे रात्री बाहेर न ठेवण्याची विनंती स्थानिक प्राधिकरणांनी केली आहे.
२०१२ मध्येही असेच घडले होते
स्थानिकांच्या मते २०१२ सालीही रहमान खेड़ा गावातील झुडपांमध्ये तीन महिने एक वाघ राहिला होता. अखेर तो वाघ वन विभागाने पकडला होता. “२०१२ मध्ये वापरण्यात आलेले उपाय अवलंबले असते तर हा वाघ केव्हाच पकडला असता,” असे अंशू यादव (स्थानिक शेतकरी) यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाघाचा मागोवा
गेल्या महिन्यात वन विभागाने ३२ कॅमेरा ट्रॅप, ७ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३ ड्रोन (२ थर्मल ड्रोनसह) वापरून वाघाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, दुधवा नॅशनल पार्कमधील दोन हत्ती, बेशुद्ध करणारे तज्ज्ञ, पोलीस आणि वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे (WTI) अधिकारी मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. ऑपरेशनचे नोडल अधिकारी आकाशदीप बधावन यांनी सांगितले की, “मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र काम करत आहेत.” वन विभागाने वाघ पकडण्यासाठी चार मोठ्या पिंजऱ्यांची व्यवस्था केली असून त्यांना पांढऱ्या वाघिणीच्या मूत्राने आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याशिवाय, वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तीन मचाण उभारण्यात आल्या आहेत. स्थानिक रहिवाशांना ‘बाघ मित्र’ म्हणून नियुक्त करण्यात आले असून, त्यांना वाघाच्या हालचालींबाबत माहिती संकलित करण्याची आणि वन विभागाच्या सूचना स्थानिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
वाघ पकडण्याच्या प्रतीक्षेत…
अद्याप वाघ सापडलेला नसल्याने लोकांमध्ये भीती कायम आहे. काहीजण एकत्र गट करून शेती किंवा जंगलात जात असले तरी इतरांना अखेरपर्यंत वाट पाहणे कठीण जात आहे. उलरापूर गावातील औषध दुकानाचे मालक रवी यादव यांनी सांगितले की, “मी संध्याकाळच्या आधी दुकान बंद करतो. पण मी किती दिवस असे करावे?” लग्नसराईचा हंगाम तोंडावर असताना काही जण समारंभांच्या आयोजनाबाबत चिंता व्यक्त करत आहेत. “वाघ पकडला गेला नाही तर आमच्या नातेवाईकांना लग्नाला येण्यास भीती वाटेल. आम्हाला कदाचित लग्नाचं स्थळं बदलावं लागेल,” असे रहमान खेड़ा गावातील मनोज कुमार यादव यांनी सांगितले.
शालेय शिक्षणावर परिणाम
परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभावित गावांतील शाळांसाठी ऑनलाइन वर्ग सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. १५ जानेवारीनंतर २५ सरकारी आणि खाजगी शाळांमधील सुमारे ३,००० विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. मिठेनगर गावातील सरकारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामिता मौर्य यांनी सांगितले की, “फक्त ५०% विद्यार्थी ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहतात. कारण बहुतांश कुटुंबांकडे मोबाइल नाहीत.”
संपूर्ण परिसर वाघाच्या छायेत
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वाघ पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाघ पकडला जाईपर्यंत ही परिस्थिती अशीच राहण्याची चिन्ह आहेत.